Nashik Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : गोडसे, वाजेंसह 2 महाराज नाशिकच्या आखाड्यात; करंजकर, अरिंगळेंसह 5 इच्छुकांची माघार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारीच्या आजच्या दिवशी शिवसेनेचे विजय करंजकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे निवृत्ती अरिंगळे यांच्यासह पाच इच्छुकांनी माघार घेतली. मात्र, शांतिगिरी महाराज व सिद्धेश्‍वरानंद सरस्वती यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यामुळे महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. (Five Candidates withdrew)

माघारीनंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातून ३१ उमेदवार रिंगणात असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना चिन्हवाटप केले. जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी (ता. ६) अखेरचा दिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच उमेदवारांची याठिकाणी गर्दी होती. शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले.

काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते गिरीश महाजन यांनीही शांतिगिरी महाराजांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तसेच शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते अजय बोरस्ते यांनीही महाराजांची भेट घेतली. रविवारी दिवसभर महाराजांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, शांतिगिरी महाराजांनी माघार घेण्यास नकार देत अपक्ष लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका घेतली. स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती यांच्या माघारीसाठी पालकमंत्री दादा भुसेंनी साकडे घातले.

मात्र, त्यांनीही उमेदवारी कायम ठेवली. उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले शिवसेनेचे (ठाकरे गट) विजय करंजकर यांनीदेखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे, वंचित आघाडीचे उमेदवार करण गायकर आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. (Latest Marathi News)

‘तो’ एक मिनिट अन्‌ जाधवांची धावपळ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईने अनिल जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. दुपारी तीनच्या सुमारास जाधव उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले. खासदार हेमंत गोडसे त्यांना घेऊन आले. पण मुदत संपण्यास अवघे काही मिनिटे बाकी असल्याने त्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.

जाधव कसेबसे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोचले. पण जिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिला. एवढी धावपळ करूनही अर्ज मागे घेतला जात नसल्याचे लक्षात येताच गोडसेंनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. अर्ज माघारीसाठी अजून काही सेकंद शिल्लक असल्याचे सांगत त्यांनी जाधवांचा अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर जाधवांचा अर्ज मागे घेण्यात आला.

शांतिगिरी महाराज रिंगणात

शांतिगिरी महाराजांनी माघार घ्यावी, यासाठी महायुतीचे पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराजांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. स्वत: उमेदवार हेमंत गोडसेंनीही यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांची शिष्टाई अपयशी ठरली आणि बाबाजी ‘बादली’ घेऊन रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या अडचणी वाढल्याचे चित्र आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातली उमेदवार

अरुण काळे (बसप), पराग वाजे (शिवसेना ठाकरे गट), हेमंत गोडसे (शिवसेना), अमोल कांबळे (राष्ट्रीय किसान बहुजन पक्ष), झुंजार आव्हाड (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), कमलाकर गायकवाड (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल), करण गायकर (वंचित बहुजन आघाडी), कांतिलाल जाधव (आंबेडकर राइट पार्टी ऑफ इंडिया).

जयश्री पाटील (सैनिक समाज पक्ष), दर्शना मेढे (प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष), भाग्यश्री अडसूळ (इंडियन पीपल्स अधिकार पक्ष), अपक्ष उमेदवार आरिफ मन्सुरी, कोळप्पा धोत्रे, गणेश बोरस्ते, चंद्रकांत ठाकूर, चंद्रभान पुरकर, जितेंद्र भाभे, तिलोत्तमा जगताप, दीपक गायकवाड, देवीदास सरकटे, धनाजी टोपले, प्रकाश कनोजे, शांतिगिरी महाराज, सचिनराजे देवरे, सिद्धेश्वरानंद सरस्वती, सुधीर देशमुख, सुषमा गोराणे, सोपान सोमवंशी.

यांनी घेतली माघार

किसन शिंदे

विजय करंजकर

निवृत्ती अरिंगळे

शशिकांत उन्हवणे

अनिल जाध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT