Food Culture esakal
सप्तरंग

Food Culture - अंतर्नाद : माणूस, मांसाहार आणि मिथक

राहुल गडपाले

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालानुसार भारतातील ७० टक्के लोक मांसाहारी आहेत.

कंदमुळे उकरून खाण्याबरोबरच, अळ्या आणि किड्यांसोबतच उंदीर, घुशी, ससे, लहान-मोठे पक्षी यांची शिकार करून माणूस खायला लागला. माणूस आज इतर प्राण्यांपासून वेगळा गणला जातो तो त्याच्या मेंदूच्या विकासामुळे. खरे तर त्याच्या मेंदूचा विकास होऊ शकला तो मांसाहारामुळेच. कारण मानवाच्या शरीरातील मेंदू हे ऊर्जेच्या बाबतीत शरीरातील सर्वात महागडे अंग आहे. वाढीव मांसाहाराशिवाय माणसाच्या मेंदूची (Brain) वाढ झालीच नसती, हे आजवर अनेक संशोधकांनी ठासून सांगितले आहे.

आपण मात्र आजही माणसाच्या खाण्याच्या सवयीवरून त्याच्यात भेदभाव करायचा प्रयत्न करतोय, वाद घालतोय. प्राणीहत्येचे पाप टाळण्यासाठी जर आपण मांसाहाराचा विरोध करत असू, तर मांसाहार करणाऱ्याला मारून टाकणे कुठल्या पाप-पुण्याच्या चौकटीत बसते, याचा विचार करायला हवा. जंगलातील वणव्यांमधून माणसाला आगीचा खरा उपयोग कळला. वणव्याच्या आगीने भाजलेल्या धान्याच्या ओंब्याची चव सुधारल्याची जाणीव त्याला झाली. आगीत शिजवलेले मांस खायला अधिक रुचकर लागते, शिवाय ते मुलायम होते हेदेखील त्याला कळले.

मक्याची कणसे भाजली की आणखी गोड होतात हे कळले. आगीचा उपयोग कळला. माकडे, कपी, पिथेकस आणि होमो अशा आपल्या पूर्वजांनाच या सत्याचा बोध झाला होता. पुढे माणसाने आपल्या आद्य रूपात अग्नीवर नियंत्रण मिळवले. पुढे चुली, भांडी अशा रीतीने त्याची खाद्यसंस्कृती आकाराला येत गेली, विकसित झाली. मूळ काय, तर माणूस काय खातो हे त्याच्या तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून होते.

माणसाच्या बुद्धी कोषात, डोक्यात जशी शेकडो गुपिते दडलेली आहेत तशीच ती त्याच्या पोटातही असतातच. आपण डोक्याने वागतो, विचार करतो, खस्ता खातो... आपली मेहनत चालू असते त्या वीतभर पोटासाठी, भुकेसाठीच. ही भूक माणसाला काही स्वस्थ बसू देत नाही. विचारांची भूक बरीच उशिरा येते; पण जन्माला आल्यापासून पोटाची भूक आपला पिच्छा सोडत नाही. जन्माला आल्या आल्या जो पहिला ट्याहा ऐकायला येतो तोदेखील असतो त्या पोटासाठीच. एकंदरीतच काय, तर माणसाच्या जन्माची चित्तरकथा मांडायची असेल, तर त्याच्या पोटाचे माप काढल्याशिवाय ते जमायचे नाही. म्हणूनच आपल्या कर्माच्या कहाणीची कारणमीमांसा करताना माणसे पोटाच्या आगीला ‘पापी पेट’ अशी उपमा देत असावीत. या पोटासाठी माणूस काय वाट्टेल ते करायला तयार असतो. आपल्या पूर्वजांनी किडे, अळ्या खाण्यापासून सुरू केलेला हा पोटाचा प्रवास तसा खूप दूर येऊन पोहोचला आहे.

आपल्या खाण्याच्या गरजेने आता खाद्यसंस्कृतीचे (Food Culture) रूप धारण केले आहे; पण तरीही माणसांना आपल्याच या संस्कृतीविषयी प्रश्न पडायला लागले आहेत. मांसाहार हा मुळात आपला आहार नाहीच, अशी एक नवी मांडणी काही जण करू पाहताहेत. ज्या आधारावर ते ती मांडणी करू पाहतात त्याच आधारावर ती खोडूनही काढता येते, हे मात्र ते पुरते विसरतात. खाण्याचा संबंध काहीही करून धर्माशी जोडायचा एवढाच त्यांचा प्रयत्न असतो; पण तसे केल्याने सत्य बदलत नाही. माणसाने स्वतःच्या विकासासाठी जो काही एकूण वेळ खर्ची केला असेल त्यातील बहुतेक वेळ हा बहुधा त्याने अन्नासाठी घालवलेला असावा, असे म्हटले जाते ते काही वावगे नाही. खरे तर भूक ही माणसाची नैसर्गिक गरज आहे. त्यामुळे निसर्गातच त्याच्या या प्रश्नाचे उत्तर सामावलेले आहे. प्राण्यांच्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीनुसार आणि त्याच्या शरीराच्या गरजेप्रमाणे तो आपल्या पोटाची आग विझवतो.

पोटाला भूक हा काय तो एकच धर्म माहीत असतो. पोटाची आग शमली की झाले. पोट त्यात काळंबेरं करत नसतंय कधी. आपण मात्र आपल्या डोक्यातली जात पोटातही आणली. आता लोक पोटाचाही धर्म ठरवायला लागले आहेत. आपल्याकडे शाकाहारी, मांसाहारी, अर्धमांसाहारी, फक्त अंडी खाणारे, कांदा-लसून न खाणारे, दुग्धजन्य पदार्थ वगळता फक्त शाकाहारी खाणारे असे अनेक प्रकार आहेत. त्यात आता आणखी एका नव्या संप्रदायाची भर पडली आहे. हा संप्रदाय डोके खाणारा आहे. त्यांना माणसाच्या खाण्या-पिण्यातही रंग दिसतो आणि रंग दिसला की मग धर्म आहेच बोट दाखवायला; पण आपल्या खाण्याची आणि धर्माची सांगड मांडण्याचा केला जाणारा प्रयत्न हा फुटकळ तर आहेच तेवढाच तो अज्ञानाचे व संदेहाचे ओझे वाहणाराही आहे. त्यात भर घालायला आता समाजमाध्यम नावाचे अजब रसायन जोडीला आहेच.

राजकारणी त्याचा मग पुरेपूर उपयोग करतात आणि खाण्याच्या नावाखाली स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेतात. मात्र, असे असले तरी माणूस मुळात शाकाहारी की मांसाहारी, हा प्रश्न उरतोच. त्याच्या मुळाशी जाऊन कुणीही काही जाणून घेण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे मग असे प्रश्न अनुत्तरित राहतात. अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या माणसाला अन्नाचा साठा करण्याची बुद्धी सुचली. त्याही पूर्वी तो शिकारीने अन्न मिळवायला शिकला. त्यानंतर त्याला अन्न संकलनाची अक्कल आली. संकलन करतानाच त्याने मग स्वतःसाठी अन्न उगवायला सुरुवात केली. त्यासाठीची कला त्याने विकसित केली. कंदमुळे उकरून खाण्याबरोबरच, अळ्या आणि किड्यांसोबतच उंदीर, घुशी, ससे, लहान-मोठ्या पक्ष्यांची शिकार करून तो खायला लागला. त्या शिकारीच्या कामासाठीच त्याला हत्याराची गरज पडायला लागली. त्याकरिता मग त्याने हत्यारे बनवायला सुरुवात केली.

माणूस आज इतर प्राण्यांपासून वेगळा गणला जातो तो त्याच्या मेंदूच्या विकासामुळे. मुळात त्याच्या मेंदूचा विकास होऊ शकला तो मांसाहारामुळेच. कारण मानवाच्या शरीरातील मेंदू हे ऊर्जेच्या बाबतीत शरीरातील सर्वात महागडे अंग आहे. वाढीव मांसाहाराशिवाय माणसाच्या मेंदूची वाढ झाली नसती, हे आजवर अनेक संशोधकांनी ठासून सांगितले आहे. रॉबर्ट आर्ड्रेने याबाबत बरेच काही लिहून ठेवले आहे. २.९ ते ३.९ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या ऑस्ट्रेलोपिथेकसांच्या अन्नातही मांसाहाराचा समावेश असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. आज माणसांच्या जवळचे म्हणून मानल्या जाणाऱ्या चिंपाझींच्या आहारातल्यापेक्षाही हे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले जाते. एवढेच नाही, तर अरण्यात, दाटीवाटीच्या जंगलात राहत असल्यामुळे वाघ, सिंहांसारख्या मोठ्या आणि शुद्ध मांसाहारी प्राण्यांच्या खाण्यातला वाटाही ते घेत असतील, असे सांगितले जाते.

जंगलामध्ये लागलेल्या वणव्यांमधून माणसाला आगीचा खरा उपयोग कळला. वणव्याच्या आगीने भाजलेल्या धान्याच्या ओंब्याची चव सुधारल्याची जाणीव त्याला झाली. आगीत शिजवलेले मांस खायला अधिक रुचकर लागते, शिवाय ते मुलायम होते हेदेखील त्याला कळले. मक्याची कणसे भाजली की आणखी गोड होतात हे कळले. आगीचा उपयोग कळला, मात्र ती नियंत्रित ठेवण्यासाठीचे तंत्र त्याला आत्मसात करावे लागले. माकडे, कपी, पिथेकस आणि होमो अशा आपल्या पूर्वजांनाच या सत्याचा बोध झाला होता. पुढे माणसाने आपल्या आद्य रूपात अग्नीवर नियंत्रण मिळवले. पुढे चुली, भांडी अशा रीतीने त्याची खाद्यसंस्कृती आकाराला येत गेली, विकसित झाली. मूळ काय तर माणूस काय खातो हे त्याच्या तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून होते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते त्याच्या भूकेवर अवलंबून होते. त्याला उपलब्ध होणाऱ्या अन्नातून तो स्वतःला जे मिळेल ते खायला लागला. हे करताना आपल्या पूर्वजांनी अळ्या आणि किडे-मुंग्या खाण्यापासून सुरुवात केली. आपण पूर्वी किडे-मुंग्या खात होतो, असे सांगितले की हल्ली लोक नाक मुरडतात आणि अंतिमतः ती चर्चा मांसाहार हा मुळात मनुष्याचा आहारच नाही इथवर येऊन पोहोचते. हे सिद्ध करायला अनेक पुरावे आहेत. मानवाच्या उत्क्रांतीच्या निरनिराळ्या टप्प्यांच्या अभ्यासातून हे पुरावे आपल्याला प्राप्त झाले आहेत. मात्र, असे असले तरी आंधळ्या मूर्खत्वाचे सोंग पांघरलेल्यांना त्याची जाणीव होत नाही. कारण माणूस शाकाहारी होता की मांसाहारी, हा विषय आता केवळ मानवी उत्क्रांतीशी निगडित राहिला नाही; तर त्याला धर्माची सांगड घातली गेली आहे. हे एवढ्यावरच थांबलेले नाही, तर माणसाच्या खाण्या-पिण्याच्या सवयीवरून त्याची पातळी मोजण्याचे काम समाज नावाच्या व्यवस्थेतील काही बिलंदरांनी सुरू केले आहे.

त्यातून विषमतेची नवी कवाडे खुली झाली आहेत. ही कवाडे वेळीच बंद झाली नाहीत, तर दुफळीसाठी आणखी एक कारण पुढे येईल. खाण्या-पिण्याच्या सवयींवरून केला जाणारा भेदभाव, त्यातून होणारी भांडणे आणि हिंसाचार आता वाढतो आहे. त्याची तीव्रता इतकी आहे, की हिंदुत्वाचे ब्रॅंड ॲम्बेसेडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांना त्याची दखल घ्यावीशी वाटली. अलीकडेच पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनीच हे खा, ते खा किंवा खाऊ नका, शिवू नका, हे सांगणे म्हणजे हिंदू धर्म नाही, असे विधान केले. हिंदू धर्म हे केवळ नाव नाही, तर एका विचाराने जगणारे आणि सर्वांना स्वीकारणारे उदात्त विशेषण आहे, असेही ते या वेळी म्हणाले; पण अंधभक्तांच्या डोळ्यात त्यांच्या सांगण्यानेही अंजन पडणार नसेल, तर त्या विशेष डोळ्यांसाठी निराळी प्रकाशमाळ ओवावी लागेल, त्यासाठी हा प्रपंच. माणूस हा या विश्वाशी स्वैरचेतनेने जोडलेला एक पूल आहे आणि तो आजही भक्कम आहे.

मात्र, काही किरकोळ यष्टीचे लोक तो जीर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यातील त्यांचा हेतू हा केवळ काही विशिष्ट लोकांची भलामण करणे आणि त्यातून संधीसाधूपणा करण्याकडे असतो. ज्या देशातील निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या मांसाहार करते, त्या देशाचा जगात शाकाहारी देश म्हणून प्रचार करण्याचा प्रयत्न होतोय, हे विशेष आहे. यावरूनच त्यांना काहीतरी निराळे साध्य करायचे आहे हे दिसते. कुणाच्या तरी हत्येचे पाप नको म्हणून मांसाहाराला विरोध केला जातो; दुसरीकडे मात्र तेच लोक मांसाहार करणाऱ्या व्यक्तीची हत्या करतात. जंगलात प्राण्यांमध्येही अन्नावरून भांडणे होतात. ती भांडणे अस्तित्वासाठीची भांडणे असतात. त्याचा जगण्याला उपयोग असतो. आपल्या भांडणांमध्ये मात्र कुणी काय खावे आणि काय खाऊ नये, हे बळजबरीने ठरवले जाते.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालानुसार भारतातील ७० टक्के लोक मांसाहारी आहेत. असे असतानाही केवळ धर्माचे नाव सांगून लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर बंधने आणणे कितपत योग्य आहे? पण असे असले तरी २०१४ नंतर भारतात या विषयावरून होणारे वाद वाढत आहेत. माणसाच्या विकसित होण्याच्या उत्क्रांतीच्या तत्त्वाच्या मुळाशी त्याची खाद्यसंस्कृती आहे. तिला पूर्णपणे नाकारण्याचा प्रयत्न जे लोक करताना दिसतात त्यांनी यज्ञांमध्ये दिल्या जाणाऱ्या आहुतीलाही तेवढाच विरोध करायला हवा. मात्र, विरोध हा जर केवळ सोईचा असेल, तर त्यातून होणारी सामाजिक हानी न भरून निघणारी असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Retention : MS Dhoni अनकॅप्ड खेळाडू, परदेशी खेळाडूंवर बंदीची तलवार... BCCI ने जाहीर केले ८ महत्त्वाचे नियम

IND vs BAN 2nd Test : दुसऱ्या दिवसावर पडलं पावसाचं पाणी, भारतात ९ वर्षांनी पहिल्यांदाच असं झालंय

Manoj Jarange: यंदा मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'येथे' होणार भव्य-दिव्य कार्यक्रम, उद्या बीडमध्ये बैठक

IND vs BAN: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या कॅप्टन, तर 150 kmph वेगात बॉलिंग करणाऱ्या मयंक यादवलाही संधी

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार'' राज ठाकरेंनी मांडलं गणित

SCROLL FOR NEXT