नवी दिल्ली, ता. ३ः संविधान बचावचा नारा देत देशभर फिरणार्या काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत भारतीय राज्यघटनेचे सर्वाधिक नुकसान केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला राज्यसभेत आज पंतप्रधान मोदी यांनी सविस्तर उत्तर दिले. जवळपास एक तास ५० मिनिटे दिलेल्या भाषणात पंतप्रधानांनी संविधान, मणिपूरमधील वांशिक हिंसाचार, केंद्रीय तपास यंत्रणेची विरोधकांवर होत असलेली कारवाई, गेल्या दहा वर्षांत देशाचा झालेला विकास, परदेशात देशाची सुधारलेली प्रतिमा, महिला व युवकांना मिळालेल्या संधी व काँग्रेसच्या घराणेशाहीवर सडकून टीका केली.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चेला आज पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘‘गेल्या ६० वर्षात पहिल्यांदा सलग तिसर्यांदा सत्तारुढ होण्याची संधी मिळाली आहे. मागची निवडणूक संविधानावर लढविली गेली होती. राज्यघटना धोक्यात आल्याचा ढोल पिटला जात होता. परंतु संविधान माझ्या कारकिर्दीत नव्हे तर १९७७ मध्ये धोक्यात होते. तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली लोकतंत्र बचाव मोहिम चालविण्यात आली होती. तेव्हा राज्यघटनेची सर्व तत्वे पायदळी तुडविण्यात आली होती.
अनेकांना कोणतेही कारण नसताना तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत संविधानाची तोडमोड करणार्यांचा भारतीय मतदारांनी पराभव केला होता. ते आज संविधान बचावच्या बाता करीत आहे. संविधानावर आमचा विश्वास आहे, म्हणून जनतेने आम्हाला पुन्हा सत्तारुढ होण्याची संधी दिली. संविधान हे माझ्यासाठी केवळ कलमांचा पुंजका नाही,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या दहा वर्षात सर्व क्षेत्रात प्रगती झाल्याचा दावा करून ते म्हणाले, की शेतकरी, युवक व महिलांच्या जीवनामध्ये बदल झाला आहे. आज देशात युवक स्टार्टअप सुरू करून नवा अध्याय सुरू करीत आहे. कृषीच्या क्षेत्रात नवे बदल झाले आहे. गेल्या दहा वर्षांत किमान हमी भावात (एमएसपी) सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. महिलांना येत्या काही वर्षांत तीन कोटी लखपती दिदी करण्याचा करण्याचा मनोदय आहे. ज्या महिलांनी कधीही सायकलही चालविली नाही. त्या आज ड्रोन चालवून पैसा कमवित आहे, हे दृश्य मला खूप समाधान देणारे असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, ‘‘महिलांवरील अत्याचाराने मन विषण्ण होत आहे. परंतु विरोधक यात निवडक राहत आहेत. पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेला मारहाण करण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याचप्रमाणे संदेशखालीच्या महिलांवरील अत्याचारावर विरोधक मूग गिळून आहेत, असे म्हणत त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा मणिपूरमधील हिंसाचारावर सविस्तर निवेदन दिले. मणिपूरमध्ये दोन समुदायांमध्ये होत असलेल्या हिंसाचारावर बोलताना ते म्हणाले, की मणिपूरमध्ये ११ हजारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जवळपास ५०० जणांना अटक करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून शांतता प्रस्थापित केली जात आहे. आता मणिपूर शांत होत आहे. याच मणिपूरमध्ये काँग्रेसने यापूर्वी नऊ वेळा राष्ट्रपती राजवट लावली होती, असा दाखलाही त्यांनी दिला.
एकेकाळी काँग्रेसच्यावर टीका करणारे समाजवादी पक्ष व आम आदमी पक्षाचे नेते सोबत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करून ते म्हणाले, ‘सपच्या नेत्यांनासुद्धा आणिबाणीच्या काळात तुरूंगात राहावे लागले होते. ते आज काँग्रेससोबत संविधान बचावची लढाई लढत आहे. आपच्या नेत्यांवर काँग्रेसने आरोप केले होते. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी ईडीकडे केली होती. परंतु आज आप व काँग्रेस एकत्र आहेत, हा विरोधाभास असल्याचेही त्यांनी सांगितले.
भ्रष्टाचारांवर कारवाई यापुढेही सुरू राहील, असे स्पष्ट करून ते म्हणाले, की केंद्रीय तपास यंत्रणांना पूर्ण मुभा दिली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाई यापुढे सुरू राहील, असे सांगून त्यांनी ईडी-सीबीआयचा फेरा विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पडणार असल्याचे स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.