NTA NEET-UG Exams : भावी डॉक्टरांचे भविष्य अन्‌ जीवही टांगणीला..!

Educational Article : गेल्या काही वर्षांत सातत्याने या संस्थांमार्फत राबविल्या जाणाऱ्या परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका फुटण्याचे व या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ, गैरव्यवहार होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
NTA NEET-UG Exams
NTA NEET-UG Examsesakal
Updated on

शिस्त आणि कठोर नियमांच्या अंमलबजावणीचा आदर्श घालून देणाऱ्या परीक्षांमध्ये ‘एनटीए’च्या ‘नीट’ परीक्षेचा समावेश होतो किंबहुना होत होता. कारण गेल्या काही वर्षांत आणि यंदा तर ‘नीट- युजी’ परीक्षेतील कथित घोळ, गैरव्यवहारांमुळे अशाप्रकारच्या सर्वोच्च परीक्षांच्या विश्‍वासार्हतेवर पर्यायाने त्या राबविणाऱ्या यंत्रणावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेय.

‘नीट’मधील घोळ केवळ सीबीआयच्या तपासाचा आणि सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी दाखल याचिकांच्या सुनावणीचा भाग राहिलेला नाही, तर हजारो- लाखो विद्यार्थ्यांचे, भावी डॉक्टरांचे भवितव्य व त्यांच्या पालकांचा जीव यामुळे टांगणीला लागला आहे. (jalgaon latest article on NTA NEET UG Exams)

केंद्रीय स्तरावरील काही महत्त्वपूर्ण यंत्रणा देशभरातील विविध महत्त्वाच्या अभ्यासक्रमांसह नोकर भरतीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षांची प्रक्रिया राबवीत असतात. परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे राबविण्यासाठी अशाप्रकारच्या यंत्रणा, संस्था अत्यंत शिस्तीने व कठोरपणे नियमांची अंमलबजावणी करतात.

केंद्रीय लोकसेवा आयोगासह राष्ट्रीय चाचणी यंत्रणा (National Testing Agency) यासारख्या संस्थांची अशाप्रकारच्या परीक्षा कंडक्ट करण्याची पद्धतीच वेगळी असल्याने त्यांची विश्‍वासार्हता काल- परवापर्यंत टिकून होती. मात्र, गेल्या काही वर्षांत सातत्याने या संस्थांमार्फत राबविल्या जाणाऱ्या परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका फुटण्याचे व या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ, गैरव्यवहार होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

यंदा मेमध्ये ‘एनटीए’ने वैद्यकीय शाखेतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्‍यक घेतलेल्या ‘नीट- युजी’ परीक्षेतील घोळ दीड महिन्यापासून चर्चेचा विषय ठरला आहे. अगदी या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यापासून परीक्षा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकलीय.

परीक्षेच्या निकालात काही ठराविक केंद्रांवरील विद्यार्थ्यांना भरभरून गुण मिळालेत, काही विशिष्ट केंद्रांवरील विद्यार्थ्यांना उशिरा प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्याचे कारण पुढे करत अतिरिक्त गुणांची (ग्रेस मार्क्स) खैरात वाटल्याचे प्रकार समोर आले. ते काही ठिकाणी सिद्धही झाले आहेत. काही केंद्रांवर परीक्षेच्या आधी प्रश्‍नपत्रिका फुटल्याचेही समोर आले आहे.

देशभरात या घोळामुळे परीक्षा वांध्यात आली आणि ती रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी होऊ लागली. त्यासाठी विविध न्यायालये, उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल झाल्या. सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल असून, त्यांची एकत्रित सुनावणी सध्या सुरू आहे. देशभरातील जवळपास २४ लाख विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून, दोन- चार टक्के घोळामुळे या सर्वच विद्यार्थ्यांचे प्रामाणिक प्रयत्न धोक्यात आले आहेत. (latest marathi news)

NTA NEET-UG Exams
NEET Exam : फक्‍त 5 विद्यार्थी पोचले ‘सातशेपार!’; 20 परीक्षा केंद्रांवरील 10 हजार 909 विद्यार्थ्यांचा ‘नीट’चा तपशील जाहीर

एकीकडे या घोळाचा सीबीआयमार्फत तपास सुरू आहे, तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. सुनावणीदरम्यान दोन-चार तारखांना कामकाज झाले असले, तरी सर्वोच्च न्यायालय अद्याप कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही.

सीबीआयच्या तपासातून अंतिम निष्कर्ष निघालेले नाहीत. ही प्रक्रिया सुरू असताना, ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिली, त्या सर्वच विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. डॉक्टर बनण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे विद्यार्थी आणि प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन पाल्यांना सुविधा पुरविणारे पालक असे दोन्ही घटक यात भरडले जाताहेत.

अशाप्रकारचा गंभीर घोळ झाला असेल, तर तो करणाऱ्या प्रत्येक घटकाला हुडकून काढत त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. भविष्यात कोणत्याही परीक्षेत थोडाही घोळ करण्याआधी थरकाप उडेल, अशाप्रकारचे कठोर शासन यातील गैरव्यवहार करणारे विद्यार्थी, त्यांना मदत करणारे संबंधित दोषी, यंत्रणांमधील घटक, अशा सर्वांनाच व्हायला हवे.

मात्र हे होत असताना, २४ लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायला भाग पाडणे, हे न्याय्य ठरणार नाही. कारण त्यात काही विद्यार्थी गेल्यावर्षी चांगले गुण नाहीत, म्हणून काहींना हव्या त्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला नाही, म्हणून तर काहींना चांगले महाविद्यालय मिळाले नाही, म्हणूनही त्यानी ‘नीट’ रिपीट केली असेल. अशा सर्वच विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षा घेतली तर अन्याय होणार आहे. सरकारने याप्रश्‍नी विद्यार्थीहिताची ठोस भूमिका घेणेच उचित ठरेल.

NTA NEET-UG Exams
NEET Exam : हद्दच झाली! बारावीच्या परीक्षेत नापास पण 'नीट'मध्ये 705 मार्क; नेमका प्रकार काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.