Guru Purnima 2024 : आज गुरूपौर्णिमेचा संपूर्ण देशात मोठा उत्साह पाहायला मिळतोय. हिंदू धर्मामध्ये गुरूपौर्णिमेला विशेष असे महत्व आहे. कारण, गुरूला देवासमान मानले जाते आणि गुरूला देवाचा दर्जा दिला जातो. या शुभ दिनी गुरूंची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातो.
दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा ही गुरूपौर्णिमा २१ जुलैला (रविवारी) साजरी केली जाणार आहे. गुरूपौर्णिमेची फार मोठी प्राचीन परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. आपल्या देशात गुरू-शिष्याच्या अनेक महत्वाच्या जोड्या होऊन गेल्या आहेत.
ज्यांनी आपल्या समृद्ध ज्ञानाने आणि कार्याने लोकांना जीवन जगण्याचा मार्ग शिकवला आहे. आज गुरूपौर्णमेच्या निमित्ताने आपण गुरू-शिष्यांच्या काही प्रसिद्ध जोड्यांबद्दल जाणून घेणार आहोत. कोणत्या आहेत त्या जोड्या? चला तर मग जाणून घेऊयात.
आचार्य चाणाक्य यांना कौटिल्य म्हणून ही ओळखले जाते. चाणाक्य यांनी राजा चंद्रगुप्त मौर्यांच्या कार्यकाळात महामंत्री म्हणून कार्य केले होते. त्यांची चाणाक्य नीती, हुशारी आणि बुद्धिमत्ता अप्रतिम होती. चाणाक्य यांना महान तत्वज्ञानी, मार्गदर्शक आणि भारताचे पहिले अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजा चंद्रगुप्त मौर्याने त्या काळात मौर्य साम्राज्याचा मोठा विकास आणि विस्तार केला होता. चंद्रगुप्त राजाने चाणाक्य यांना त्यांचे गुरू मानले होते. गुरू चाणाक्य यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त हा त्या काळातील महान शासक बनला होता.
रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या गुरू-शिष्याच्या जोडीक़डून आजही प्रेरणा घेतली जाते. १८८१ मध्ये रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची सर्वात आधी भेट झाली होती. त्यावेळी स्वामी विवेकानंद यांचे नाव नरेंद्र असे होते. त्याभेटीत स्वामी विवेकानंद यांनी एक गाणे गायले होते. ज्या गाण्यामुळे रामकृष्ण परमहंस अतिशय प्रभावित झाले होते.
त्यानंतर, परमहंस यांनी विवेकानंद यांना दक्षिणेश्वरला येण्याचे आमंत्रण दिले होते. फक्त या एका भेटीने या गुरू-शिष्याच्या जोडीला आकार दिला होता. त्यानंतर, जे घडले ते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. आज ही गुरू-शिष्याची जोडी घराघरात ओळखली जाते. तरूणाई या जोडीकडून प्रेरणा घेते.
महाभारतामध्ये कौरवांचे आणि पांडवांचे उत्कृष्ट गुरू म्हणून द्रोणाचार्य यांना ओळखले जात होते. द्रोणाचार्य यांनी सर्व पांडवांना, कौरवांना आणि जयद्रथ यांना धनुर्विद्या शिकवली होती. परंतु, या सगळ्यांमध्ये त्यांचा आवडता शिष्य हा अर्जुन होता. हे सर्वांनाच माहित आहे.
एका प्रसिद्ध पौराणिक आख्यायिकेनुसार, एकदा द्रोणाचार्य धनुर्विद्या शिकवताना सर्व शिष्यांना विचारतात की, तुम्ही काय पाहत आहात? यावर प्रत्येकाने वेगवेगळी उत्तरे दिली. परंतु, केवळ अर्जुन म्हणाला की, ‘मी माशाचा डोळा पाहत आहे’. त्याच्या उत्तराने गुरू द्रोणाचार्य अतिशय प्रभावित झाले होते. ही गुरू-शिष्याची जोडी आज ही अमर आहे. आज ही त्यांच्याकडून प्रेरणा घेतली जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.