चिपळूण शिवसेना मरगळ कधी झटकणार

Silence In Chiplun Shivsena Ratnagiri Marathi News
Silence In Chiplun Shivsena Ratnagiri Marathi News
Updated on

चिपळूण ( रत्नागिरी ) - पालिकेतील सत्ता ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले. मात्र राज्यात घडत असलेल्या कोणत्याही घडामोडींचे पडसाद चिपळूणमध्ये उमटत नाहीत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आलेली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतरही ती मरगळ अद्याप दूर झालेली नाही. 

रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना सलग दोनवेळा चिपळूण मतदारसंघातून विजयी झालेले सदानंद चव्हाण तिसऱ्यांदा मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत झाले. त्यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. पराभवाचे आत्मचिंतन सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद निर्माण होईल असे वाटले होते मात्र विधानसभेच्या निकालानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आल्याची चर्चा आहे. ज्यांच्या विरोधात टोकाचा संघर्ष केला. कुटुंब आणि नात्यात संघर्ष केला. वरिष्ठांनी सत्तेसाठी त्यांना बरोबर घेतल्याचे दुःख कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र त्याबाबत कोणीही उघडपणे सांगण्यास तयार नाही.

चिपळूणात मात्र शांतता...

माजी आमदार सदानंद चव्हाण वगळता कोणीही मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे फलक लावलेले नाहीत. नागपूर अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. संपूर्ण राज्यात या कर्जमाफीचे स्वागत झाले. ठिकठिकाणी पेढे भरवून तर फटाके वाजवून कर्जमाफीचा आनंद साजरा करण्यात आला. चिपळुणातील शिवसेनेत कर्जमाफीच्या मुद्‌दयावर गारठलेली दिसली. केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मुस्लिमांबरोबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यात आंदोलन केले. चिपळुणातील मोर्चामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला नाही. कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले. राज्यातही त्याचे पडसाद उमटले. मात्र चिपळुणातील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शांत राहिले. 

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
शिवसेनेचे कार्यकर्ते हळूहळू सक्रिय होत आहेत. चिपळूण पालिकेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपची सत्ता होती. आम्ही भाजपला सत्तेपासून दूर केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. हा उत्साह वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

- बाळा कदम, चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख

वातावरण निर्मितीमध्ये पुढे 

देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. भाजपकडून प्रदेश व राष्ट्रीय पातळीवरून येणारे कार्यक्रम राबवण्यात भाजप कार्यकर्ते पुढे आहेत. शिवसेनेच्या तुलनेत ताकद कमी असली तरी वातावरण निर्मितीमध्ये भाजप शिवसेनेपेक्षा एक पाउल पुढे आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.