Rajya sabha Election : राज्यसभेसाठी तीन सप्टेंबरला मतदान ; नऊ राज्यांतील १२ जागांत महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश

राज्यसभेसाठीच्या १२ जागांसाठी नऊ राज्यांत येत्या तीन सप्टेंबरला मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
Rajya sabha Election
Rajya sabha Election sakal
Updated on

नवी दिल्ली : राज्यसभेसाठीच्या १२ जागांसाठी नऊ राज्यांत येत्या तीन सप्टेंबरला मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यात महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. उदयनराजे भोसले आणि पीयूष गोयल हे लोकसभेवर निवडून गेले असल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी महाराष्ट्रात मतदान होणार आहे.

राज्यसभेचे सदस्य असलेल्या काही नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवला होता. यामुळे रिक्त ​झालेल्या तसेच काही सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक आयोग मतदान घेणार आहे. लोकसभेवर निवडून गेलेल्या नेत्यांत कामाख्या तासा, सर्वानंद सोनोवाल, मिसा भारती, विवेक ठाकूर, दीपेंदरसिंह हुडा, ज्योतिरादित्य शिंदे, के. सी. वेणुगोपाल व विप्लब देव यांचा समावेश आहे तर डॉ. के. केशव राव व ममता मोहंता यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

महाराष्ट्र, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी दोन जागांसाठी तर हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, तेलंगण आणि ओडिशामधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे. १४ ऑगस्ट रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. २१ तारखेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता येतील तर २२ ऑगस्ट रोजी अर्जांची छाननी होईल. आसाम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि त्रिपुरासाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट आहे तर बिहार, हरियाना, राजस्थान, तेलंगण आणि ओडिशासाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट अशी आहे. तीन सप्टेंबर रोजी मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.