Nashik Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : गृहीत धरण्याची प्रवृत्ती नाशिककरांनी लाथाडली

विक्रांत मते

Nashik News : गेल्या साडे चार वर्षात राज्यातील राजकारणाची खिचडी झाली. त्यामुळे बदल अटळ होता. तो बदल नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी स्विकारला त्यातून सत्तांतरण घडून आले. नाशिकमध्ये एकदा निवडून आलेला खासदार पुन्हा येत नाही. परंतू मोदी लाटेने नाशिकमध्ये विक्रम मोडत हेमंत गोडसे यांना दोनदा निवडून दिले. त्यामुळे तिसऱ्यांदा निवडून येत हॅट्‌ट्रिक साधणारच हा आत्मविश्‍वास नाशिककरांनी मोडीतं काढत गृहीत धरण्याची प्रवृत्ती धुडकावली. (Nashik Lok Sabha Constituency)

गेल्या साडेचार वर्षांमध्ये राज्यातील राजकारण ३६० अंशात बदलले. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दोन तुकडे करत भाजपने विरोधकांचे पतन केले. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्याने नवा ट्रेंड आला, हा ट्रेंड भाजपनेदेखील त्यांच्याच पद्धतीने मोडून काढला. मात्र हा ट्रेंड मोडून काढत असताना महाराष्ट्रातील जनतेचा स्वभाव हा उत्तर भारतीय राजकारणाप्रमाणे नाही.

याचा विसर बहुदा भाजपच्या नेत्यांना पडला असावा. त्यामुळे मतदारांना त्यांनी गृहीत धरून राजकारणाचे प्यादे हलविले. मात्र महाराष्ट्रातील लोकांना गृहीत धरलेले चालत नाही. नाशिककरांनी देखील गृहीत धरण्याच्या प्रवृत्तीला नाकारल्याचे निकालावरून दिसून आले. नाशिक लोकसभा मतदारसंघावर अनेक वर्षांपासून ठाकरे नावाची पकड आहे. परंतु भाजप व मित्र पक्षांना हे लक्षात आले नाही. मतदारांना ग्राह्य धरल्याने ‘हम बोले सो कायदा’ संपुष्टात आला.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. त्यावेळी शिवसेनेने अचानक राजाभाऊ उर्फ पराग वाजे यांना उमेदवारी देऊन मोठा बॉम्ब टाकला. आपल्याला उमेदवारी मिळेल असे वाजे यांना देखील माहीत नव्हते. आर्थिक सक्षमतेसह अन्य कारणांनी वाजे यांनी उमेदवारी देखील नाकारली. मात्र अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करून वाजे यांना उमेदवारी स्वीकारण्यास सांगितले. उबाठा गटाकडून वाजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्ष संघटनेत नाराजी व्यक्त झाली.

मात्र दुर्लक्ष करण्यात आले. वाजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी देखील मनापासून काम केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेकडे संघटनेचे बळ असल्याने वाजे मतदारांपर्यंत पोहोचले. दुसरीकडे महायुतीचा उमेदवार लवकर जाहीर न झाल्याने वाजे यांना फायदा झाला. महायुतीकडून भाजपला नाशिकची जागा हवी होती. नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांचे नाव आघाडीवर होते. (latest marathi news)

मात्र भाजपने फारसा आग्रह धरला नाही. दुसरीकडे राज्यात ‘माधवं' पॅटर्न अंमलात आणायचा असल्याने भाजपने नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला देऊ केली व छगन भुजबळ हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली. मात्र भाजपला अनपेक्षित असलेला विरोध पक्षातूनच व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुरू झाला. त्यामुळे भुजबळ यांची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाला.

भुजबळ यांचा प्यादा म्हणून उपयोग करून घेण्याची चाल अंगलट आली. त्यांनी स्वतःच पुढाकार घेत निवडणुकीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केल्याने भाजपला हा दुसरा झटका बसला. वास्तविक भुजबळ यांनी उमेदवारी मागितलीच नव्हती, मात्र भाजपच्या नेत्यांनीच त्यांना आग्रह धरला त्यानंतर मात्र उमेदवारी जाहीर करण्यास विलंब केल्याने ही बाब भुजबळ यांच्या जिव्हारी लागली. परिणामी त्यांचे समर्थक दुखावले गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुत्र प्रेमामुळे नाशिकची जागा सोडली नाही, शेवटपर्यंत जागेचा आग्रह कायम ठेवला.

अखेरच्या क्षणी म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवस अगोदर हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. तोपर्यंत भुजबळ यांच्या समर्थकांनी देखील रान उठविले. गोडसे यांची उमेदवारी जाहीर करताना मुख्यमंत्री शिंदे यांना अनेकांच्या नाकदूऱ्या काढाव्या लागल्या. आता उमेदवार बदलण्याची वेळ नाही, विद्यमान खासदार मतदारांपर्यंत पोचले असल्याने त्यांनाच आपल्याला मदत करावी लागेल असे वन-टू-वन मुख्यमंत्र्यांना पाचही आमदारांशी बोलावे लागले.

गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराचा हवा तसा माहोल तयार करण्यात महायुतीला यश आले नाही. मुख्यमंत्र्यांना दोनदा नाशिकच्या फेऱ्या माराव्या लागल्या. गोडसे यांना प्रचारासाठी वेळ कमी मिळाला हे खरे असले तरी त्यांना काही गावांमध्ये विरोध झाला हे देखील तितकेच खरे आहे. महायुतीने एकजीवपणे काम न केल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेल्या. गोडसे यांनी त्याची वेळीच देखील घेणे गरजेचे होते.

सिन्नरकरांची एकजूट

नाशिक लोकसभा मतदारसंघाला सिन्नरमधून पहिल्यांदा राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने खासदार मिळाला. वाजे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर संपूर्ण तालुका त्यांच्या मागे उभा राहिला. विद्यमान आमदार हे महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असले तरी स्थानिक पातळीवर त्यांना राजकारण करायचे असल्याने त्यांना वाजे यांना पाठिंबा द्यावा लागला. त्या व्यतिरिक्त विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी शिल्लक राहणार नाही हा देखील दृष्टिकोन होता. सिन्नरमधील सर्वांनी एकजूट दाखवत वाजे यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. परिणामी सिन्नर विधानसभा मतदारसंघातून वाजे यांना विक्रमी आघाडी मिळाली.

ओबीसी-मराठा पॅटर्न

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील बऱ्याच मतदारसंघांमध्ये मराठा-ओबीसी वादाचा पॅटर्न दिसला. मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये चित्र वेगळे दिसले. वाजे यांच्या पाठीमागे मराठा समाज ७० टक्के उभा राहिला तर ओबीसी समाज देखील तेवढ्याच प्रमाणात उभा राहिल्याने मराठा ओबीसी संघर्षाला नाशिकमध्ये तिलांजली मिळाल्याचे दिसून आले.

शहरी भागात पेटली मशाल

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये सिन्नरसह इगतपुरी विधानसभा मतदार संघ आहे. त्या व्यतिरिक्त नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य व देवळाली हे चार विधानसभा मतदारसंघ शहरी भागात येतात. पूर्व पश्चिम व मध्य विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. तर देवळाली विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत. शहरी मतदारांवर खासदारकीचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे महायुतीचा उमेदवार येथे विजयी होईल असा होरा होता.

मात्र शहरी भागात देखील मतदारांनी मशाल पेटवली. पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये दहा हजार तीनशे, मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये ३८०० तर पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये २७ हजार मतांची आघाडी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना मिळाली. वास्तविक, लाखाच्या पुढे या तीनही मतदार संघामधून आघाडी मिळाली असती तर वाजे यांना विजय अवघड होता.

देवळाली विधानसभा क्षेत्रामध्ये तालुक्याचा भाग मोठ्या प्रमाणात आहे व येथे मराठा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मराठा मतदारांनी देखील मशाल पेटविल्याचे दिसून आले. शांतिगिरीजी महाराज गोडसे यांच्या मतांमध्ये वाटेकरी ठरतील असे दिसत होते. परंतू वाजे यांना मिळालेली मते लक्षात घेता तो फॅक्टर देखील कुचकामी ठरला. लोकांनीच निवडणूक हाती घेतल्याचे दिसले.

दलित-मुस्लिम फॅक्टरने विजयाचा मार्ग सुकर

सिन्नर व इगतपुरी विधानसभा वगळता शहरातील नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य व देवळाली मतदारसंघांमध्ये वाजे यांची कसोटी होती. यातील मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम व दलित मते निर्णायक आहेत. मुस्लिम व दलित मतदान एक गठ्ठा वाजे यांच्या मागे उभे राहिल्याने शहरातील एक मतदार संघात आघाडी घेता आली.

त्याव्यतिरिक्त पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये संमिश्र कौल दिल्याने ही बाब वाजे यांच्यासाठी लाभदायक ठरली. पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील निवडणुकीमध्ये जवळपास एक लाख सात हजारांचा लीड होता. तो लीड जवळपास ८० हजार मतांनी कमी करण्यात वाजे यांना यश आले. परिणामी विजयाचा मार्ग सुकर झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT