Water Shortage esakal
नाशिक

Nashik Water Shortage : सलग सोळाव्या महिन्यातही टॅंकरच्या पाण्यानेच भागते तहान!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पावसाळा सुरू होऊन महिना लोटला, सर्वत्र हिरवीगार शेती फुलली मात्र प्यायलाच पाणी नाही, अशी विचित्र परिस्थिती अवर्षणप्रवण तालुक्यात आहे. यामुळे सध्या ९४ गावे-वाड्यांवर टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहेत. विशेष म्हणजे सलग टँकरने पाणीपुरवठ्याचा १६ वा महिना सुरू असून वरुणराजाच्या अवकृपेने जलस्रोत कोरडेठाक असल्याने टंचाईची स्थिती भयावह आहे. (Due to delay of monsoon in yeola water supply by tankers )

ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या येवला तालुक्यात दर तिसऱ्या वर्षानंतर दुष्काळी परिस्थिती निर्माण होतेच, किंबहुना दरवर्षीही उन्हाळ्यात ५० हुन अधिक गावे-वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने एप्रिलमध्ये सुरू झालेले पाणी टँकर अद्यापही सुरूच आहेत. विशेष म्हणजे उन्हाळ्यात यंदा टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या सव्वाशेपर्यंत गेली होती.

यावरूनच दाहकता लक्षात येते. ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे ५० च्या आसपास गावे व वाड्यां टॅंकरमुक्त झाल्या ही सुखावह बाब असली तरी बाकीचा तालुका मात्र टंचाईने होरपळून निघाला आहे. तालुक्याचे जून ते ऑक्टोबरपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ५१२ मिलिमीटर आहे. इतका पाऊस झाला तर खरिपाची शाश्वती असते.

अर्थात गेल्या वर्षी ४२५ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे खरिपातील मका, कापूस, कांदे व इतर सर्वच पिके शेतातच करपून चारा झाला होता. भर पावसाळ्यात नदी, नाले विहिरी आदी जलस्रोत कोरडेठाक होते. परिणामी गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात चारही महिने टँकरने गावोगावी पाणीपुरवठा सुरू होता. (latest marathi news)

दिवाळीनंतर तर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत गेली. फेब्रुवारीनंतर ही संख्या शंभरावर जाऊन दिवसाला दोन ते तीन लाख रुपये निव्वळ पाणी पुरवठ्यासाठी खर्च करावे लागत होते, हीच परिस्थिती सध्या ही आहे. पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव वेळेत भरल्याने त्या लगतच्या सहा विहिरीवरून रोज शंभरावर टँकर भरून गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणीपुरवठ्याचा सलग सोळावा महिना सुरू असून या काळात कोट्यवधी रुपये निव्वळ टँकरवर खर्च करण्याची वेळ आली आहे. यंदा सुरवातीला आलेल्या पावसाने पेरण्या मार्गी लागल्या, मात्र अद्यापही नदी, नाले कोरडे असून भूजल पातळी खालावलेली असल्याने कुठल्याही जलस्रोताला पाणी आलेले नाही.

त्यामुळे आजही तालुक्यातील ५२ गावे, ४२ वाड्यांना ४५ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यासाठी रोज ९४ खेपा टँकरच्या गावोगावी ५ ते ३० किलोमीटरपर्यंत धावत आहेत. धरणातील पाणीसाठा अद्यापही वाढलेला नसून येथील साठवण तलावातही पाणीसाठा आटत असल्याने वेळेत धरणसाठा वाढविण्याइतपत पाऊस नसल्यास येणाऱ्या दिवसांची चिंता आत्ताच नागरिकांसह प्रशासनाला सतावत आहे.

१५ टँकर झाले बंद

अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही मात्र काही गावांत झालेल्या पावसाने अल्प प्रमाणात जलस्रोताला पाणी आल्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या पत्रानुसार तालुक्यात १५ टँकर बंद केले आहेत. छोटी दहा गावे तसेच छोट्या-मोठ्या अठरा वाड्यांवरील टँकर बंद केले आहेत. यात खरवंडी, देवदरी, रेंडाळे, ममदापूर गाव (तांडावस्ती सूरू).

नगरसूल (वस्त्याचे २ बंद, ५ सुरू), पिंपळखुटे बुद्रूक, भुलेगाव, देवठाण, अंदरसूल (२ वस्ती बंद, ३ सुरू), डोंगरगाव, गारखेडे, न्याहारखेडे खुर्द, लौकी, शिरसगाव, कानडी येथील टँकर बंद तसेच कमी केले आहेत. असे असले तरी पाऊस लांबल्यास येथे पुन्हा टँकर सुरू करण्याची वेळ येऊ शकते, असा अंदाज आहे.

"अद्यापही समाधानकारक पाऊस नाही, त्यामुळे प्रशासनाने टँकर बंद करण्याची घाई करू नये. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची वास्तवता भयानक आहे, त्यामुळे मागणीनुसार टँकर सुरू ठेवावे तसेच मुदतवाढ द्यावी." - नरेंद्र दराडे, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT