लोकसभा निवडणुकीदरम्यान शनिवारी सकाळी संतप्त जमावाने पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा येथील कुलताली येथील बूथ क्रमांक 40 आणि 41 येथील मतदान केंद्रात प्रवेश केला आणि ईव्हीएम मशीन तलावात फेकून दिले, अशी बातमी पीटीआयने दिली.
काही पोलिंग एजंटना मतदान केंद्रात उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आल्याने ही घटना घडली. प्रत्युत्तर म्हणून, संतप्त जमावाने मतदान केंद्रात प्रवेश केला, ईव्हीएम व्हीव्हीपीएटी हिसकावले आणि तलावात फेकले.
यावेळी पश्चिम बंगालने मतदानाच्या बाबतीत चांगली कामगिरी केली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यापासून पश्चिम बंगालमधून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीच तृणमूल काँग्रेसने दावा केला होता की, अलीपुरद्वार तुफानगंज-2 ब्लॉकमधील बारोकोदली-1 ग्रामपंचायतीच्या हरिरहाट भागात टीएमसीच्या तात्पुरत्या पक्ष कार्यालयाला भाजप समर्थकांनी आग लावली होती.
दरम्यान सातव्या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. या टप्प्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हमीरपूरमधून, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बरमधून, लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती पाटलीपुत्रमधून आणि अभिनेत्री कंगना रणौत मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शनिवारी सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी मतदान होत आहे.
यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. ज्या जागांवर आज मतदान होत आहे त्यामध्ये पंजाब आणि यूपीमधील प्रत्येकी 13 जागा, पश्चिम बंगालमधील 9 जागा, बिहारमधील 8 जागा, ओडिशातील 6 जागा, हिमाचल प्रदेशातील 4 जागा, झारखंडमधील 3 जागा आणि चंदीगडमध्ये एक जागा आहे .
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.