Maharashtra Temple  Esakal
साप्ताहिक

संपादकीय : ऊर्जापीठे

साप्ताहिक टीम

अध्यात्माचा वारसा सांगणारी महान संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राच्या मातीचा अभिमानाने उल्लेख केला जातो. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारी, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही उक्ती जगाला शेकडो वर्षांपूर्वी देऊन ‘ग्लोबल व्हिलेज’चे आद्य प्रतिपादन मांडणारा विचार याच भूमीतून उदयाला आला. या भूमीतील अनेक संत, महंतांनी माणसाच्या जगण्याचा गौरव केला. माणसामाणसांतील भेदाच्या भिंती पाडून समतेचे, शुद्ध चारित्र्य आणि समग्र आचारविचारांचे तत्त्वज्ञान साऱ्या जगाला देऊ केले.

पंढरीची वारी हे महाराष्ट्राच्या भूमीचे आगळेवेगळे वेगळेपण आहे. या वारीच्या माध्यमातून भागवत संप्रदायाने समाजमन ढवळून तर काढलेच शिवाय, भेदांना हद्दपार करत समतेचे अभंग गात ‘वारकरी’ ही विचारप्रणाली समाजातील सर्व घटकांपर्यंत नेऊन पोहोचवली.

काळाच्या ओघात येथे जैन, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, पारशी, शीख असे अनेकविध धर्म, पंथ, विचार आले आणि रुजले, वाढले. या साऱ्यांच्याही धार्मिक, आध्यात्मिक तत्त्वज्ञान विचारांचे अभिसरण करीत ही भूमी अध्यात्म आणि धर्मविचारातही पुरोगामी आणि समाजाच्या गरजा ओळखून पुढे जाणारी ठरली आहे.

ऐतिहासिक, पौराणिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्राच्या भूमीत अष्टविनायक, पाच ज्योतिर्लिंगे, देवीची साडेतीन पीठे, जेजुरीचा खंडोबा आणि कोल्हापूरचा जोतिबा अशी अनेकविध शक्तिपीठे आणि भक्तिपीठे महाराष्ट्रवासियांच्या मनावर अधिराज्य करीत आहेत.

महाराष्ट्रवासियांच्या मनात भक्तीचा आणि श्रद्धेचा मळा फुलवून त्यांची जीवनशैली, आचारविचार, समाजहितैषी वर्तन यांना या भक्तिपीठांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. असंख्यांच्या मनात श्रद्धाभाव रुजवून तो वृद्धिंगत केला आहे.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, समर्थ रामदास स्वामी यांच्यापासून अनेक संतांच्या वास्तव्याने ही भूमी पुनीत झाली आहे.

अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे संत गजानन महाराज, गोंदवल्याचे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, संत गुलाब महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, दत्त संप्रदायाचा प्रसार करणारे वासुदेवानंद सरस्वती यांच्या अध्यात्मविचारांच्या बाळकडूवर येथील समाजमन पोसले गेले आहे, समृद्ध होत गेले आहे.

अध्यात्माचा पाया भक्कम करत विचाराला धार आणि मनोविकासाला चालना देण्याचे काम या सर्व महात्म्यांनी केले. या संतांनी महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण केलेल्या अनेक परंपरांचा वारसा जपतानाच ठिकठिकाणची देवस्थाने आणि त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांनी गेल्या काही वर्षांत आपल्या विधायक कार्यातून वेगळेपणाचा ठसा उमटवला आहे.

ही देवस्थाने आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या उपक्रमांमुळे गरीब, गरजूंना मोठा आधार मिळाला आहे. सेवा आणि सुश्रुषेचे वेगळे दालन निर्माण झाले आहे.

महाराष्ट्राच्या भक्तिजीवनाला आकार देणाऱ्या अशा भक्तिपीठांचा आढावा घेणे म्हणजे क्षितीजापार पसरलेल्या महासागराला कवेत घेण्याचा प्रयत्न करणे होय. याची जाणीव ठेवतच साप्ताहिक सकाळने या देवस्थान विशेष अंकातून या भक्तिपीठांकडे पाहण्याची एक छोटीशी खिडकी किलकिली करण्याचा एक लहानसा प्रयत्न केला आहे.

ह्या साऱ्या भक्तिपीठांमधून सकारात्मक ऊर्जा घेत असतानाच यातील अनेक मंदिरे निसर्ग सौंदर्याबरोबरच मानवी हातांच्या कारागिरीचीही लेणी लेवून उभी आहेत, याकडेही लक्ष वेधावेसे वाटते. या मंदिरांच्या भिंतींवरील, प्रांगणांमधील कलाविष्कारांचे सौंदर्य आणि सौष्ठव येणाऱ्या अनेक पिढ्यांना आपल्या समृद्ध वारशाच्या कथा सांगत राहील आणि नवसर्जनाला बळ देत राहील, यात शंका नाही.

-------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कामगारांवर गोळीबार, 3 मजुरांचा मृत्यू तर 2 जखमी

विधानसभेसाठी भाजपची यादी जाहीर, देवेंद्र फडणविसांना पुन्हा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

Vidhansabha Election : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन! कपिल पाटलांचा खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

KL Rahul ची कसोटीमधून निवृत्ती? 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, खराब फॉर्ममुळे निर्णय घेतल्याचा दावा

SCROLL FOR NEXT