Jalgaon Water Shortage : शहरासह ग्रामीण भागातील दहा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील पळासदड येथील अंजनी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंजनी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा असल्यामुळे नागरिकांनी पाणी वाया जाणार नाही, याबाबतची दक्षता घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (10 villages including Erandol town fear serious water problem)
एरंडोल शहरासह ग्रामीण भागातील कासोदा, फरकांडे, जळू, नांदखुर्द बुद्रुक व खुर्द, धारागीर, विखरण, बांभोरी खुर्द व बुद्रुक, टोळी खुर्द या गावांना अंजनी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्यास्थितीत प्रकल्पात केवळ चार टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रकल्पातील अत्यल्प जलसाठ्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील दहा गावांमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी अंजनी प्रकल्पातून अंजनी नदीपात्रात सुमारे पंधरा ते वीस दिवस पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया गेले. प्रकल्पातून पुन्हा पाणी सोडण्याचे नियोजन प्रशासनातर्फे केले जात असल्याची माहिती समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, दशरथ महाजन यांना समजताच त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून पाणी सोडण्यात येवू नये, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
सध्यास्थितीत शहरात सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असून, महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पाण्याची समस्या निर्माण झाली असतानादेखील शहरातील अनेक खासगी व सार्वजनिक नळांना तोट्या नसल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात नगरपालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (latest marathi news)
मागील सात वर्षांपासून अंजनी प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा होत होता, मात्र मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा झालेला नव्हता. यावर्षी पावसाळा लांबल्यास संपूर्ण तालुक्यात पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन
अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीसह काम पूर्ण झाले आहे. मात्र, वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या गावांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे या प्रकल्पात पूर्णक्षमतेने जलसाठा करता येत नाही. वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या या गावांचे पुनर्वसन झाल्यास व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाल्यास प्रकल्पात पूर्ण जलसाठा होऊन एरंडोल व धरणगाव शहरास ग्रामीण भागातील अनेक गावांतील पाण्याची समस्या दूर होऊन हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. दरम्यान, प्रकल्पातील अत्यल्प जलसाठा लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून पाणी वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.