Water scarcity in Delhi : दिल्लीतील पाणीटंचाईवर आता जलसत्याग्रह

दिल्लीतील चिघळलेल्या पाणी टंचाईकडे हरियाना सरकार आणि केंद्र सरकारने दुर्लक्ष चालविल्याचा आरोप करून केजरीवाल सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री आतिशी यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले.
Water scarcity in Delhi
Water scarcity in Delhisakal
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीतील चिघळलेल्या पाणी टंचाईकडे हरियाना सरकार आणि केंद्र सरकारने दुर्लक्ष चालविल्याचा आरोप करून केजरीवाल सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री आतिशी यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले. हे उपोषण म्हणजे जलसत्याग्रह असल्याचे आतिशी यांनी जाहीर केले. दरम्यान, विरोधी पक्ष भाजपने मात्र आपचे मंत्री आणि आमदार पाण्याचा काळाबाजार करत असल्याने टंचाई निर्माण झाल्याचा आरोप केला आहे.

दिल्लीमध्ये दीड महिन्यापासून विविध भागांमध्ये तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे. हरियानाकडून दिल्लीला पुरेसे पाणी सोडले जात नसल्याचा आरोप आप सरकारकडून सातत्याने केला जात आहे. याच मुद्द्यावर दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर आप सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री आतिशी यांनी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरवात केली. राजघाटावरील महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन मंत्री आतिशी यांनी उपोषण सुरू केले. यावेळी त्यांच्यासमवेत राज्यसभेचे खासदार संजय सिंह तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, मंत्री सौरभ भारद्वाज तसेच अन्य नेते देखील उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत पाणी टंचाई असल्याचे मान्य केले. पण हरियाना सरकार दिल्लीच्या हिश्श्याचे पाणी द्यायला तयार नाही. दिल्लीकर पाणी टंचाईमुळे त्रासले आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठविले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जलसत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री आतिशी यांनी सांगितले. जोपर्यंत दिल्लीवासियांना पाणी मिळत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहील, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

सुनीता केजरीवाल यांनीही पाणी मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली. तसेच, या कठीण प्रसंगी दिल्लीतील लोकांनी एकमेकांना मदत करावी, असे आवाहन करणारा संदेश मुख्यमंत्री केजरीवाल यांचा तुरुंगातून संदेश पाठिवल्याचेही सुनीता केजरीवाल यांनी सांगितले.

‘आप’कडूनच पाण्याचा काळाबाजार: भाजप

दिल्लीतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी आम आदमी पक्षाच्या मंत्री आणि आमदारांकडून पाण्याचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप केला. आपचे मंत्री आणि आमदार पाण्याची चोरी करत असून ते थांबविण्याऐवजी मंत्र्यांना प्रकाशझोतात राहायचे आहे. हरियानाने दिल्लीला पुरेसे पाणी दिले असल्याचे तेथील मुख्यमंत्र्यांनी आणि पाणीपुरवठा मंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यावर मंत्री आतिशींकडे उत्तर नाही, अशीही टीका त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.