नवी दिल्ली : भारत २०३०-३१ पर्यंत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर वार्षिक ६.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे, असे जागतिक पतमानांकन संस्था ‘एस अँड पी ग्लोबल’ने आज जाहीर केलेल्या ‘इंडिया फॉरवर्ड : इमर्जिंग पर्स्पेक्टिव्ह’ या अहवालात म्हटले आहे.
या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ८.२ टक्के विकासदरासह भारताने प्रगती केली. आता वेगवान वाढ कायम ठेवण्यासाठी व्यवसाय, व्यापार आणि लॉजिस्टिक्स सुधारण्यासाठी, खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि सार्वजनिक भांडवलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी निरंतर सुधारणा महत्त्वपूर्ण आहेत.
शेअर बाजार वेगवान आणि स्पर्धात्मक राहण्याची अपेक्षा आहे. मजबूत वाढीची शक्यता आणि चांगले नियमन, आणि देशाने प्रमुख उदयोन्मुख बाजार निर्देशांकांमध्ये सामील झाल्यापासून भारतीय सरकारी रोख्यांमध्ये परकी चलन वाढले असून, यात आणखी वाढ अपेक्षित आहे. व्यापार फायदे वाढवण्यासाठी, भारताने पायाभूत सुविधा आणि भू-राजकीय धोरणे विकसित करणे आवश्यक आहे, विशेषत: त्याच्या विस्तृत किनारपट्टीबाबत, असे म्हटले आहे.
भारताचा जवळपास ९० टक्के व्यापार समुद्रमार्गे आहे, वाढती निर्यात आणि मोठ्या प्रमाणात कमोडिटी आयात व्यवस्थापित करण्यासाठी मजबूत बंदर पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. देशांतर्गत ऊर्जेच्या वाढत्या मागणीचा सामना करावा लागत आहे आणि ऊर्जा संक्रमण योजनांसह ऊर्जा सुरक्षितता संतुलित करण्यासाठी हरित आणि कमी उत्सर्जन इंधनांसह शाश्वत तंत्रज्ञानाकडे लक्ष देण्याची गरज आहे,
असेही या अहवालात नमूद केले आहे. पायाभूत सुविधा आणि उत्पादकता सुधारण्यासाठी कृषी प्रगत तंत्रज्ञान आणि नव्या धोरणांवर अवलंबून असेल. अन्न सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी सिंचन, साठवण आणि पुरवठा वितरण यासारख्या गंभीर पायाभूत सुविधांच्या समस्या सोडविण्याची गरज आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.