Death of Elephants
Death of Elephantssakal

Death of Elephants : देशात पाच वर्षांत ५२८ हत्तींचा अनैसर्गिक मृत्यू ; वन्यजीव अधिवासाचे व्यवस्थापन ही राज्यांची जबाबदारी असल्याचे केंद्राचे म्हणणे

देशात मागील पाच वर्षांत ५२८ हत्तींचा अनैसर्गिक कारणाने मृत्यू झाला, असल्याची माहिती सरकारच्या वतीने संसदेमध्ये सोमवारी देण्यात आली.
Published on

नवी दिल्ली : देशात मागील पाच वर्षांत ५२८ हत्तींचा अनैसर्गिक कारणाने मृत्यू झाला, असल्याची माहिती सरकारच्या वतीने संसदेमध्ये सोमवारी देण्यात आली. भाजपचे खासदार जयंत कुमार रॉय आणि संगीताकुमारी सिंहदेव यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला माहिती देताना केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी याबाबत माहिती दिली.

कीर्तीवर्धन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३९२ हत्तींचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ७३ हत्तींचा रेल्वे अपघातात तर १३ हत्तींचा विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. ५० हत्तींची शिकार झाल्याचे नोंदविण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. २०१७मध्ये करण्यात आलेल्या हत्तीगणनेनुसार भारतात २९ हजार ८५३ हत्ती असून जगभरातील एकूण संख्येच्या तुलनेमध्ये ६० टक्के हत्ती भारतात आहेत.

राज्यांची जबाबदारी

‘‘वन्यजीव अधिवासाचे व्यवस्थापन ही संबंधित राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची जबाबदारी आहे. त्यासाठी केंद्र सरकार राज्यांना ‘प्रोजेक्ट टायगर अँड एलिफंट’ अंतर्गत निधी देते.’’ अशी माहितीही सिंह यांनी यावेळी दिली. २०२१ आणि २०२२मध्ये केंद्र सरकारच्यावतीने, राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या.

यामध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यात होणाऱ्या संघर्षाची ठिकाणे निश्‍चित करून ते टाळण्यासाठी उपाय योजना करणे, अशाप्रकारचा संघर्ष झाल्यास तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी पथक निर्माण करणे यांसह अन्य मार्गदर्शक तत्त्वे केंद्राकडून जारी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे हत्तींचे मृत्यू टाळण्यासाठी आणि हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वनविभागांसह देशभरात १५० ठिकाणी हत्तीसांठीच्या मार्गिकादेखील निश्‍चित केल्या आहेत.

दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू

मागील आठवड्यात लोकसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत हत्ती आणि मानव यांच्यात झालेल्या संघर्षात दोन हजार ८५३ जणांचा मृत्यू झाला आहे. २०२३मध्ये ही संख्या सर्वाधिक म्हणजेच ६२८ होती. २०२२मध्ये ६१०, २०२१मध्ये ५५७, २०२०मध्ये४७१ तर २०१९मध्ये ५८७ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.