Nandurbar News : तत्कालीन संयुक्त धुळे जिल्ह्यातील नंदुरबार परिसराची ओळख होती. स्वतंत्र जिल्हानिर्मितीचे स्वप्न साकार होण्याचे कधी सत्यात येईल, असे येथील जनतेला कधी वाटलेही नव्हते.
अशा या स्वतंत्र जिल्हानिर्मितीचे स्वप्न १ जुलै १९९८ ला तत्कालीन मंत्री व विद्यमान पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नातून प्रत्यक्षात साकार झाले. या जिल्हानिर्मितीनंतर २५ वर्षांत सर्वच पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना सोबत घेत डॉ. गावित यांनी विकासाची घोडदौड सुरूच ठेवली. (name of Nandurbar as developed district is underlined on map of country nandurbar news)
शनिवारी (ता. १ जुलै) नंदुरबार जिल्ह्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. जिल्हानिर्मितीच्या गेल्या २५ वर्षांत येथील सर्वच क्षेत्रांतील प्रगतीची वाटचाल थक्क करणारी ठरली आहे. त्यामुळेच नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना जनतेतून संबोधले जाते.
कागदावरच्या योजना प्रत्यक्षात आणल्या
सातपुड्याचा पायथ्याशी असलेला अतिदुर्गम-आदिवासी भाग, ना धड रस्ते, ना गाव पाड्यांमध्ये वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगाराची साधने, दळणवळणाची सुविधा नाही, ना शेतकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, बॅंका नाहीत. शासनाच्या अनेक योजना केवळ वर्षानुवर्षे कागदावरच राबविल्या गेल्या, तर अनेक विकासाची स्वप्ने कागदावरच दाखविली गेली.
असा हा अविकसित भाग म्हणून देशाच्या नकाशावर अधोरेखित असलेला तत्कालीन संयुक्त धुळे जिल्ह्यातील नंदुरबार परिसराची ओळख होती. तत्कालीन शिवसेना-भाजप युतीच्या शासनात मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री दिवगंत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मंत्रिमंडळात अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले डॉ. विजयकुमार गावित यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यांनी शासनाकडे नंदुरबार जिल्हानिर्मितीचा प्रश्न लावून धरला. त्यामुळे ३० मार्च १९९८ ला मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी विधानसभेत नंदुरबार जिल्हानिर्मितीची घोषणा केली आणि या घोषणेने सर्वांना दिलासा मिळाला. मात्र जिल्हानिर्मितीचा अध्यादेश काढण्यासाठी डॉ. विजयकुमार गावित यांनी तगादा लावला. त्यानंतर १ जुलै १९९८ ला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी नंदुरबार येथे येऊन नंदुरबार जिल्हा म्हणून अस्तित्वात आल्याची घोषणा केली. त्यानुसार शनिवारी (ता. १ जुलै) नंदुरबार जिल्हानिर्मितीस २५ वर्षे पूर्ण होत आहेत.
विविध शासकीय कार्यालये
जिल्हा निर्मितीची २५ वर्षांतील काही काळ वगळता मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी जिल्ह्याचे प्रशासकीय संकुल, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषदेची इमारत, जिल्हा न्यायालयाची इमारत, जिल्हा ग्राहक मंच, शासकीय ग्रंथालय, तहसील व उपविभागीय कार्यालयांच्या इमारती, शासकीय कृषी महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या निर्मितीसह सार्वजनिक बांधकाम भवन यासह सर्वच विभागांची स्वतंत्र कार्यालये, स्वतंत्र इमारती जिल्ह्यात सुरू केल्या आहेत.
वाढत्या दळणवळण आणि सिंचनाच्या नव्या संधींमुळे राज्यातील नवनिर्मित जिल्ह्यातील अग्रगण्य विकसित जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख देशात व राज्यात झाली आहे.
राज्यातील सर्वाधिक आदिवासीबहुल जिल्ह्यांपैकी म्हणून एक हा जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यासह राज्यातील आदिवासी बांधवांचे सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिकदृष्ट्या वेगळे वैशिष्ट्य आहे.
जिल्ह्याचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी केंद्र सरकार व राज्य शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक उपाययोजना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विविध यंत्रणांच्या माध्यमातून हाती घेतल्या आहेत.
येथील आदिवासी बांधवांसह सर्व समुदायांतील नागरिकांना त्यांच्या पायावर भक्कमपणे उभे करून स्वावलंबी करण्याचा, त्यांच्या सर्वांगीण विकासाचा २५ वर्षांपूर्वी सोडलेला संकल्प आज साकार होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय याचा मला सार्थ अभिमान आहे, असे पालकमंत्री यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते.
शेतकऱ्यांसाठी योजना
नंदुरबार हा शेतीप्रधान जिल्हा आहे. ‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ असे म्हटले जाते. त्याप्रमाणे संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सुखी आणि समाधानी कसा राहील यासाठी शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत.
पालकमंत्री डॉ. गावित या भागातील रस्तेविकासासह पूलदुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देत असून, गाव-पाड्यातील रस्ते मुख्य रस्त्यांशी जोडले जाणार आहेत. आदिवासी भागातील गाव, वाडे-वस्त्यांवर आरोग्य, पाणी, वीज
यांसारख्या मूलभूत सविधा पुरविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. आदिवासी विकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, नवे वाळू वितरण धोरण, मुख्यमंत्री सहाय्यक कक्ष, ग्रामपंचायतींचा विकास, जलजीवन मिशन जलयुक्त शिवार २.०, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवून नंदुरबार जिल्हा रौप्यमहोत्सवी वर्ष पूर्ण करत असताना इतर विकसित जिल्ह्यांच्या रांगेत जाऊन बसला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.