Nashik Lok Sabha Election esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : वाढीव 4 टक्क्यांवर महायुती-आघाडीचा दावा

संतोष विंचू

येवला : एकीकडे मोदींवरील प्रेम, हिंदुत्वाचा मुद्दा आणि पारंपरिक भाजपाचे मतदार विरुद्ध शेतकऱ्यांसह इतर घटकांची नाराजी आणि मुस्लिम बांधवांनी उस्फूर्तपणे केलेले मतदान अशा दोन वेगवेगळ्या गोष्टींमुळे येवला मतदारसंघात मतदानानंतरचे कवित्व आणि दावे-प्रतिदाव्यांना काहीसा ब्रेक लागला आहे. किंबहुना दोन्ही गटाकडून मताधिक्याचे दावे जरा दबक्या आवाजातच होत आहेत. (Nashik Lok Sabha Election)

मतदान संपल्यानंतर आता पारावरच्या गप्पा सुरू होऊन दोन्ही पक्षांच्या समर्थकाकडून दावेदारीचे कवित्व सुरू झाले आहे.जो-तो ज्याच्या-त्याच्या पद्धतीने राजकीय अंदाज लावून भाजपाच्या उमेदवार डॉ.भारती पवार तसेच राष्ट्रवादीचे भास्कर भगरे हे कसे विजय होणार हे आकडेवारीसह पटवून देत असल्याने जाणकारांचाही गोंधळ उडताना दिसत आहे.

भाजपच्या डॉ. पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार भगरे यांच्या समर्थकांकडून वीस ते पंचवीस हजाराचे मताधिक्य मतदारसंघातून मिळेल असे दावे होत आहेत. मात्र मतदान होण्यापूर्वी जितक्या ठामपणे दावे होत होते तो आवाज आता दबल्याचे दिसत आहे. नेमका अंदाज घेणेही समर्थकांना अवघड जात असून मताधिक्य अवघे १०-२० हजारापर्यंत राहील असे स्पष्ट चित्र दिसत आहे.

मागील तीनही लोकसभा निवडणुकीत येवलेकरांनी भाजपची पाठराखण करत २५ ते ५० हजाराच्या दरम्यान मताधिक्य मिळवून दिले होते. यावेळी मात्र मोदी नावाचा करिष्मा फारसा जाणवला नसल्याने विरोधाची अन्‌ नाराजीची सुप्त लाटही मतदारसंघात दिसून आली. येवला, लासलगाव, विंचूर या शहरांमध्ये सुशिक्षित मतदारांनी काहीसा भाजपकडे आपला कल वळविला असला तरी ग्रामीण भागात मात्र अनेक गावांनी राष्ट्रवादीच्या तुतारीला पसंती दिल्याचे सांगितले जात आहे.

हिंदुत्ववादी विचारांची मते मात्र ठामपणे भाजपच्या पाठीमागे उभी राहिली. किंबहुना अनेक शेतकऱ्यांनीही भाजपची पाठ राखण केल्याचे काही गावात दिसून आले. या उलट संविधानाच्या मुद्यावर दलित, मागास वर्गीयांची काही मते वंचितकडे वळाली तर भाजप -राष्ट्रवादीलाही पसंती मिळाली, ओबीसी मतांचेही असेच ध्रुवीकरण झाल्याचे दिसून आले. (latest marathi news)

या निवडणुकीत जातीय समीकरणाचा कुठलाच पगडा दिसला नाही, त्यामुळे मराठा समाजाची मते देखील दोन्हीकडे विभागली गेली.मुस्लिम समाजाचे मतदारसंघात सुमारे ३८ हजार मतदार असून सर्वच ठिकाणी रांगा लावून मुस्लिम बांधवांनी मतदान केल्याने ७० ते ७५ टक्के पर्यंत मतदान झाले आहे.

विशेष म्हणजे हे मतदान तुतारीला एकतर्फी झाल्याचे सांगितले जाते. अशा सगळ्या वातावरणात मताधिक्य गुलदस्त्यात गेले असून दोन्ही गटाकडून दावे करतांना जीभ चाचरत आहे, इतकी नेटाची लढाई मतदारसंघात झाली.किंबहुना मतदारांचा सुप्त कौल काय करेल यावरच येथील आघाडी, मताधिक्य अवलंबून राहणार आहे.

भाजपच्या पवार व राष्ट्रवादीचे भगरे यांनी मतदारसंघात केलेला एकएक दौरा व्यतिरिक्त फारसा प्रचारही येथे झाला नाही. लोकसभेची निवडणूक असताना एकही वरिष्ठ नेत्याची सभा या मतदारसंघात झाली नाही. विशेष म्हणजे भाजपसोबत मंत्री छगन भुजबळ यांची यंत्रणा होती. याउलट माजी आमदार मारोतराव पवार, संभाजीराजे पवार, आमदार नरेंद्र दराडे, युवा नेते कुणाल दराडे.

ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, माजी सभापती संजय बनकर हे चारही प्रमुख नेते तसेच लासलगाव येथील माजी आमदार कल्याणराव पाटील, युवा नेते जयदत्त होळकर,माजी सभापती शिवा सुरासे राष्ट्रवादीसोबत प्रचारात सक्रिय असल्याने त्याचाही फायदा भगरेना झालेला दिसला. या निवडणुकीची सावली विधानसभेच्या राजकीय गणितावरही पडणार असल्याने सर्वच नेते कसून कामाला लागले होते.

स्वतः भुजबळ यांनी सभा घेतली नसली तरी दोन-तीन वेळेस येऊन येथे प्रमुख पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठका घेत सूचना केल्या होत्या. भाजपचे पदाधिकारी डी.के.जगताप, प्रकाश दायमा, बाबा डमाळे, प्रमोद सस्कर, समीर समदडिया, आनंद शिंदे, मनोज दिवटे, नाना लहरे आदी सर्वच हेवेदावे विसरून प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसले.

कांद्याचे घसरलेले भाव, वाढलेला जीएसटी, महागाई-बेरोजगारी, नोकरदारांची जुनी पेन्शन तसेच शेतमालाच्या मुद्यावर शेतकऱ्यांची नाराजी मात्र स्पष्टपणे दिसून आली. त्याचवेळी शहरातील पारंपरिक जनसंघाच्या मतदारांनी मात्र, स्वयंस्फूर्तीने बाहेर पडत मतदान केले आहे. मतदारसंघात २०१९ ला ६१.१५ टक्के मतदान झाले होते.

मात्र त्या तुलनेत यावेळी सुमारे ४ टक्के मतदान वाढले असून ६५.३८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. अनेक गावात तर मतदारांपर्यंत उमेदवार पोहोचलेही नव्हते, तरीही उन्हाची तमा न बाळगता मतदार घराबाहेर निघाल्याने सर्वांना हायसे वाटले. यावेळी वाढलेली टक्केवारी कोणाच्या फायद्याची किंवा कुणाच्या तोट्याची याचा अंदाज बांधणे सध्यातरी मुश्कील आहे. मात्र दोन्ही बाजूंनी वाढलेल्या मतावर दावा होत आहे.

●असे झाले मतदान...

एकूण मतदान -

पुरुष - १६४५३५

महिला - १५००१३

एकूण - ३,१४,५४८

झालेले मतदान -

पुरुष - ११५४७२ (७०.१८ %)

महिला - ९०१९६ (६०.१३ %)

एकूण - २०५६६८ (६५.३८ %)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT