इंदिरानगर : अक्षयतृतीया सणानिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण असताना वडाळा येथील महापालिकेच्या घरकुल इमारतीमध्ये राहणाऱ्या शेकडो महिला शुक्रवारी (ता. १०) पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. येथील कुटुंबांना तासभरदेखील पाणी मिळत नाही. रिकामे हंडे घेत या महिलांनी प्रवेशद्वाराजवळ जमून प्रशासनाचा निषेध करत पाच दिवसांत येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
येथील शंभर फुटी रस्त्यालगत असलेले पंडित जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान घरकुलमध्ये मागील दोन महिन्यांपासून नऊ इमारतीतील ७२० सदनिकांना फक्त एक तास पाणीपुरवठा आणि तोदेखील अगदी कमी दाबाने होत असल्याने तीन हजार लोकांचे हाल होत आहेत. वेळोवेळी तक्रारी करूनही मनपा अधिकारी प्रशासकीय कार्यकाल असल्यामुळे लक्ष देत नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. येथील महिला आणि पुरुष हातावर काम करणारे आहेत.
कामधंदा सोडून आठवड्यातून दोन ते तीन दिवस पाण्यासाठी घरीच थांबावे लागते. एकीकडे पाणीगळती होत आहे. हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र आम्हाला पिण्यासाठी देखील पुरेसे पाणी नाही, याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी सिंधू पवार, विमल ठोके, अरुणा पालटे, सीमा गायकवाड, रेखा अडांगळे, विमल गायकवाड, राही साठे, लाता जाधव, मंगल अहिरे, दिलनाज शेख, फरजाना सय्यद, ज्योती साठे, द्वारका पारखे, शरीफा शेख, राणी तांबे, नीलम पाटोळे, हुदेजा खान, आशामती पालटे, मनीषा काशीद आदी महिला उपस्थित होत्या. (latest marathi news)
"गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करत आहोत. एक-दीड तासदेखील पाणी येत नाही. येते ते कमी दाबाने येते. कामावर जावे की पाण्यासाठी वणवण फिरावे, काही कळत नाही."- सिंधू पवार, (स्थानिक महिला)
"आमचा पाणीप्रश्न लवकर सोडवावा. कामधंदे सोडून पाण्यासाठी फिरावे लागत आहे. पिण्यासाठी देखील पाणी पुरत नाही." - दिलनाज शेख, (स्थानिक महिला)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.