BJD : ‘बीजेडी’कडून उमेदवारांची चाचपणी; भाजपच्या संभाव्य युतीवर अवलंबून न राहता हालचाली सुरू

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती होणार की नाही? याच्या भरवशावर न राहता ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
‘बीजेडी’कडून उमेदवारांची चाचपणी
‘बीजेडी’कडून उमेदवारांची चाचपणीSakal
Updated on

नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती होणार की नाही? याच्या भरवशावर न राहता ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका चार टप्प्यांत १३, २०, २५ मे आणि एक जून रोजी होणार आहेत.

लोकसभेतील ‘रालोआ’चे संख्याबळ चारशेवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवत भाजप विविध प्रादेशिक पक्षांसोबत युती करण्याची शक्यता तपासत आहे. आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्ष आणि जनसेना यांच्यासोबत युती झाली आहे तर महाराष्ट्रात ‘मनसे’सोबत युती होणे ही औपचारिकता मानली जात आहे.

भाजप-बिजू जनता दल यांची युती एक-दोन दिवसांत जाहीर होणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र या गोष्टीला बारा दिवस उलटून गेले तरी युतीची गाडी पुढे सरकलेली नाही. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांत बिनसले असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

दरम्यान, युती होणार की नाही, याच्या भरवशावर न राहता बिजू जनता दलाने उमेदवारांच्या चाचपणीस सुरुवात केली आहे. नेत्यांनी आपापल्या मतदारसंघावर लक्ष ठेवावे, असे निर्देश देत बीजेडीचे नेते आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दोन देखरेख केंद्रांची स्थापना केली आहे.

यातील एक देखरेख केंद्र त्यांच्या निवासस्थानी आहे तर दुसरे देखरेख केंद्र पक्षाच्या मुख्यालयात आहे. १९९८ ते २००९ या ११ वर्षांच्या कालावधीत भाजप आणि बिजू जनता दल यांची युती होती. त्यावेळी दोन्ही पक्षांनी तीन लोकसभा तर दोन विधानसभा निवडणुका एकत्र लढविल्या होत्या.

भाजपच्या लोकप्रियतेची चिंता

मागील काही काळापासून वाढत असलेली भाजपची लोकप्रियता ही बिजू जनता दलाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळे युती झाली नाही तर पक्षाला दोन्ही निवडणुकांत पूर्ण जोर लावावा लागणार आहे.

बिजू जनता दलाने २००९ रोजी भाजप सोबतची युती तोडली होती. त्यावेळी राज्यात बीजेडीची मतांची टक्केवारी ३८.९ टक्के इतकी होती. तर भाजपची मतांची टक्केवारी १५.१ टक्के इतकी होती. २००९ पासून भाजपची मतांची टक्केवारी वाढत आहे.

युतीचा निर्णय नड्डा घेतील: शहा

‘‘बीजेडीशी युती करायची की नाही, याचा अंतिम निर्णय भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा घेतील. ओडिशामध्ये भाजपची शक्ती वाढली असून स्वतंत्रपणे लढविण्याची वेळ आली तरी पक्ष त्यासाठी तयार आहे,’’ असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.