Raigad Rain Update : अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक पहाटेपासून ठप्प

अतिवृष्टीमुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली परिणामी गुरुवारी (ता.25) पहाटे दोन वाजल्यापासून वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील पाली अंबा नदी पुलापासून दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती.
raigad rain update amba river crossed danger level Traffic on Wakan-Pali-Khopoli highway blocked
raigad rain update amba river crossed danger level Traffic on Wakan-Pali-Khopoli highway blocked Sakal
Updated on

पाली : अतिवृष्टीमुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली परिणामी गुरुवारी (ता.25) पहाटे दोन वाजल्यापासून वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील पाली अंबा नदी पुलापासून दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती. दुपारी दोन नंतर देखील ही वाहतूक ठप्प होती. तसेच अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

पाली अंबा नदी पुलाजवळ दोन्ही बाजूला जोड रस्त्यावर सखल भागात पाणी भरले होते. हे पाणी पाली मिनीडोअर स्टॅन्ड तसेच उन्हेरे फाटा इथपर्यंत आले होते. यामुळे येथील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

तसेच याच मार्गावर खोपोली बाजूकडे मोर टाक्या जवळ देखील रस्त्यावर पाणी साचल्याने तेथेही वाहतूक खोळंबली होती. दुपारी बारा नंतर पाणी ओसरल्यावर येथून वाहतूक सुरू झाली. मात्र पाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर पाणी असल्यामुळे ही वाहने पुन्हा त्या ठिकाणी अडकून पडली.

यावेळी खाजगी वाहने, एसटी बस, ट्रक टेम्पो आदी मालवाहू वाहने दुचाकीस्वार व प्रवासी व चाकरमानी अडकून पडले होते. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्यामुळे विद्यार्थी बाहेर पडले नाहीत. स्थानिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच आलेल्या वाहनांना मार्ग दाखवण्यासाठी मदत केली. रविवारी (ता.14) देखील अशाच प्रकारे येथील वाहतूक तब्बल सहा तास ठप्प झाली होती.

वीज पुरवठा खंडित, मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प

सकाळपासूनच पालीसह इतर गावातील काही ठिकाचा विजपुरवठा खंडित झाला होता. याशिवाय सर्व ठिकाणचे मोबाईल नेटवर्क तसेच इंटरनेटचे नेटवर्क स्लो झाले होते. तर काही कंपन्याचे नेटवर्क गुल देखील झाले. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.

सरस्वती नदी दुथडी भरली

सरस्वती नदी दुथडी भरली होती. त्यामुळे गोमाशी तोरंकेवाडी रस्त्यावर पाणी आल्यामुळे येथील वाहतूक देखील ठप्प होती. पाली पाटणूस मार्गाचे नुकतेच रुंदीकरण करण्यात आले आहे. तसेच नांदगाव येथे मोठा पूल बांधण्यात आला आहे. परिणामी यावेळी येथील पूलाला घासून पाणी जात होते. मात्र पुलावरून पाणी जाऊन वाहतूक ठप्प झाली नाही. तसेच भेरव येथे अंबा नदी पुलावरून पाणी गेल्यामुळे येथील वाहतूक देखील ठप्प होती.

अपेक्षा भंग

वाकण पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. तसेच पाली अंबा नदीवरील एक पूल पूर्ण झाला आहे. तर दुसऱ्या पुलाचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरण व मोठ्या व रुंद पुलामुळे पावसाळ्यात हा मार्ग सोयीचा व सुखकारक होईल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र पावसाळ्यामध्ये या सगळ्याचे बिंग फुटले आहे.

पाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी साचून मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवासी नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. त्यांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात सकाळपासूनच पुलाच्या बाबत सोशल मीडिया व व्हाट्सअपवर नागरिकांनी उपहासात्मकरीत्या टीका करून भावनांचा निचरा केला.

खुश्कीचा मार्ग

वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी व वाहने याच मार्गावरून जातात. हा मार्ग सुस्थितीत असल्यामुळे अनेक प्रवासी व वाहने याचा वापर करतात. मात्र पाली अंबा नदी पूल झाला असूनही पुलाच्या दोन्ही सखल बाजूला पाणी साचल्यामुळे प्रवाशी व वाहने दोन्ही बाजूस अडकून पडली व त्यांची गैरसोय झाली.

पर्यायी मार्ग

तळ कोकण व दक्षिण रायगड वरून जर पालीला यायचे असेल तर माणगाव वरून निजामपूर विळे मार्गे रवाळजे वरून पाली मार्ग सुरू आहे. तसेच पाली वरून पुणे व मुंबई येथे जाऊ शकतो. पाली खोपोली राज्य महामार्ग मार्ग दुपारी बारा वाजता खुला झाला. मुंबई पुणे दृतगती महामार्ग (एक्सप्रेस वे) सुरू, तसेच जुना मुंबई बेंगलोर हायवे देखील सुरू.

ड्रोनद्वारे चित्रीकरण

पाली अंबा पूल तसेच नदी परिसरात ठिकठिकाणी शिरलेले पाणी आणि हा परिसर कसा दिसत होता याचे विहंगम चित्रण पालीतील एका तरुणाने ड्रोन कॅमेरा द्वारे केले. अनेकांनी हा व्हिडीओ आपल्या व्हाट्सअप स्टेटस ला तसेच फेसबुक वर ठेवला होता.

अंबा नदीवरील पूलाच्या दोन्ही बाजूकडील पाणी असताना नागरिकांनी खबरदारी म्हणून सदर पुलाचा वापर करू नये. येथील वाहतूक तूर्तास थांबवण्यात आलेली आहे. पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. या ठिकाणी पोलीस देखील तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच प्रशासनातर्फे नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- उत्तम कुंभार, तहसीलदार, पाली-सुधागड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.