Swasthyam 2022 : अध्यात्मामुळेच जगात प्रेम; कुमार विश्‍वास

कुमार विश्‍वास यांचे प्रतिपादन; 'सकाळ'च्या 'स्वास्थ्यम्' उपक्रमाला सुरुवात
sakal organize swasthyam 2022 Kumar Vishwas statement Love in world because of spirituality
sakal organize swasthyam 2022 Kumar Vishwas statement Love in world because of spirituality
Updated on

पुणे : भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये नोकरी करणे हे सार्थक आहे, पण चांगला मनुष्य बनणे आवश्यक आहे. प्रत्येकाला डॅाक्टर, इंजिनिअर, नेता व्हायचे आहे, पण त्याआधी आपल्याला चांगला व्यक्ती बनावे लागणार आहे. अन्यथा चोर निर्माण होतील. या जगात धार्मिक कट्टरतेमुळे द्वेष आहे, तर प्रेम हे केवळ अध्यात्मामुळे आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम कवी, व्याख्याते कुमार विश्वास यांनी आज (ता.९) येथे केले.

'वुई आर इन धिस टुगेदर' या मोहिमेद्वारे आरोग्याचे विविध पैलू अनोख्या पद्धतीने उलगडून दाखविणाऱ्या 'सकाळ'च्या 'स्वास्थ्यम्' उपक्रमाला आजपासून (ता.९) पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे प्रारंभ झाला. त्या वेळी कुमार विश्वास बोलत होते. या वेळी 'सकाळ'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, संचालिका मृणाल पवार, आत्मसंतुलन व्हिलेजचे सुनील तांबे उपस्थित होते. पुना ब्लाईंड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कुमार विश्वास यांचे स्वागत केले. सुरेल गायन अन् तेवढ्याच सुरेखपणे शब्दांची उकल करत रामायण-महाभारतातील संदर्भ देत उत्तम मानसिक स्वास्थ्याचा अर्थ विश्वास यांनी समजावून सांगितला.

ते म्हणाले, ''मला माझ्या लोकांनी सांगितले होते की सेमिनारसारखा हा कार्यक्रम आहे. पण इथे आल्यानंतर मला वेगळाच अनुभव आला. अभिजित पवार यांचे विचार आणि सुनिल तांबे यांचा ओमकार ऐकून मी तृप्त झालो. पुणे हे आध्यात्मिक नगर आहे. मी पुण्यात अनेक कार्यक्रम केले. पण अध्यात्मासाठी प्रथमच या सभागृहात आलो आहे. यासाठी 'सकाळ'चे आभार मानतो. आजच्या अविस्मरणीय क्षणाचे आपण साक्षीदार बनलो आहोत. आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी आज जे तरुण आलेले आहेत, हे फार महत्त्वाचे आहे. व्याधी केवळ शरीरात नाहीत, तर मनात, विचारांत असते.''

कुमार विश्वास म्हणाले,‘‘ आत्मशुद्धी असेल तरच स्वास्थ्य ठेवता येते. भारतात लोक ५० वर्ष एकत्र विवाह बंधनात राहतात, याचे आश्चर्य व्यक्त केले जाते; परदेशांत १० वर्षेही विवाह टिकत नाही. आपण आपला आत्मा ‘अॅडजस्ट’ केल्यामुळे हे शक्य होते. निसर्गासोबत राहता आले पाहिजे. आपण सर्वांना सोबत घेऊन चालतो. मुंग्यासाठीही पेढे ठेवणारा आपला देश आहे. ‘कोणीही उपाशी राहू नये’, असा संदेश त्यातून दिला जातो. भौतिकशास्त्रात ‘गॉड पार्टीकल’ असतो. तो दिसतो कसा, आकार किती आहे, हे माहिती नाही. पण तोच सगळे चालवतो. हेच आपण गेले हजारो वर्ष देवाबद्दल सांगत होतो. पण पाश्चिमात्य देशांनी सांगितले ते खरे वाटते.’’ मनाच्या स्वास्थ्याचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, मनाचे स्वास्थ्य हे महत्वाचे आहे. शरीराची सीमा व मनाची सीमा यांचा ताळमेळ बिघडल्याने समस्या निर्माण होत आहेत. आपल्या शरीराने मनाच्या सीमेला नियंत्रित केले, तर समस्या निर्माण होणार नाहीत.

शहरीकरणामुळे समस्या

‘‘महत्वाकांक्षा अपार ठेवा, लालसा शून्य ठेवा, असे सांगितले जाते. पण आपण नेमके उलटे वागत आहोत. लालसा अमर्यादित झाली आहे,’’ असे निरीक्षण कुमार विश्‍वास यांनी नोंदविले. ते म्हणाले,‘‘शिक्षणामुळे सर्व काही व्यवस्थित होईल, असे सांगितले जाते. पण प्रदूषण, गैरव्यवहार, बलात्कार, धर्मांधता वाढली आहे. या समस्या शहरीकरणाने वाढल्या आहेत. पूर्वी गावातील मुलगी सर्वांची बहिण होती, पैशाचा गैरव्यवहार नव्हता. पण आता व्यवस्था बदलली जात आहे. शिक्षणाचा स्वास्थ्य आणि शुद्ध आत्म्याशी काही संबंध राहिलेला नाही. आईच्या कुशीत, आजी-आजोबांच्या शिक्षणातही स्वास्थ्य आहे. मी विद्यापीठाचा टॉपर आहे, तरीही अनुभवातून हे विचार तयार झाले आहेत. तुमचे शरीर, मन आणि आत्मा यांना चांगला आहार मिळाला नाही, तर तुमचे स्वास्थ्य कसे चांगले राहिल?, असा सवालही कुमार विश्‍वास यांनी विचारला. जप केल्याने अहंकार येत नाही, असल्यास तो टिकत नाही.’’

अभिजित पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ते म्हणाले, ''यम ते संयमापर्यंत कसे पोहोचायचे हे आम्ही 'स्वास्थ्यम्'मधून सांगणार आहोत. आपले मन कसे संतुलित करायचे, हे सांगायचे आहे. आपण येथे श्रीराम पंचायतानची मूर्तिची पूजा केली. हे कर्मकांड नाही, तर मूर्तीसह आपण स्वतः शुद्ध व्हावे, यासाठी ही पूजा केली. वाक् शुद्धीतून भक्ती वाढवायची आहे. प्रसार माध्यमांचे दैवत नारदमुनी आहेत. तुम्ही त्याचेच रूप आहात. अधर्म संपविण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.''

सुनील तांबे यांनी या वेळी शास्त्रीय पद्धतीने ओमकारचे गायन करून उपस्थितांनी मंत्रमुग्ध केले. विजय कांबळे बासरी वादनाने वातावरणात चैतन्य निर्माण केले. निरीताजी यांनी हर्मोनियन साथ दिली. सूत्रसंचालन योगेश देशपांडे, वसुंधरा काशीकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.