तब्बल सात तासाच्या प्रयत्नानंतर शोध कार्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या दोन तरुणांना मुलीचा मृतदेह आढळून आला.
इंदापूर : इंदापूर (Indapur) तालुक्यातील बिजवडी ग्रामपंचायत (Bijwadi Gram Panchayat) अंतर्गत येणाऱ्या राजवडी पाटी इथं मजुरीच्या कामासाठी आलेल्या कुटुंबातील एका पंधरा वर्षीय मुलीचा विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर विहिरीत पाय घसरुन बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये सारिका पिराजी शिंदे (वय 15) असं बुडून मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिराजी तुकाराम शिंदे (वय 42 धंदा मजुरी, मूळ रा. वडारवाडी मोंढा, परतूर ता. परतुर जि. जालना, सध्या रा. राजवडी ता. इंदापूर) हे आपल्या कुटुंबासह ठेकेदार बालाजी देशमुख यांच्याबरोबर केबल टाकण्याचे मजुरीचे काम करण्यासाठी राजवडी पाटी येथे राहण्यास आले होते. सोमवार (ता. 24) रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान त्यांची मुलगी सारिका ही शेजारी असलेल्या विहारीवरती पाणी आणण्यासाठी गेली होती. यावेळी ती पाय घसरून पाण्यात पडली.
बराच वेळ घरी न आल्याने तिचा शोध सुरू झाला. यावेळी तिने आपल्या सोबत नेलेल्या काही वस्तू विहिरीच्या कडेला आढळून आल्या. त्यानंतर पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतील पाण्याचा साठा कमी करीत मुलीचा शोध सुरू करण्यात आला. तब्बल सात तासाच्या प्रयत्नानंतर शोध कार्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या दोन तरुणांना मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढत उपजिल्हा रुग्णालय येथे पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला.
दरम्यान, घटना घडल्याची माहिती मिळाल्यापासूनच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन खुडे आणि इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ई. राऊत यांसह त्यांच्या सहकारी पथकाने घटनास्थळी स्वतः थांबून शोध कार्य राबवले.
दरम्यान, घटना घडण्याच्या चार दिवस आधीच बिजवडी ग्रामपंचायतीच्या वतीने ज्यांची विहीर आहे. त्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला पत्र देऊन राजवडी जिल्हा परिषद शाळा वॉल कंम्पाऊंड समोर रस्तालगत कारखान्याची पडीक विहीर असून ती विहीर पाण्याणे पूर्णपणे भरलेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला येणारी मुले ही तेथूनच ये-जा करत असतात. त्यामुळे एखादी वाईट घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ती विहीर बुजविण्यात यावी किंवा त्या विहिरीला उंच रिंग बांधण्यात यावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व राजवडी ग्रामस्थांची आहे, असे पत्र देण्यात आले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.