नाशिक : शहराच्या वाहतुकीच्या कोंडीला बेशिस्त वाहतूक कारणीभूत असल्याचे सातत्याने समोर आले आहे. तरीही त्यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने बेशिस्त वाहनचालकांची मुजोरी वाढलेली आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडते ती चौकांमधील अनधिकृत थांब्यांची.
या अनधिकृत थांब्यांमुळे शहरातील बहुतांश चौकांचाच श्वास कोंडला गेला आहे. विशेषत: या चौकांमध्ये वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्यावर असतानाही त्यांच्यासमोर रिक्षाचालक, खासगी ट्रॅव्हल्स, खासगी प्रवासी वाहने, विक्रेते वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशारितीने थांबलेले असतात.
परंतु त्याविरोधात कोणतीही कारवाई होत नाही. परिणामी, द्वारका, शालिमार, सीबीएस, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, त्रिमूर्ती चौक, सातपूर गाव, अशोकनगर चौक, नाशिकरोडला देवी चौक, बिटको चौक या प्रमुख चौकांचा श्वासच कोंडला आहे. (Nashik Unauthorized stops choked streets Traffic jams marathi news)
मुंबई, पुणे या शहरांच्या तुलनेने नाशिकमध्ये अजूनही रस्ते प्रशस्त आहेत. शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या द्वारका सर्कल, मुंबई नाका सर्कल, रविवार कारंजा याठिकाणी होते. परंतु या वाहतूक कोंडीला सर्वाधिक जबाबदार वाहनचालकांचा बेशिस्तपणा जसा कारणीभूत ठरतो, तसाच कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिसांचा कामचुकारपणाही तितकाच कारणीभूत ठरतो आहे.
द्वारका सर्कल येथील प्रत्येक रस्त्यालगत अनधिकृत वाहनांचे थांबे आहेत. विशेषत: मोठ्या संख्येने रिक्षा त्यांचे थांबे सोडून थांबलेल्या असतात. तसेच, मालेगाव-धुळे, संगमनेर, कसारा-मुंबईकडे जाणार्या रस्त्यावर खासगी प्रवासी वाहनांसह खासगी ट्रॅव्हल्सही थांबतात. या थांबलेल्या वाहनांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत असते. असेच चित्र शहरातील बहुतांशी चौकांमध्ये आहेत.
शालिमार चौकाला तर अनधिकृत रिक्षाचालकांचाच गराडा पडलेला आहे. शहर बससेवेसाठी असलेल्या बसथांब्यावरच अधिकृत रिक्षाथांबा सोडून अनधिकृतपणे रिक्षा थांबतात. यामुळे येणार्या बसेस आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. अशीच परिस्थिती रविवार कारंजावर होते. याठिकाणी अनधिकृत रिक्षाथांब्याप्रमाणेच, विक्रेत्यांनी रस्त्यालगत ठाण मांडलेले आहे. त्यामुळे रहदारीसाठी रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी निर्माण होते. हीच स्थिती सीबीएस सिग्नल आणि अशोकस्तंभ चौकात होते.
वाहतूक पोलिसांचे सोयीस्कर दूर्लक्ष
द्वारका सर्कल, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, शालिमार चौक याठिकाणी नियमित शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्यावर असतात. परंतु या वाहतूक पोलिसांकडून वाहतूकीला अडथळा ठरणार्या रिक्षाचालक वा विक्रेत्यांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांचे लक्ष केवळ विनाहेल्मेट दुचाकी, विनासीटबेल्ट कारचालक, अवजड वाहन यांच्यावर असते. पोलिसांच्या या सोयीस्करपणामुळे चौकांचा अनधिकृत थांब्यांमुळे श्वास कोंडलेलाच राहतो आहे. (latest marathi news)
या चौकांत समस्या
- द्वारका सर्कल
- शालिमार चौक
- अशोक स्तंभ
- सीबीएस सिग्नल
- रविवार कारंजा
- दिंडोरी नाका
- बिटको चौक
- त्रिमूर्ती चौक (सिडको)
- सातपूर गाव
- अशोकनगर चौक
- पेठ नाका
"रिक्षाचालकांना त्यांना नेमून दिलेल्या थांब्यांवरच थांबण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नियमाचे उल्लंघन करणार्यांविरोधात कारवाई केली जाते. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांविरोधातही नियमित दंडात्मक कारवाई केली जाते. यापुढे अशा बेशिस्तांविरोधात तीव्रपणे कारवाई केल्या जातील."- चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.