नवी दिल्ली, ता. १८ : पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातासाठी काँग्रेसने केंद्र सरकारला जबाबदार धरताना नवे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पदावर राहण्याचा नैतिक अधिकार रेल्वेमंत्र्यांनी गमावला असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज केला. तसेच, अपघात रोखणारी ‘कवच’ यंत्रणा का जोडण्यात आली नाही, असा सवालही खर्गे यांनी विचारला.
पश्चिम बंगालमध्ये कांचनजुंगा एक्स्प्रेसला झालेल्या अपघातामध्ये दहा जणांनी प्राण गमावले असून ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. या पाहणीवरून खर्गे यांनी रेल्वेमंत्र्यांना टोला लगावला. ‘रेल्वे अपघात होतो तेव्हा सध्याचे रेल्वेमंत्री कॅमेरे घेऊन घटनास्थळी पोहोचतात आणि सर्वकाही ठीक असल्यासारखे वागतात. अपघातासाठी आता रेल्वेमंत्र्यांना जबाबदार ठरवायचे की पंतप्रधानांना?,’ असा खोचक सवाल खर्गे यांनी केला.
बालासोरमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या मोठ्या अपघातानंतर बहुचर्चित ‘कवच’ संरक्षणात एक किलोमीटरने देखील वाढ का झाली नाही, रेल्वेमधील तीन लाख पदे मागील दहा वर्षांत का भरली नाहीत, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार २०१७ ते २०२१ या कालावधीत रेल्वे अपघातात एक लाख लोकांचा मृत्यू झाला आहे याची जबाबदारी कोण घेणार?, अशी सवालांची फैर खर्गे यांनी झाडली. दरम्यान, कॉंग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख व प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी जून २०२३ मध्ये झालेल्या बालासोरच्या अपघाताची आठवण करून देत रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.