Ujjain Boat Accident  sakal
सोलापूर

Ujjain Boat Accident : दुर्घटनेला जबाबदार कोण? ; उपाययोजनांचे काय?

अण्णा काळे

करमाळा : उजनी जलाशयात बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाला. याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पण या दुर्घटनेला नेमके जबाबदार कोण? यावर कोण बोलणार आहे की नाही? भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून उपाययोजना काय केल्या जाणार? याविषयी मात्र प्रशासनाने योग्य भूमिका घेण्याची मागणी होत आहे. धरणात जलवाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसताना अनेक वर्षापासून येथे जलवाहतूक सुरू आहे, याबाबत प्रशासनाला कधीच का प्रश्न पडला नसावा? असे एक ना अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

उजनी जलाशयात प्रवासी वाहतूक करण्यासाठी कोणालाच परवाना नाही. तरीही धरणाच्या बॅकवॉटरमधील १४ ठिकाणहून नियमितपणे १६ हून अधिक बोटींमधून (लॉच) प्रवासी वाहतूक होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी कोणत्याच बोटीवर सुरक्षा साहित्य, जॅकेट ठेवले जात नसल्याची बाब कुगाव आणि कळाशी यासह दुर्दैवी घटनेनंतर त्या भागात उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर पुढे आली आहे. मागील काही महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुगाव ते शिरसोडी पुलाला मंजुरी दिली आहे. केत्तूर ते चांडगाव यादरम्यान पूल उभारावा, अशीही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र याला अद्याप तरी मुहूर्त लागलेला नाही. या घटनेनंतर तरी प्रशासन याकडे गंभीरपणे पाहील अशी अपेक्षा आहे.

१४ ठिकाणाहून १६ बोटींद्वारे जलवाहतूक

  • १. केत्तूर ते चांडगाव : ४

  • २. वाशिंबे ते गंगावळण : २

  • ३. चिखलठाण ते पडथाळ : २

  • ४. कुगाव से कळाशी : २

  • ५. कुगाव ते कालठण : ३

  • ६. ढोकरी ते शहा : १

  • ७. कुगाव ते शिरसोडी : २

उजनी जलाशयात बोट बुडून मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तत्काळ देण्यात येणार आहे. दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यांना काय मदत करता येईल याबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागवले आहे. तसेच उजनी जलाशयातील सर्व जलवाहतूक बंद करण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत.

- शिल्पा ठोकळे,

तहसीलदार, करमाळा

प्रवासासाठीचे दर

बोटीमधून प्रवास करण्यासाठी एका प्रवाशाला वीस रुपये तर दुचाकीसाठी वीस रुपये घेतले जातात. याशिवाय धान्य व जनावरांचा चार्ज वेगळा आकारला जातो. एक बोटीमधून रोज सरासरी ८ ते १० फेऱ्या होतात. याशिवाय स्पेशल बोटीचे भाडे कोणी भरले तर स्वतंत्र फेरी देखील मारली जाते.

व्यवसायाला वरदहस्त कोणाचा?

उजनी जलाशयातून वाळू उपसा होत असल्यास महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन यावरती कारवाई करते. मात्र उजनी जलाशयातून बोटीने जी जलवाहतूक होते, त्यावर नियंत्रण कोणाचे? उजनी पाटबंधारे विभाग यावर नियंत्रण का ठेवत नाही? बोट व्यवसायातून बोट मालकाला चांगले पैसे मिळतात. या व्यवसायाला नेमका वरदहस्त कोणाचा? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.

रस्ता मार्गे जाण्यासाठी तीन तास, बोटीतून केवळ १५ मिनिटे

उजनी धरणाच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे करमाळा तालुक्यातून इंदापूरला जायचे असल्यास नदीतील अंतर हे खूप कमी आहे. धरण भरल्यानंतर कळाशी ते कुगांव हे अंतर चार ते साडेचार किलोमीटर आहे. सध्या पाण्याची पातळी घटल्यामुळे हे अंतर अडीच ते तीन किलोमीटर आहे. त्यामुळे केवळ दहा ते पंधरा मिनिटात कुगाव ते कळाशीला जाता येते. एवढेच अंतर रस्त्याने जायचे असल्यास ८० किमी अंतर जावे लागते. यासाठी अडीच ते तीन तास वेळ लागतो.

दुचाकी, शेळ्या-मेंढ्या अन्‌ धान्याचीही वाहतूक

बोटीमधून माणसांबरोबरच मोटरसायकल वाहतूक केली जाते. याशिवाय लोकांबरोबरच त्यांची दुचाकी वाहने, शेळ्या-मेंढ्यासारखी दुभती जनावरे, खरेदी केलेले साहित्य, धान्याची पोती हे अतिरिक्त ओझेही वाहून नेले जाते. सर्व वाहतूक बेकायदेशीरपणे चालते. तर बोटीवर लाइफ जॅकेट, बोट बुडायला लागली तर प्रवाशांना वाचवण्यासाठी इतर साधनेही नसतात. चालक ही प्रशिक्षित नसल्याने दुर्घटनेवेळी त्याला त्याचा ही जीव वाचवता येत नाही. कुगाव ते कळाशी दरम्यान बुडालेल्या बोटीचा चालक अनुराग अवघडे हा देखील स्वतःचा जीव वाचू शकला नाही.

उजनीकाठच्या बड्या बागायतदारांकडेही बोटी

उजनी जलाशयातून प्रवासी वाहतुकीसाठी चालणाऱ्या बोटींशिवाय उजनी जलाशयाच्या काठावरील गावातील अनेक मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांनी स्वतःच्या बोटी घेतल्या आहेत. या बोटी हे मोठे बागायतदार फक्त स्वतःच्या कुटुंबीयांना, नातेवाइकांना, मित्रांना उजनी जलाशयात फेरफटका मारण्यासाठी वापरतात. अनेक वेळा सोशल मीडियातून उजनी जलाशयात फेरफटका मारणाऱ्या बोटीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेले आढळून आले आहेत. यावर आतापर्यंत तरी कारवाई झालेली नाही.

धोका टाळण्यासाठी उपाययोजना

बॉकवॉटरमधील सर्वच ठिकाणी पूल बांधणे आर्थिक व व्यावहारिक दृष्टिकोनातून शक्य नाही. एक पूल मंजूर झाला आहे आणि आणखी एखादा पूल मंजूर करणे आवश्यक आहे. त्याचे काम तातडीने सुरू होण्याची गरज आहे. तसेच शासनाकडून समुद्रातील मार्गावर ज्या पद्धतीने सर्व सुविधांसह अत्याधुनिक पद्धतीने जलवाहतूक केली जाते, तशी सोय करणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT