T20 World Cup 2024, India vs Pakistan: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारतीय संघाने रविवारी (9 जून) पाकिस्तानविरुद्ध 6 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. त्यामुळे भारतीय संघाने सुपर-8 मध्ये जागा मिळवण्यासाठी भक्कम दावेदारी ठोकली आहे.
दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघासाठी प्रत्येक धाव महत्त्वाची ठरली, याचीच आठवण सामन्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने करून दिली आहे. भारताकडून 11 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या मोहम्मद सिराजने 7 चेंडूत नाबाद 7 धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ 19 षटकात 119 धावांवर सर्वबाद झाला होता.
त्याच्या या 7 धावा संघासाठी महत्त्वाच्या ठरल्याबद्दल सिराजने आनंद व्यक्त केला आहे.
बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फिरकीपटू युजवेंद्र चहल भारतीय संघातील खेळाडूंची सामन्यानंतर मुलाखत घेताना दिसत आहे.
यावेळी सिराज म्हणाला, 'मी नेट्समध्ये फलंदाजीचा खूप सराव केला आहे, आयपीएलमध्येही मी सराव केला कारण तळातले फलंदाज जेवढ्या धावा करतील, त्या सामन्याअखेरीस महत्त्वाच्या ठरतात. शेवटी हे स्पष्ट झाले की मी केलेल्या त्या ७ धावा किती महत्त्वाच्या ठरल्या. मी खूप आनंदीआहे की मी त्या 7 धावा केल्या आणि आपण जिंकलो.'
या सामन्यात भारताने केवळ 6 धावांनी विजय मिळवल्याने सिराजने अखेरीस केलेल्या 7 धावा महत्त्वाच्या ठरल्या. दरम्यान, एका बाजूने भारतीय फलंदाजांच्या विकेट्स जात असताना दुसऱ्या बाजूने ऋषभ पंतने 42 धावांची महत्त्वाची खेळी केली होती.
तसेच त्याने सुरुवातीला झटपट विकेट गेल्यानंतर चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षर पटेलबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती. त्यांच्या या खेळीचेही चहलने कौतुक केले. त्यावेळी अक्षर आणि पंत यांनी फलंदाजी करताना परिस्थितीचा जास्त विचार न करता फलंदाजी केल्याचे सांगितले.
तसेच या सामन्यात पंतचे यष्टीरक्षणही शानदार झाले. त्याचबरोबर पंतने सिराजने केलेल्या क्षेत्ररक्षणाचेही कौतुक केले.
याशिवाय गोलंदाजीबद्दल सिराज म्हणाला, हा छोट्या धावसंख्येचा सामना असल्याने फार प्रयोग न करता गोलंदाजी करण्याची योजना होती.
या सामन्यात भारताने दिलेल्या 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला 20 षटकात 7 बाद 113 धावाच करता आल्या होत्या.
भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या, तसेच हार्दिक पांड्याने 2 विकेट्स, तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. सिराजला विकेट मिळाली नाही, पण त्याने 4 षटकात केवळ 19 धावा दिल्या होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.