Nashik News : महायुतीच्या सरकारने दोन वर्षांत समाजातील सर्व घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी झपाट्याने निर्णय घेतले, त्यामुळे हे सर्वसामान्यांचे सरकार असून, आम्ही फक्त फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधत नाही, तर त्यांच्यात जाऊन काम करतो, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. (Nashik Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray)
गेल्या दोन वर्षांत महायुतीने सिंचनाच्या १२२ योजनांना मंजुरी दिली. महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेची व्याप्ती पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत महाराष्ट्र राज्यात तब्बल आठ लाख कोटींची कामे सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या विचारांचे सरकार असेल तर प्रश्न लवकर सुटतात, म्हणून हेमंत गोडसे यांना साथ देण्याचे आवाहन नाशिकमधील व्यावसायिक संघटना, धार्मिक व सामाजिक संघटनांना केले.
शहरातील बांधकाम, वास्तुविशारद, नरडेको, धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक यांसारख्या विविध ५६ संस्थांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी (ता. १२) मनोहर गार्डनमध्ये संवाद साधला. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुहास कांदे, भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, ॲड. माणिकराव कोकाटे, प्रसिद्ध उद्योजक जितू ठक्कर, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींचे प्रश्न प्रथमतः जाणून घेतले. मुख्यमंत्री म्हणाले, की लवकरच नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत राज्य सरकारची बैठक होणार आहे. या बैठकीत विविध संघटनांना सहभागी करून घेतले जाईल. बांधकाम व्यावसायिकांचा मूळ प्रश्न असलेल्या इमारत पुनर्विकासाबाबत ठाणे आणि नाशिक यांच्यातील भेदभाव नष्ट करण्यात येईल. ‘म्हाडा’ची एनओसी रद्द करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. (latest marathi news)
जीवनदायी कॅशलेशचा विचार
शेतकऱ्यांना केंद्र सरकार सहा हजार रुपये अनुदान देते; तर यात राज्य सरकारही सहा हजार रुपये देणार असल्याने शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार आहेत, त्याचप्रमाणे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखावरून पाच लाखांपर्यंत वाढविली आहे.
त्यातील अटी आणि शर्ती काढून टाकत सर्व लोकांना म्हणजेच १०० टक्के व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळेल, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. भविष्यात कॅशलेस सुविधा या योजनेला उपलब्ध करून देता येईल का, याचाही विचार आपण करीत आहोत. घरपट्टीच्या संदर्भातील उद्योजकांनी उपस्थित केलेला मुद्दा आचारसंहिता संपताच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थांना शासन सर्वतोपरी मदत करणार आहे, त्यांची विभागणी करून ही मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिकांना केवळ इमारतींचे बांधकाम करणे एवढेच काम नसून, त्यांनी शहराच्या विकासात भर घालावी, यासाठी आयकॉनिक इमारती तयार होतील, हेही पाहावे.
अशा वास्तुविशारदांना इन्सेंटिव्ह देण्यात येईल. मुख्यमंत्री उद्योजकता विकास योजनेमार्फत ३५ टक्के सबसिडी दिली जाते, तसेच राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ जनतेला मिळावा म्हणून आपण ‘शासन आपल्या दारी’ या माध्यमातून देशातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले.
दावोस येथील उद्योजकांच्या मेळाव्यातून आपण पहिल्या टप्प्यात एक लाख ३७ हजार कोटींचा, तर दुसऱ्या टप्प्यात तीन लाख ७३ हजार कोटींचा करारही केला. देशातील उद्योजकांना महाराष्ट्र हा सुरक्षित वाटू लागल्यावरच त्यांनी येथे उद्योग उभारण्यास सुरवात केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग आपल्याकडे येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर ‘क्रेडाई’चे अध्यक्ष कृणाल पाटील, ‘नरेडको’चे प्रतिनिधी सुनील गवांदे, केमिस्ट असोसिएशनचे रत्नाकर वाणी, मंगल कार्यालय व लॉन्सचे अध्यक्ष सुनील चोपडा, क्वालिटी सिटीचे जितूभाई ठक्कर, शैक्षणिक क्षेत्रातून राजेंद्र निकम, द्राक्ष बागायतदार संघटना, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे राजेंद्र फड.
धान्य व्यापारी संघटनेचे प्रफुल्ल संचेती, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, क्रिकेट असोसिएशनचे समीर रकटे, केटरिंग असोसिएशनचे गाढवे, ‘सावाना’चे प्रा. फडके व रोटरी क्लबच्या प्रतिनिधींनी आपले प्रश्न मांडले. शिवसेनेचे उपनेते बोरस्ते यांनी सूत्रसंचालन केले. माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी आभार मानले.
समृद्धी महामार्ग बदल घडवेल
नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग नसून, संपूर्ण महाराष्ट्राचा जीवन मार्ग ठरणार आहे. या महामार्गालगत १८ ठिकाणी विविध प्रकारचे उद्योग उभारण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांसाठीही या मार्गावरून शेतमालाची वाहतूक करता येईल. वेअर हाउसच्या उभारणीतून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.