Dikshabhumi sakal
नागपूर

Nagpur Dikshabhumi : दीक्षाभूमीवर ‘पार्किंग’विरुद्ध भीम अनुयायांचा उद्रेक; जाळपोळ करीत बांधकाम पाडले बंद

सोमवारी आंबेडकरी अनुयायांच्या उद्रेकाला स्मारक समितीलाच नव्हेतर शासन, प्रशासनाला सामोरे जावे लागले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - बौद्ध अनुयायांचा श्वास असलेल्या दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगला अनुयायांचा विरोध होता. परंतु याकडे स्मारक समितीसह शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे संतप्त झालेल्या भीम अनुयायांच्या भावनांचा अखेर बांध फुटला. सोमवारी हजारोंच्या संख्येत जमलेल्या अनुयायांनी बांधकामस्थळी जाळपोळ करीत बांधकाम बंद पाडले. या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्किंगसह बांधकामाला स्थगिती देण्याची घोषणा केली.

सोमवारी आंबेडकरी अनुयायांच्या उद्रेकाला स्मारक समितीलाच नव्हेतर शासन, प्रशासनाला सामोरे जावे लागले. अनुयायांनी सकाळी दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगचा विरोध करण्यासाठी दीक्षाभूमीवर गर्दी केली. मात्र समितीचे कुणीही सदस्य न पोचल्याने बांधकामस्थळी अनुयायांच्या संतापाच उद्रेक झाला. सकाळपासूनच दीक्षाभूमी परिसरात अनुयायी जथ्या-जथ्याने येत होते.

विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, अमरावतीसह वर्धा येथील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने येथे पोहोचले. रात्री उशिरापर्यंत मोठया संख्येत आंबेडकरी गदीं वाढतच होती. पार्किंगच्या खोदकामामुळे स्तुप व बोधीवृक्षाला धोका होईल, यासंदर्भातील ठोस अशी भूमिका मांडण्यात स्मारक समिती व प्रशासनास अपयश आल्याने अनुयायांमध्ये संताप वाढत होता त्याचा आज भडका उडाला.

विखुरलेले परंतु एकवटलेले !

दीक्षाभूमीवर जमलेल्या गर्दीत विभक्त असलेल्या रिपब्लिकन पक्षांचे कार्यकर्ते होते. समता सैनिक दलाचे कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते , बहुजन समाज पक्षापासून तर विविध सामाजिक सांस्कृतिक संघटनांचे कार्यकर्ते होते. विहार-विहारांमधील कार्यकारिणीतील सदस्यांपासून तर चळवळीतील सारे कार्यकर्ता विखुरले असले तरी आज स्वयंस्फूर्तीने आज एकवटले होते.

ज्या दीक्षाभूमीने समाजाला भयमुक्त केले, बंधमुक्त केले, स्वाभिमान दिला तो समाज सारे विभक्तपण विसरून दीक्षाभूमीच्या संरक्षणासाठी बोधीवृक्षाच्या सावलीत संघटित होऊन समितीसह शासनाविरुद्ध विद्रोह करण्यास सज्ज झाल्याचे चित्र आज दिसून आले.

कृषी विभागाच्या जागेची मागणी

काही महिन्यांपासून दीक्षाभूमीवर भूमीगत पार्किंगचे बांधकाम सुरू आहे. त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्या जात होती. स्मारक समिती आणि सरकारकडे चौथ्या उत्तरेकडील प्रवेशद्वारासाठी असलेली जागा देण्यात यावी, येथे वाहनतळ बनवण्यात यावे यासंदर्भातील निवेदन समितीला देण्यात आले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले, हे कारण देखील आंबेडकरी अनुयायांचा जनक्षोभ उसळण्यास कारणीभूत ठरले.

स्मारक समितीने दिले पत्र

जनक्षोभ तीव्र झाल्याने व दीक्षाभूमीवरील संताप बघता स्मारक समितीच्या सदस्यांनी तातडीने एनएमआरडीएच्या नावाने एक पत्र जारी केले. यात अनुयायांच्या भावना लक्षात घेता भूमीगत वाहनतळाचे बांधकाम १ जुलै २०२४ पासून तत्काळ प्रभावाने बंद करीत आहोत. या निर्णयाचे पत्र शासनास देऊ असेही स्पष्ट केले. स्मारक समिती सदस्य डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, प्रा. डी.जी.दाभाडे, एन.आर. सुटे यांची पत्रावर स्वाक्षरी होती.

पार्किंगमधील विकास आराखडा

पहिल्या टप्प्यातील कार्य

- स्मारकाच्या दक्षिण दिशेला भूमिगत पार्किंगचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा दावा.

- १४६ चार चाकी कार आणि ९०२ सायकल व दुचाकी वाहनाच्या पार्किंगची क्षमता .

- प्रसाधने, अनामत कक्ष (अनुयायांसाठी लॉकरची सुविधा), प्रथमोपचार कक्ष, पिण्याच्या पाण्याची सुविधा होती.

- भूमिगत वाहनतळाच्या छतावर बसण्याची जागा.

- सभोवताल शोभेची झाडे व पादचारी मार्ग तयार होणार होता.

- पाऊस आला तर अनुयायी या भूमिगत स्थळाचा आसरा घेऊ शकतील.

- कार्यक्रमासाठी समारंभासाठी सभागृह होणार होते.

इतर विकासकामांचा आराखडा

- मुख्य स्मारक्या चारही प्रवेशद्वारांचे नूतनीकरण

- सांची स्तुपाच्या वास्तुकलेच्या धर्तीवर २० फूट रुंद व ६६ फूट उंच चार तोरणद्वार

- स्मारका सभोवती दगडी परिक्रमा व दगडी पदपथ

-स्मारकाच्या चारही बाजूला हिरवेगार प्लांटर

-११,३१६ चौरस फुटांचे व्याख्यान केंद्र

-५,४६६ चौरस फुटांचे खुले सभागृह

-६६ फूट लांब आणि ५४ फूट रुंद १५ फूट उंचीचा खुला मंच

-दीक्षाभूमी परिसराभोवती दगडी सुरक्षा भिंत

- ३३ फूट रुंद व ३० फूट उंचीचे दोन मुख्य प्रवेशद्वार.

-सुरक्षा रक्षक, पहारेकरी खोली व पोलिस नियंत्रण कक्ष

-५ लाख ११ हजार ७४२ चौरस फुटांचे हरितक्षेत्रासह विद्युतीकरण, सौरऊर्जा यंत्रणा व मलनिस:रण केंद्र.

-३७ फूट उंचचे अशोक स्तंभ

असे झाले आंदोलन...

  • ४ जून रोजी समाज माध्यमांवर दीक्षाभूमीवरील पार्किंगला विरोध करणारा संदेश पसरला.

  • ५ जून रोजी बहुजन समाज पार्टीने आंदोलनाला सुरुवात केली.

  • ६ जून रोजी वंचितसह इतरही समाज संघटनांचे आंदोलन झाले.

  • ९ जून रोजी भारतीय बौद्ध महासभेसह समता सैनिक दलातर्फे स्मारक समितीला निवेदन दिले.

  • ११ जून रोजी स्मारक समितीने आंबेडकरी समाजातील मान्यवरांशी बैठकीत चर्चा केली.

  • १२ जून रोजी आंबेडकरी अनुयायांचे स्वंयस्फुर्त आंदोलन झाले.

  • १६ जून ते २९ जून दरम्यान दररोज दीक्षाभूमीसमोर अनुयायांचे आंदोलन झाले.

  • ३० जून रोजी दादासाहेब गायकवाड यांचे नातू कुणाल गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांशी साधला संवाद.

  • १ जुलै आंबेडकरी अनुयायांच्या मागणीची दखल घेण्यात न आल्याने दीक्षाभूमीवर संतापाचा उद्रेक झाला.

आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आदर करून येत्या काही दिवसांत शासन, प्रशासनासोबत बैठक घेऊन नवीन विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. नवीन आराखडा आंबेडकरी समाजासमोर ठेवण्यात येईल. दीक्षाभूमीचे पावित्र्य नष्ट होऊ देऊ नका.

- डॉ. सुधीर फुलझेले, माजी सचिव, डॉ आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९५६ सालच्या धम्मक्रांतीने आंबेडकरी समाज निर्माण झाला. या दीक्षाभूमीने सार्वजनिक कल्याणाचा महामार्ग दिला. येथून आंबेडकरी विचारांचे संवर्धन करण्यासाठी विकासाचे धोरण राबविण्यात येत आहे. येथे मेट्रो कार्यालयाचे वाहनतळ बनणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र समाजाला येथे भूमिगत वाहनतळ नकोच आहे. ही दीक्षाभूमी अनुयायांची आहे, यामुळे स्मारक समितीकडून शासन प्रशासनाला पत्र देऊन भूमिगत पार्किंग रद्द करण्यासंदर्भात पत्र दिले.

- डॉ राजेंद्र गवई, सचिव डॉ आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी

जनतेच्या भावनांचा आदर करून दीक्षाभूमी येथील बोधीवृक्षाखाली आंबेडकरी अनुयांयासोबत चर्चा केली. भूमिगत पार्किंगसंदर्भात पुर्नविचार करण्यासंदर्भात आंबेडकरी जनतेला समितीकडून लेखी आश्वासन दिले. विकासकामांना कोणाचाही विरोध नाही.केवळ भूमिगत पार्किंगला विरोध आहे.

- प्रा. प्रदीप आगलावे, सदस्य , डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी

मातीचे ढिगारे ठरले कारणीभूत

दीक्षाभूमीवर सौदर्यींकरणाच्या नावावर २०० कोटी ३२ लाखांच्या विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. स्मारक समितीच्या सूचनेनुसार व मंजुरीनुसार हा विकास आराखडा एनएमआरडीएकडून तयार करण्यात आला होता. परंतु, या कामांची माहिती आंबेडकरी अनुयायांपर्यत पोहोचली नाही. दीक्षाभूमीत खोदकाम केल्यानंतर निघालेला मलबा याच परिसरात स्मारकासमोर टाकण्यात येत होता.

स्मारकासमोरील हे मातीचे ढिगारे पाहून हळूहळू अनुयायांमध्ये चिंता पसरत होती. मातीच्या ढिगाऱ्यांनी स्मारक झाकोळले गेले असल्याचे दिसल्यानंतर सोमवारी अनुयायी स्मारक समितीकडे पोहोचले. स्मारक समितीने स्मारकासह बोधीवृक्षाला धोका होणार नाही, असे स्पष्टीकरण दिले. परंतु अनुयायांचा विश्वास बसला नाही. वादाला तोंड फुटले आणि वेगळेच वळण घेतले. अनुयायांनी बांधकाम बंद पाडल्यानंतर विद्युत तारा व लॅपटॉप जाळले गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT