नागपूर: पूर्वी भाजप सेनेची युती होती. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात आम्ही युतीसोबत आल्यानंतर भाजप, सेना रिपाईची महायुती झाली. आमचा पक्ष देशभरात आहे. नगालॅंडमध्ये दोन आमदार आहेत.
जम्मूमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत ४ उमेदवार रिंगणात आहे. पक्षाला मान्यता मिळाली असून पक्षाचे चिन्ह आयोगाने दिले. यामुळे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत उमरखेड, वाशीम, उत्तर नागपूर, उमरेडसह एकूण १२ जागा रिपब्लिकन पक्षाला द्याव्यात अशी मागणी करतानाच महायुतीने रिपाईला कमी लेखू नये, असा अप्रत्यक्ष इशाराही रिपाईचे नेते व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.
रिपाईच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेत भूपेश थुलकर, राजन वाघमारे, महेंद्र मानकर, विनोद थुल, विजय आगलावे, भीमराव बनसोड, दयाल बहादुरे, डॉ. मनोज मेश्राम, बाळू घरडे, सतीश तांबे उपस्थित होते. आठवले म्हणाले, राज्याचे राजकारण चुकीच्या दिशेने जात आहे. आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करताना एकमेकांची उणीदुणी काढली जात असून हा प्रकार योग्य नाही.
राहुल गांधी यांचा आरक्षण संपविण्यास विरोधच आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याचा खोटा प्रचार कला, तुयामुळे गैरसमज निर्माण झाला. परंतु त्यांच्याविरुद्ध जीभ छाटणे, चटके देणे अशी भाषा वाचाळवीरांनी वापरू नये अशा शब्दात आठवले यांनी भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांना घरचा आहेर दिला.
संविधान कोणीच बदलू शकत नाही.
संविधानामुळे देश अखंड आहे. हे संविधान प्रधानमंत्री मोदी काय तर कुणीही बदलू शकत नाही. याच संविधानामुळे राहुल गांधींना पद मिळाले ते परदेशात जात आहेत. देशाची लोकशाही धोक्यात असल्याचे ते बोलतात, त्यामुळे त्यांचा पासपोर्ट जप्त करावा, देशविरोधी बोलणार नाही, अशी लेखी हमी लिहून घ्यावी.
काश्मिरात कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सत्तेत आल्यावर एनडीएच्या नेत्यांना तुरुंगात टाकेल, अशी भाषा केली. आम्ही १० वर्षांपासून सत्तेत आहे. मात्र, ते तुरुंगात गेले नाही.
ॲड. प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपाई ऐक्य अपूर्ण
रिपाई ऐक्याला पाठिंबा आहे. मात्र ॲड प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावे. त्याच्या बहुजनांना संघटित करण्याच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करतो, परंतु त्यांनी रिपब्लिकन हा शब्द सोडू नये. ऐक्यासाठी मी मंत्रिपद सोडण्यास तयार आहे. ते सोबत आल्यास समाजाची ताकद वाढेल. मी मंत्री आहे, त्यांनाही मंत्रिपद मिळेल. समाजाचे बळ वाढेल. ॲड. आंबेडकर यांच्याशिवाय रिपब्लिकन ऐक्य अपूर्ण आहे, असेही आठवले एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
#ElectionWithSakal
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.