Narendra Modi, Priyanka Gandhi, Uddhav Thackeray, Sanjay Raut, Narayan Rane, Sushma Andhare esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : ‘भटकती आत्मा’, ‘नकली संतान’ ते ‘चोरांचे सरदार’व्हाया ‘टरबूज’! व्यक्तिगत टीका-टिपण्णीचा स्तर घसरला

सकाळ वृत्तसेवा

संजय वाघ : नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : राजकारण आणि निवडणुका म्हटलं, की आरोप-प्रत्यारोप या बाबी ओघाने येतातच. यापूर्वीही सभांच्या माध्यमातून विरोधकांवर आरोप केले जायचे, परंतु ते व्यक्तिगत किंवा खालच्या पातळीवरचे नसायचे. त्याला नैतिकतेचे अधिष्ठान असायचे. मात्र अठराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये यंदा प्रचाराचा स्तर मोठ्या प्रमाणात घसरल्याचे दिसून आले. (level of personal criticism has fallen in leaders)

‘भटकती आत्मा’, ‘नकली संतान’, ‘चोरांचे सरदार’ व ‘टरबूज’ अशा व्यक्तिगत टीका-टिपण्णीमुळे नागरिकांचे मनोरंजन तर झालेच, शिवाय सत्तेसाठी राजकारणी माणसे किती खालचा स्तर गाठू शकतात, याचे प्रत्यंतरही आले. दर पाच वर्षांनी निवडणुका येतात, पक्षीय स्तरावर अनेक घडामोडी घडतात, नाराजीनाट्य सुरू होते, कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पक्षांत आवक-जावक सुरू होते, बाशिंगवीरांचा हिरमोड झाला, की तिकीट देणाऱ्या पक्षातील प्रवेश सोहळा होतो, निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले जातात, राजकीय डावपेच आखले जातात, ‘ईडी’-'सीबीआय’चा धाक दाखवून नेत्यांना आपल्या पक्षात घेतले जाते, पक्ष फोडले जातात, चिन्हे बळकावली जातात, असे प्रकार आता राजकीय आखाड्यात नित्याचे झाले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रचाराचा शिमगा सुरू होतो. प्रत्येक निवडणुकीत अथवा राजकीय उलथापालथीनंतर आरोप-प्रत्यारोप पूर्वीही केले जायचे. व्यक्तिगत स्तरावर खोचक व बोचणारी टीका केली जायची, काहींना अविस्मरणीय अशी शेलकी विशेषणेही लावली जायची. त्यात लखोबा लोखंडे, टी. बाळू, मैद्याचे पोते, तेल लावलेला पहिलवान, हाऱ्या-नाऱ्या, वाकड्या तोंडाचा गांधी, कोंबडीचोर, सापाचं पिल्लू, घरकोंबडा, बेबी पेंग्विन, विषारी साप, मौनीबाबा, मौत के सौदागर, पप्पू, फेकू, चंपा ही विशेषणे लोक आजही विसरू शकलेले नाहीत.

विविध पक्षांतील नेत्यांच्या वागण्या-बोलण्यातील विसंगतीमुळे, शारीरिक ठेवणीवरून यंदाच्या निवडणुकीत अजून काही विशेषणांची भर पडली आहे. एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडून गुवाहाटीमार्गे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पक्ष व पक्षचिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातून हिरावण्यात यशस्वीही झाले. तीच गत शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची झाली. (latest political news)

पुतण्याने दगाबाजी करीत व शिंदे यांचा कित्ता गिरवित काही आमदारांना घेऊन राज्याच्या सत्तेत भागीदार झाले. त्यांनीही पक्ष व चिन्ह बळकावण्यात यश मिळविले. या सर्व षढयंत्रामागे भाजपच मुख्य सूत्रधार होता, हेही काही लपून राहिलेले नाही. ही जी काही राजकीय स्थित्यंतरे घडली, तेथून गद्दार, बाप चोरणारे, पन्नास खोके एकदम ओके असा राग व्यक्त होण्याचा प्रकार सुरू झाला. उद्धव ठाकरे यांनी ‘देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक’ अशा शब्दात फडणवीसांवर टीका केली, तेथून खऱ्या अर्थाने टीकेला धार येण्यास सुरुवात झाली.

नंतर लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीसह महायुती म्हणून तर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून मैदानात उतरले. वातावरण तापले, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना ‘भटकती आत्मा’, राहुल गांधी यांना ‘शहजादा’, उद्धव ठाकरे यांना ‘नकली संतान’ व ‘नकली शिवसेना’ असे संबोधून डिवचले. त्यानंतर शरद पवार यांनी मोदींना उत्तर देताना ‘तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’ अशा शब्दात विडा उचलला.

तर ठाकरे यांनी त्यांना ‘बेअकली’ म्हणत प्रत्त्युत्तर दिले. मोदींचा ‘शहेनशहा’ असा उल्लेख करीत प्रियांका गांधी म्हणाल्या, तुम्ही ज्यांना ‘शहजादा’ म्हणतात, त्या माझ्या भावाने कन्याकुमारीपासून काश्‍मीरपर्यंत चार हजार किलोमीटर अंतर पायी चालत शेतकरी, मजूर यांच्या समस्या जाणून घेतल्या. संजय राऊत यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली. ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘टरबूज’ असा, तर राऊत यांनी ‘चोरांचे सरदार’ असा उल्लेख केला. नारायण राणे यांनी ‘टरबूज’च्या अनुषंगाने ठाकरे यांची ‘वरवंटा’ म्हणत खिल्ली उडविली होती.

फडणवीस आणि आशिष शेलार यांनी राऊत यांना ‘पत्रकार पोपटलाल’ म्हणत चिमटे काढले. तसेच राज ठाकरे यांनी भाजपशी हातमिळवणी करून त्यांच्या व्यासपीठांवरून हजेरी लावली म्हणून शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी ‘सुपारीबाज’ असा उल्लेख करीत टीका केली. यांसह विविध विशेषणांद्वारे राजकीय नेत्यांनी महाराष्ट्रीयन मतदारांची करमणूक केली व स्वत:चे हसेही करून घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT