Raebareli Lok Sabha Election Result: रायबरेलीत कुटुंबाची प्रतिष्ठा राखली; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींचा विजय
नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा रायबरेलीत विजय झाला आहे. गांधी कुटुंबीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रायबरेलीमध्ये राहुल गांधी यांनी प्रतिष्ठा राखली आहे. राहुल हे पहिल्यांदाच रायबरेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात होते.
सोनिया गांधी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव या मतदारसंघातून माघार घेतली आणि राहुल गांधी यांना पुढे केलं गेलं. देशाच्या स्वातंत्र्यापासून हा मतदारसंघ गांधी घराण्याशी संबंधित होता. काँग्रेसचा गढ मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघाचे सोनिया गांधी या २००४ पासून प्रतिनिधित्व करत होत्या. यावेळी या मतदारसंघात राहुल गांधी यांना उमेदवारी मिळाली असल्याने या जागेकडे देशाचे लक्ष होते.
काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ
राहुल गांधी हे अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता होती, पण त्यांनी रायबरेली हा काँग्रेससाठी सुरक्षित मानला जाणारा मतदारसंघ निवडला. राहुल गांधी यांच्यासमोर यावेळी भाजपचे दिनेश प्रताप सिंग यांचे आव्हान होते. रायबरेलीमध्ये बछरावां, हरचंदपुर, सरेनी रायबरेली, ऊंचाहार हे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील चार विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. तर एका जागेवर भाजपचा आमदार आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला
- १९५२ पासून काही वर्षे सोडता गांधी घराण्याचा उमेदवार
-२००४ पासून सोनिया गांधींचे प्रतिनिधत्व
- राहुल गांधी पहिल्यांदाच रायबरेलीतून उभे
- सोनिया गांधींंचं मताधिक्य कमी होत असल्याने धाकधुक होती
राहुल गांधी यांनी रायबरेलीची निवड केल्यानंतर त्यांच्यावर टीका केली गेली. ते अमेठीचे मैदान सोडून पळून गेले अशी टीका स्मृती इराणी यांनी केली होती. तसेच, दिनेश प्रताप सिंह यांनी राहुल गांधी यांना सहज हरवण्याचा दावा केला होता. दिनेश प्रताप सिंग हे माजी काँग्रेस आमदार आहेत. त्यांनी २०१८ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर रायबरेलीतून त्यांनी २०१९ मध्ये सोनिया गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.
मताधिक्य कमी होत गेले
रायबरेली सुरक्षित मतदारसंघ मानला जात असला तरी २०१४ पासून काँग्रेस उमेदवाराला मिळणारे मताधिक्य कमी होत गेले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोनिया गांधी या ३.५ लाख मतांनी विजय झाल्या होत्या. पण, २०१९ मध्ये दिनेश प्रताप सिंह यांच्याविरोधात लढताना त्यांचे मताधिक्य कमी होऊन १.६७ लाख झाले होते. त्यामुळे काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा मानली जात होती. यावेळी सोनिया गांधी नाही तर राहुल गांधी मैदानात असल्याने रायबरेलीचा विजयी उमेदवार कोण होईल याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती..
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.