- अविनाश साबापुरे
यवतमाळ : एकीकडे राज्यात शिक्षकांचा तुटवडा असल्याची बोंब ठोकली जात आहे. तर दुसरीकडे शिक्षकांची कमतरता आढळल्यास शाळांची मान्यताच काढून घेण्याचा पवित्रा शासनाने घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थी संख्या आणि शिक्षक संख्या यांचे ’क्रॉस- चेकिंग’ केले जाणार आहे. ही उलटतपासणी येत्या ऑगस्टमध्ये होणार आहे.
खासगी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या अनेक माध्यमिक शाळांमध्ये गेल्या काही वर्षांत पुरेशी शिक्षक भरती झालेली नाही. परंतु, शिक्षक संख्या पुरेशी आहे, असे सांगून बोर्डाकडून मंडळ मान्यता घेतली जात आहे. या मान्यतेचे विहित कालावधीनंतर नूतनीकरणही करून घेतले जात आहे. तसेच शाळांनी बोर्डाकडून सांकेतांकही मिळवून घेतला आहे.
परंतु, यात अनेक ठिकाणी बनवाबनवी असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने आता शासन आणि बोर्डाची यंत्रणा संयुक्तरीत्या प्रत्येक शाळेतील शिक्षकसंख्येची खातरजमा करणार आहे. त्यासाठी बोर्डाने गुरुवार (ता. २५) जुलैपर्यंत सर्व शाळांकडून माहिती मागविली आहे.
येत्या २५ जुलैपर्यंत सर्व शाळांकडून विषयनिहाय शिक्षकांची माहिती गोळा केली जाणार आहे. त्यानंतर शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयात असलेल्या संचमान्यतेच्या अभिलेखातील माहितीसोबत शाळेकडून आलेल्या यादीचे ’क्रॉस-चेकिंग’ केले जाईल.
ही पडताळणी आटोपल्यावर प्रत्येक जिल्ह्याच्या वेतन पथकाकडे असलेल्या शिक्षकांच्या यादीसोबत ही माहिती जुळवून पाहिली जाईल. या तीन स्तरावरील अभिलेखातील माहितीमध्ये तफावत आढळल्यास दोषी शाळेवर ‘महाराष्ट्र खासगी शाळा सेवा शर्ती अधिनियम १९८१’नुसार कारवाई केली जाणार आहे.
माध्यमिक शाळेत दहावीला शिकविण्यासाठी प्रत्येक विषयासाठी त्या-त्या विषयाची अर्हता असलेले शिक्षक नेमणे आवश्यक आहे. असे शिक्षक असल्याचे सांगूनच शाळांनी बोर्डाकडून मान्यताही मिळविलेली आहे.
परंतु, अनेक ठिकाणी दोन-तीन विषय एकाच शिक्षकाकडे असल्याची वस्तुस्थिती आहे. तर बऱ्याच ठिकाणी अर्हता नसलेले शिक्षक दहावीला शिकवीत आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये प्रत्येक शाळेतील शिक्षक संख्येचे ’क्रॉस-चेकिंग’ होणार आहे.
हा विषय शाळांवर कारवाई करण्यासाठी नसून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. नववी आणि दहावीला विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांना स्वतंत्र शिक्षक असतातच. जिथे कमतरता आहे, तिथे घड्याळी तासिकेवर शिक्षक घेतलेली असतील. अशा सर्वच शिक्षकांची माहिती गोळा केली जात आहे. दहावीची फेरपरीक्षा घेताना किती शिक्षक उपलब्ध असतील याचाही आढावा यातून घेतला जाणार आहे.
- नीलिमा टाके, विभागीय सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.