Arvind Kejriwal : केजरीवाल पुन्हा रस्त्यावर;‘आप’चा मोर्चा आज भाजप मुख्यालयावर धडकणार

स्वीय सहाय्यक विभव कुमार यांच्या अटकेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वाती मालिवाल मारहाणप्रकरणी अखेर मौन सोडले.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal sakal
Updated on

नवी दिल्ली : स्वीय सहाय्यक विभव कुमार यांच्या अटकेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वाती मालिवाल मारहाणप्रकरणी अखेर मौन सोडले. आम आदमी पक्षाच्या नेत्यांना भाजप तुरुंगात टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला, तसेच पक्षाच्या नेत्यांसमवेत रविवारी (ता. १९) दुपारी बारा वाजता भाजप मुख्यालयावर धडक देण्याची घोषणा त्यांनी केली.

आमच्या हव्या त्या नेत्याला अटक करून दाखवा, असे आव्हानही केजरीवालांनी भाजपला दिले. राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले केजरीवाल या संपूर्ण घटनाक्रमामध्ये गप्प का आहेत, असा सवाल भाजपकडून उपस्थित केला जात होता.

खासदार मालिवाल यांनी या प्रकरणात सूचकपणे अरविंद केजरीवाल यांच्या दिशेने अंगुलीनिर्देश केला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी आज व्हिडिओ संदेश जारी करून पंतप्रधान मोदी आणि भाजपला लक्ष्य केले. मात्र मालिवाल यांच्याबद्दल ते काहीही बोलले नाहीत. व्हिडिओ संदेशाद्वारे दिल्लीकरांना भावनिक साद घालताना केजरीवाल म्हणाले, ‘‘ ते (भाजप सरकार) आम आदमी पक्षाच्या मागे लागले असून सर्वांना तुरुंगात टाकू पाहत आहेत.

सरकार ''जेल गेम'' खेळत असून पंतप्रधानांना सांगू इच्छितो की कधी मनीष सिसोदिया, कधी संजय सिंह आणि कधी अरविंद केजरीवाल यांना तुम्ही तुरुंगात टाकत आहात. आम्ही उद्या दुपारी बाराला पक्षाचे सर्व नेते, आमदारांसह भाजप मुख्यालयामध्ये येणार आहोत. यातील कोणालाही तुम्ही तुरूंगात टाकू शकता.”

चढ्ढांच्या अटकेचा विचार

केजरीवाल म्हणाले, ‘‘ भाजपचा आता राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना अटक करण्याचा विचार आहे. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांना देखील अटक केली जाऊ शकते. आप सरकारने दिल्लीत चांगल्या शाळा बांधल्या, मोहल्ला रुग्णालये उभारली, मोफत उपचार केले आणि शहरात २४ तास मोफत वीजपुरवठा व्हावा हे सुनिश्चित केले. ही आम आदमी पक्षाने केलेली चूक भाजपला करता आलेली नाही.’’

विभव यांना जामीन नाहीच

मालिवाल यांच्यावरील कथित हल्ल्याप्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने विभवकुमार यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून लावली. विभव कुमार यांना अटक झाल्याने अटकपूर्व जामीन अर्ज निरर्थक ठरल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणामध्ये आता त्यांचा न्यायालयाकडून पोलिस कोठडी मिळविण्याचा दिल्ली पोलिसांचा प्रयत्न आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com