Farmer Loss : अल्पभूधारक अडचणीत! पावसातील अनियिमिततेमुळे पिकांच्या उत्पादनामध्ये घट

जागतिक तापमानवाढीचा मोठा फटका पर्यावरणाबरोबरच शेतीलाही बसतो आहे.
global warming
global warmingSakal
Updated on

नवी दिल्ली - जागतिक तापमानवाढीचा मोठा फटका पर्यावरणाबरोबरच शेतीलाही बसतो आहे. या टोकाच्या हवामान बदलामुळे मागील पाच वर्षांत देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तब्बल ८० टक्के शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसल्याचे ताज्या पर्यावरणविषयक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘फोरम ऑफ एंटरप्रायझेस फॉर इक्विटेबल डेव्हलपमेंट’ (एफईईडी) या संघटनेने ‘डेव्हलपमेंट इंटेलिजन्स युनिटच्या (डीआययू) सहकार्याने याबाबत सर्वेक्षण केले होते. त्यातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. या सर्वेक्षणासाठी २१ राज्यांतील ६ हजार ६१५ शेतकऱ्यांचा अभ्यास करण्यात आला होता. यामध्ये पिकांची हानी होण्याचे प्राथमिक कारण हे दुष्काळ असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहेत. देशातील ४३ टक्के शेतकऱ्यांवर शिवारातील उभी असलेली पिके गमावण्याची वेळ आली होती.

उत्पादनात घट अपेक्षित

अपुऱ्या पावसामुळे भात, मका, कापूस, सोयाबीन, भुईमूग आणि कडधान्यांच्या लागवडीखालील क्षेत्र घटत चालले असून महाराष्ट्र, तेलंगण, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ही स्थिती पाहायला मिळते. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात वातावरणातील बदलांचा फारसा गांभीर्याने अभ्यास करण्यात आला नव्हता.

देशामध्ये २०२२ मध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला होता त्यामुळे पुढील वर्षी त्याचे उत्पादन घटून ते १०५.५९ दशलक्ष टनांवर आले होते. यामुळे केंद्र सरकारला गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालावी लागली होती. तांदळाच्या उत्पादनात १० ते ३० टक्के तर मोहरीच्या उत्पादनात २५ ते ७० टक्के घट अपेक्षित आहे.

जागतिक तापमानवाढ हे काही दुसऱ्या क्षितिजावरील संकट नाही. आपण सर्वजण त्याला सामोरे जात आहोत. दिल्लीसह देशभरात उसळलेल्या उष्णतेच्या लाटेतून त्याचा इशारा मिळाला आहे. यासाठी तातडीने रणनीती आखणे गरजेचे आहे. पर्यावरणानुकुल शेतीला आपण प्रोत्साहन द्यायला हवे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीबरोबरच तांत्रिक सल्लाही द्यायला हवा.

- संजीव चोप्रा, अध्यक्ष ‘एफईईडी’

यंत्रणेमध्ये मोठी दरी

देशामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. एकूण कृषक समुदायाशी तुलना केली असता त्यांचे प्रमाण हे ६८.५ टक्के एवढे भरते. पण एवढ्या मोठ्या लोकसंख्येकडे पीक लागवड क्षेत्र मात्र २४ टक्के एवढेच आहे. या अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून जी आधारभूत यंत्रणा उभारण्यात आली आहे तिच्यामध्ये मोठी दरी दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.