Nashik Water Crisis : राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नांदगाव, देवळा व चांदवडचा समावेश न झाल्याने येथील आमदारांनी आपल्याच पक्षातील नेत्यांविरोधात कंबर कसली आहे.
आमदार सुहास कांदे यांनी थेट न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली. चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनीही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्त तालुक्यांची व्याप्ती वाढवण्याची मागणी केली. (Nashik Water Crisis MLA mobilize for drought in Nandgaon Deola Chandwad Drought)
यंदा जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती आहे. दुष्काळाच्या सर्वाधिक झळा नांदगाव तालुक्याला बसत असताना या तालुक्याचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश झालेला नाही. याचा रोष म्हणून नांदगाव व मनमाड येथील विविध राजकीय पक्षाचे स्थानिक नेते व शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.
मुळात दुष्काळाच्या यादीत समावेश असलेल्या येवला, मालेगाव व सिन्नरपेक्षा बिकट परिस्थिती नांदगाव, देवळा आणि चांदवड तालुक्यांची आहे. समावेश झालेल्या तालुक्यांना शेतकऱ्यांचा विरोध नाही.
परंतु यात राज्य सरकार राजकारण करत असल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नांदगाव व चांदवड याच तालुक्यांना बसला होता.
त्याचीही मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आता दुष्काळाची परिस्थिती असताना सरकार आमच्यासोबत राजकारण खेळत असल्याची भावना या भागातील शेतकऱ्यांच्या मनात दृढ झाली आहे.
त्यामुळे आपल्या मतदारसंघाला कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळवून देण्यासाठी आमदार सरसावलेले आहेत. आमदार कांदे असो की डॉ. राहुल आहेर. दोघेही सत्ताधारी पक्षात आहेत.
एका पक्षाचा मुख्यमंत्री, तर दुसऱ्या पक्षाचा उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याविरोधात भूमिका घेऊन दुष्काळाची मदत मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पेठ, दिंडोरीचाही समावेश करण्याची मागणी
दुष्काळग्रस्त तालुक्यंच्या यादीत चांदवड, देवळा, नांदगावसह पेठ व दिंडोरीचाही समावेश करावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली. या तालुक्यांमध्येही पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
तहसीलदारांच्या नावे ग्रामपंचायतींचे पत्र
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आपल्या गावासह तालुक्याचा समावेश व्हावा, यासाठी नांदगाव तालुक्यातील गावांनी आता तहसीलदारांच्या नावे पत्र लिहिण्यास सुरवात केली आहे. त्यात संपूर्ण खरीप हंगाम २०२३ दुष्काळामुळे वाया गेला आहे.
पावसाअभावी शेती उत्पन्न मिळणार नाही. तालुक्यात शंभर टक्के दुष्काळ असूनही राज्य सरकारने जाहीर केलेल्या ४० दुष्काळी तालुक्यांच्या यादीत नांदगावचा समावेश नाही, हा तालुक्यावर अन्याय आहे. शासनाने याचा विचार करण्याचे आवाहन या पत्राद्वारे ग्रामपंचायतींनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.