वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक हा सध्या पाकिस्तानमध्ये आहे. सोमवारी पाकिस्तानात पोहचलेल्या झाकीर नाईकचे येथे जोरदार स्वागत करण्यात आले. येथे पोहचल्यावर त्याने अनेक न्यूज चॅनल्सना मुलाखती दिल्या आहेत. यादरम्यान झाकीर नाईकने गोमांसाबद्दल केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यावेळी झाकीर नाईकने मोदी सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या बाजून विधान केले आहे.
पाकिस्तानमधील जिओ न्यूजच्या रिपोर्टरने झाकीर नाईक याला भारतात गोमांस विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीचे मुस्लीमांनी पालन करावे का? असा प्रश्न विचारला होता. यावर झाकीर नाईकने उत्तर दिले की हा एक वयक्तिक मत असते आणि एक इस्लामिक मत असते. इस्लामी शरीयतमध्ये सांगितले आहे की, ज्या देशात तुम्ही राहता त्या देशाच्या कायद्याचे पालन करा जोपर्यंत तो देश अल्लाह आणि रसूल यांच्या कायद्यांच्याविरोधात जात नाही. उदाहरणार्थ जर एखाद्या देशाने नमाजावर बंदी घातली तर तो कायदा मान्य केला जाणार नाही, कारण नमाज इस्लाम धर्मात कर्तव्य (अनिवार्य) आहे.
झाकीर नाईकने पुढे सांगितलं की, गायीचे मांस खाणे इस्लाममध्ये 'फर्ज' नाही, जर कोणी बंदी घालत असेल तर आपण त्या कायद्याचे पालन केले पाहिजे. माझे वयक्तिक मत विचाराल तर बीफ बॅन हा देखील एक राजकीय मुद्दा आहे, कारण कोट्यवधींच्या संख्येने हिंदू देखील मासांहार, गोमांस खातात. नवे सरकार आल्याने अनेक राज्यात गोमांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. जर तुम्ही मुलीची छेड काढली तर तीन वर्षांची शिक्षा आहे आणि गायीचं मांस खाल्लं तर पाच वर्ष शिक्षा आहे, माझ्या मते हे काही लॉजिकल नाही.
झाकीर नाईकने न्यूज चॅनलशी बोलताना इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षावर देखील भाष्य केले. अल्लाहचा प्लॅन बेस्ट ऑफ फ्लॅन आहे, ज्याबद्दल माणसाला नंतर कळते. उदाहरण पाहायचे झाल्यास अल्लाह तआला पॅलेस्टाईनला एका दिवसात जिंकवू शकतो, पण जिंकवलं नाही कारण अल्लाह हा उत्कृष्ट प्लॅनर आहे, जर अल्लाहने एका दिवसात जिंकवले असते तर एक वर्षभर चाललेल्या युद्धानंतर हजारो लोक पॅलेस्टाईनच्या बाजुने आले नसते. सात ऑक्टोबर रोजी झालेल्या घटनेनंतर ९९ टक्के बिगर मुस्लीम इस्त्राईलच्या बाजूने होते मात्र आज ९९ टक्के लोक गाझाला योग्य ठरवत आहेत.