नवी दिल्लीः तिरुपतीच्या बालाजी मंदिरातील प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर केला जात असल्याच्या प्रकरणाची केंद्र सरकारने आंध्र प्रदेश सरकारकडून माहिती मागविली आहे. ‘‘आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याकडून मी विस्तृत अहवाल मागविला असून जे लोक दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’’ असे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी सांगितले.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या शंभर दिवसांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नड्डा यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. ‘‘तिरुपती मंदिराच्या प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची माहिती मला समाज माध्यमातून समजली. याबाबत आपण मुख्यमंत्री नायडू यांच्याशी चर्चा केली असून त्यांच्याकडून विस्तृत अहवाल मागविला आहे,’’ असे नड्डा म्हणाले.
मुख्यमंत्री नायडू आणि त्यांचे पुत्र नारा लोकेश यांनी प्रसादात चरबी मिसळली जात असल्याचा आणि त्यामागे तत्कालीन वायएसआर काँग्रेसचे सरकार जबाबदार असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
दरम्यान, वायएसआर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तेलुगू देसम पक्षाकडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. ‘‘राजकारण करण्यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू कोणत्याही थराला जाऊ शकतात,’’ अशी प्रतिक्रिया रेड्डी यांनी दिली होती. दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये प्राण्यांचे मांस मिसळले जात होते, असा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीमध्ये बोलताना नायडू यांनी हा आरोप केला आहे. ‘‘वायएसआर काँग्रेसच्या सरकारने व्यंकटेश्वर मंदिरालाही सोडले नाही. येथे देण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये प्राण्यांचे मांस वापरले जात होते. हा अत्यंत निंद्य प्रकार आहे,’’ असे नायडू म्हणाले.