Nagpur News : पाकिस्तानचे अतिरेकी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करून निरपराध भारतीय सैनिकांना मारत असताना कुटील कारस्थान रचणाऱ्या व जेहादी मानसिकतेच्या या देशात टीम इंडियाने अजिबात क्रिकेट खेळू नये, असे स्पष्ट मत उपराजधानीतील माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षकांनी व्यक्त केले आहे. ‘देश प्रथम नंतर क्रिकेट’ अशी ठाम भूमिका घेत त्यांनी केंद्र सरकार व बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयाचे स्वागत केले.
पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाणार आहे. पाकिस्तानच्या एकूणच कुटील कारवाया आणि तिथे भारतीय खेळाडूंच्या जीवितास असलेला धोका लक्षात घेता, या स्पर्धेसाठी पाकिस्तानात भारतीय संघ न पाठविण्याचे केंद्र सरकारकडून संकेत मिळाले आहेत. यासंदर्भात ‘सकाळ’ने नागपूरकरांच्या भावना जाणून घेतल्या असता सर्वांनीच सध्यास्थितीत पाकिस्तानचा दौरा करू नये असे मत मांडले.
विदर्भाचे माजी रणजी कर्णधार प्रीतम गंधे म्हणाले, आजच्या घडीला पाकिस्तानशी क्रिकेट खेळावे की नाही, हा प्रश्न नाही. मुद्दा भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाकिस्तानशी तटस्थ देशांमध्ये खेळतच आहोत आणि भविष्यातही खेळणार आहोत. मुळातच पाकिस्तानमध्ये भारतीय खेळाडूंना धोका आहे.
गृहमंत्रालयाला याची कल्पना असल्यामुळेच संघाला मनाई करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्येच श्रीलंकेच्या खेळाडूंवर अतिरेकी हल्ला झाला होता. तेथील एकूणच परिस्थिती लक्षात घेता, टीम इंडियाला खेळण्यासाठी पाठविणे जोखमीचे आहे. चुकून एखादी अनुचित घटना घडल्यास अनेक जण सरकारलाच जबाबदार धरतील. म्हणूनच पाकिस्तान मध्ये न खेळलेलेच बरे.
माजी रणजीपटू मदन कावरे यांनीही पाकिस्तान क्रिकेट खेळण्यासाठी धोकादायक देश असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पाकिस्तान हा देश कट्टर व जेहादी मानसिकतेचा आहे. त्यांच्यात अजिबात माणुसकी नाही.
त्यांनी पोसलेले दहशतवादी सारखे भारतात हल्ले करीत असतात. अशा देशात जाऊन क्रिकेट खेळणे कोणत्याच भारतीयाला पटणार नाही. आमच्यासाठी राष्ट्र सर्वपरी असून, क्रिकेट त्यानंतर आहे. सीमेवर सैनिक मारले जात असताना आम्ही पाकिस्तानशी क्रिकेट खेळावे, याची कल्पनाही करू शकत नाही. भारताने खरं तर पाकिस्तानवर ‘बॅन’च आणला पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे.
क्रिकेट प्रशिक्षक माधव बाकरे म्हणाले, पाकिस्तान समर्थीत दहशतवाद्यांनी गेल्या पाच महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये ३२ हल्ले केले आहेत. त्यात आमचे अनेक सैनिक मारले गेलेत. निरपराध भारतीय मरत असताना आम्ही पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळावे, हे माझ्या मनाला अजिबात पटत नाही. आमच्यासाठी क्रिकेट नव्हे, देश महत्त्वाचा आहे.
भारत पाकिस्तानमध्ये खेळला नाही तर आयसीसीदेखील कारवाई करू शकत नाही. आम्ही विजेत्या भारतीय संघाला सव्वाशे कोटी देऊ शकतो, तर दोन-अडीचशे कोटींचा दंड सहज भरू शकतो. पण माझ्या मते, तशी वेळच येणार नाही. कारण आजच्या परिस्थितीत बीसीसीआय किती शक्तिशाली आहे, हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानात खेळू नये, हे माझे वैयक्तिक मत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.