Jalgaon Summer Heat : शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा (सनस्ट्रोक) धोका वाढला आहे. जळगाव शहरात एकाच दिवसात दोन ज्येष्ठ नागरिकांचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. इच्छादेवी चौकात एकाचा, तर ऑटोनगर एमआयडीसीत दुसऱ्याचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे मृत्यू ओढावल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Jalgaon Summer Heat Two died in different incident )
जळगाव शहरातील इच्छादेवी चौकातील अंकल ट्रॅव्हल्सच्या ऑफिसशेजारीच साधारण ५० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह सेामवारी (ता. १३) दुपारी बाराच्या सुमारास आढळून आला. जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक शरीफ शेख तपास करीत आहेत.
चक्कर येऊन एकाचा मृत्यू
दुसऱ्या घटनेत औद्योगिक वसाहत परिसरातील ट्रान्सपोर्टनगरात ४९ वर्षीय व्यक्तीचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १३) दुपारी बाराच्या सुमारास घडली. विनोद नामदेव बारी (वय ४९) असे मृताचे नाव आहे. उष्माघाताने चक्कर येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
विनोद बारी परिवारासह एस.टी. वर्कशॉपजवळ वास्तव्याला आहे. ते सोमवारी दुपारी बाराला एमआयडीसीतील ट्रान्सपोर्टनगरातून जात असताना, त्यांना अचानक चक्कर येऊन ते रस्त्यावर कोसळले. त्यांच्यासोबत असलेले रामकृष्ण नामदेव बारी व नारायण विष्णू बारी यांनी त्यांना खासगी वाहनातून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस नाईक दत्तात्रय बडगुजर तपास करीत आहेत.
काय आहे उष्माघात?
तापमानाची चाळीशी पार झाल्यावर तप्त उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला ‘सनस्ट्रोक’ किंवा ‘हिटस्ट्रोक’, असे म्हटले जाते. बाहेरचे तापमान खूप वाढले, की शरीरातील थर्मोरेग्यूलेशन, शरीरातील क्षार आणि पाण्याचे संतुलन बिघडते. त्यामुळे अचानक चक्कर येणे, उलट्या होऊन व्यक्ती बेशुद्ध होऊन मृत्यूही ओढवतो.
ही आहेत लक्षणे
-चक्कर येणे, उल्ट्या होणे, मळमळ होणे
-शरीराचे तापमान जास्त वाढणे
-पोटात कळ येणे
-डिहायड्रेशन शरीरातील पाणी कमी होणे
लक्षणे जाणवल्यास हे करा
-बाधित व्यक्तीला थंड, सावलीच्या ठिकाणी झोपवावे
-ओल्या सुती कपड्याने त्याचे पूर्ण शरीर पुसून घ्यावे
-त्याच्या डोक्यावर साधारण थंड पाणी टाकत राहावे
-एकंदरित त्याच्या शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा
-तो शुद्धीवर येताच त्याला ओआरएस, लिंबू सरबत द्या. गोड बिस्कीट खायला अथवा चॉकलेट चघळायला द्यावे
-त्या व्यक्तीला जवळच्या डॉक्टरकडे ताबडतोब न्या. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो
स्वतःच घ्या काळजी
-उन्हात विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळात बाहेर जाणे टाळा
-तप्त उन्हात अंगमेहनतीचे काम करणे टाळा
-थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत रहा. तहान लागली नाही, तरीही पाणी पीत राहा
-घराबाहेर पडताना हलके, फिकट रंगाचे, सुटसुटीत सुती कपडे घाला. गॉगल्स, छत्री, टोपी वापरा
-मद्य, चहा-कॉफी, फेस येणारे पेयामुळे (कार्बोनेटेड ड्रिंक्स) शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ही पेय टाळा
-उन्हात फिरून अस्वस्थ जाणवत असले, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.