Bangladesh Student Protest : परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात ; राजधानी ढाक्यातील तणाव निवळला,इतरत्र हिंसाचारात २४ तासांत शंभर मृत्युमुखी

बांगलादेशमध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना परागंदा झाल्यानंतरही हिंसाचार पूर्णपणे थांबलेला नाही. हसीना यांनी देश सोडल्यानंतर विविध ठिकाणी झालेल्या संघर्षात किमान शंभर जणांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
Bangladesh Student Protest
Bangladesh Student Protest sakal
Updated on

ढाका : बांगलादेशमध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना परागंदा झाल्यानंतरही हिंसाचार पूर्णपणे थांबलेला नाही. हसीना यांनी देश सोडल्यानंतर विविध ठिकाणी झालेल्या संघर्षात किमान शंभर जणांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बांगलादेशातील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४४० पर्यंत गेली आहे. देशाची सूत्रे हाती घेतलेल्या लष्कराकडून परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू असून राजधानी ढाक्यात स्थिती पूर्वपदावर येत आहे.

हिंसाचार रोखण्यासाठी पोलिस आणि सैनिकांची पथके गस्त घालत आहेत. सरकार कोसळल्यामुळे आंदोलनाची धग कमी झाली आहे. मात्र, अद्यापही आंदोलक रस्त्यांनी फिरताना दिसत असल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले. हसीना यांनी देश सोडल्यानंतरही देशातील काही भागांत सोमवारी रात्री संघर्षाच्या घटना घडल्या. या हिंसाचारात किमान शंभर जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी आणि सूत्रांनी सांगितले. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या कार्यालयांवर हल्ले करत आंदोलकांनी जाळपोळ केली. जोशोर जिल्ह्यात अवामी लीगच्या एका नेत्याच्या मालकीच्या हॉटेलला लावलेल्या आगीत २४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. बांगलादेशमध्ये १६ जुलैपासून सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ४४० जणांचा मृत्यू झाला आहे.

व्यापारात नुकसान

कोलकता : बांगलादेशमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याने भारताबरोबरील त्यांच्या व्यापारातही अडथळे आले आहेत. रस्तेमार्गाने होणारा व्यापार ठप्प पडला आहे. बांगलादेशच्या सीमाशुल्क विभागाकडून प्रवेशाची परवानगी न मिळाल्याने भारतीय सीमेवर शेकडो ट्रक अडकून पडले आहेत. बांगलादेशमधील अनेक कारखाने भारतातून जाणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून असल्याने ते कारखानेही अडचणीत आले आहेत. प्रवासी वाहतूकही बंद पडली आहे. बांगलादेश हा भारताचा दक्षिण आशियातील सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश आहे. या आर्थिक वर्षात भारताची बांगलादेशला होणारी निर्यात १.२० अब्ज डॉलरने कमी झाली आहे.

शाळा पुन्हा उघडल्या

सोमवारच्या तुलनेत आज राजधानी ढाक्यातील स्थिती शांततेची होती. आंदोलनामुळे मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळाही आज उघडल्या. सार्वजनिक वाहतूक सेवाही काही प्रमाणात सुरू झाली असून दुकानेही उघडली होती.

बांगलादेशमधील परिस्थिती पाहता भारताला आपल्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागणार आहे. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी देशाला सज्ज राहावे लागणार आहे. बांगलादेशात राजकीय मार्गाने तोडगा निघण्याची आपण वाट पहायला हवी.

- पंकज सरन, भारताचे बांगलादेशातील माजी राजदूत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.