Stock Market Scam Exit poll Sakal
Share Market

Stock Market Scam: एक्झिट पोलच्या माध्यमातून शेअर बाजारात घोटाळा झाला का? काय म्हणतात तज्ञ?

राहुल शेळके

Stock Market Scam Exit poll: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी सायंकाळी 6 वाजता संपले. यानंतर, विविध मीडिया हाऊसद्वारे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले, ज्यामध्ये भाजप आणि एनडीए प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर सोमवार, 3 जून रोजी शेअर बाजार उघडला आणि एक्झिट पोलच्या अंदाजाच्या प्रभावामुळे बाजारात विक्रमी वाढ दिसून आली.

3 जून रोजी, निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक 2000 अंकांच्या वाढीसह उघडला होता आणि दिवसाच्या व्यवहारादरम्यान त्याने 76,738.89 च्या नवीन सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला होता. BSE सेन्सेक्स 2507.47 अंकांच्या किंवा 3.39% च्या वाढीसह 76,468.78 वर बंद झाला.

त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 600 अंकांच्या वाढीसह उघडला आणि काही वेळातच 23,338.70 या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. संध्याकाळी, निफ्टी 733.20 अंक किंवा 3.25% च्या वाढीसह 23,263.90 वर बंद झाला. 3 जून रोजी शेअर बाजारातील या वाढीमुळे गुंतवणूकदारांनी सुमारे 13 लाख कोटी रुपये कमावले होते.

निवडणूक निकालाच्या दिवशी काय झाले?

मंगळवार, 4 जून रोजी सकाळी 8 वाजता निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलनुसार आले नाहीत. त्यामुळेच शेअर बाजारात त्सुनामी आली आणि सेन्सेक्स-निफ्टी प्रचंड घसरला.

सकाळी 9:15 वाजता व्यवहार सुरू होताच, घसरणीचा ट्रेंड सुरू झाला आणि वाढतच गेला. BSE सेन्सेक्स 1700 अंकांच्या घसरणीसह उघडला आणि दुपारी 12.20 पर्यंत तो 6094 अंकांनी घसरून 70,374 वर आला. त्याच वेळी, निफ्टी निर्देशांक सुमारे 1947 अंकांच्या मोठ्या घसरणीसह 21,316 च्या पातळीवर पोहोचला होता. अशाप्रकारे बीएसईचे मार्केट कॅप एकाच दिवसात सुमारे 31 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.

एक्झिट पोलद्वारे शेअर बाजारात घोटाळ्याचा आरोप

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन दिवसांनी 6 जून रोजी काँग्रेस पक्षाने शेअर बाजारात 30 लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या बाजारातील घसरणीला शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा म्हटले आहे. यासाठी त्यांनी थेट पीएम मोदी, अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला.

पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित करताना राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील जनतेला बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला का दिला? त्यांनी 4 जून रोजी शेअर बाजारात विक्रमी वाढ होण्याची आशा का निर्माण केली?

पंतप्रधान, गृहमंत्री, त्यांच्यासाठी काम करणारे एक्झिट पोल आणि मीडिया यांनी मिळून देशातील सर्वात मोठा 'स्टॉक मार्केट घोटाळा' करण्याचा कट रचला, ज्यामुळे एकाच दिवसात 5 कोटी छोट्या गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

या प्रकरणाची जेपीसी चौकशीची मागणी करत काँग्रेस नेते म्हणाले, "आम्ही या प्रकरणाच्या जेपीसी चौकशीची मागणी करतो. एक जेपीसी स्थापन करून या 'गुन्हेगारी कृत्या'ची चौकशी झाली पाहिजे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

शेअर बाजारातील गुंतवणूकदार मुकुल शाह यांनी यावर मत व्यक्त केले आहे. मुकुल 2012 पासून म्हणजेच गेल्या 12 वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहे. ते म्हणाले, "हा घोटाळा नाही. मोदी सरकार आल्यावर शेअर मार्केट वर जाणे साहजिक आहे. एक्झिट पोलचे निकालही तेच दाखवत होते. आता शेअर बाजार वर जात आहे. प्रत्येक सेकंदाला, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना कधीही तोटा होत नाही, खरं तर आम्ही 3 जूनला नफा कमावला आणि 4 जूनला आमचे जुने शेअर्स स्वस्तात विकले.

शेअर मार्केट तज्ज्ञ मुकुल शाह यांनी सांगितले की, 4 जूनला त्या दिवशी ज्या शेअरची किंमत घसरली होती, ती आता दोन-तीन दिवसांत तेवढीच वाढली आहे. जवळपास सर्वच शेअर्स वाढले आहेत. जर एखाद्याच्या पोर्टफोलिओचे मूल्य 4 जून रोजी घसरले असेल तर ते आता पुन्हा समान झाले आहे. 5, 6 आणि 7 जून या तीन दिवसांत निफ्टी 1200 अंकांनी वाढला आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा जाहीर सल्ला देणे योग्य आहे का?

शेअर बाजारातील आणखी एक गुंतवणूकदार आशिष अग्रवाल म्हणाले, "एक्झिट पोल पीएम मोदींच्या बाजूने येताच शेअर बाजारात तेजी आली. कारण ते म्हणाले होते की, 'मी तिसऱ्या टर्मसाठी येताच शेअर बाजार वर जाईल.' आता त्या अपेक्षेने बाजार वाढला नाही त्यामुळे एक प्रकारे हा घोटाळाच आहे.

"नियमांनुसार, कोणतीही खाजगी किंवा सरकारी व्यक्ती शेअर बाजारातील चढ-उताराबद्दल जाहीरपणे बोलू शकत नाही. शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला कोणीही देऊ शकत नाही. हा सेबीचा नियम आहे. जर कोणी तसे केले तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. SEBI द्वारे केवळ नोंदणीकृत संशोधन विश्लेषक याबद्दल बोलू शकतात."

आशिष अग्रवाल पुढे म्हणाले, "पीएम मोदींनी ही चूक केली आहे. यापूर्वी त्यांनी पीएसयूमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला होता. ते म्हणाले होते की, विरोधी लोक ज्या कंपनीचा गैरवापर करतील, तुम्ही त्या कंपनीत पैसे गुंतवा.''

मात्र, लोकसभा निवडणुकीच्या दिवशी 30 लाख कोटींचे नुकसान झाले नसल्याचेही आशिष अग्रवाल यांनी सांगितले. हे त्या दिवशी कमी झालेले बाजारमूल्य आहे. हे गुंतवणूकदारांचे नुकसान नाही. जर नुकसान झाले असते तर जेमतेम 20 लाख रुपये झाले असते.

काँग्रेसच्या आरोपांवर भाजप काय म्हणाले?

भाजप नेत्यांनीही पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते पियुष गोयल म्हणाले की, राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत. 3 जून रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी 6850 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आणि दुसऱ्या दिवशी ते स्वस्तात विकले, त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. भारतीय गुंतवणूकदारांनी 4 जून रोजी घसरणीच्या दिवशी शेअर्स खरेदी केले. त्यांनी स्वस्तात शेअर्स खरेदी करून नफा कमावला.

पियुष गोयल पुढे म्हणाले की, शेअर बाजारात चढ-उतार होत असतात. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारच्या कार्यकाळात शेअर बाजाराचे मार्केट कॅप 5 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. भारताचा शेअर बाजार हा जगातील टॉप-5 बाजारांपैकी एक आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात PSU चे बाजार भांडवल चार पटीने वाढले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT