Virat Kohli Instagram Post: विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही अनेक विक्रम केले आहेत. आता त्याने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा भारतीय संघाने जिंकल्यानंतर केलेल्या पोस्टनेही मोठा विक्रम केला आहे.
त्याने विजयाबद्दल केलेली पोस्ट ही इंस्टाग्रामवरील एखाद्या भारतीय अकाउंटवरील सर्वाधिक लाईक्स मिळालेली पोस्ट ठरली आहे. त्याने या पोस्टमध्ये त्याने भारतीय संघाने टी२० वर्ल्डकप उचलल्यानंतरचे फोटो पोस्ट केले होते.
तसेच त्याने लिहिले होते की यापेक्षा चांगल्या दिवसाचे स्वप्न पाहिले नव्हते. ईश्वर महान आहे आणि मी नम्रतेने माझी मान झुकवतो. आपण अखेर करून दाखवले. जय हिंद.' विराटच्या या पोस्टला १९ कोटींहून अधिक लाईक्स आले आहेत. तसेच लाखो कमेंट्स आल्या आहेत. यामध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रेटिंनीही कमेंट्स केल्या आहेत.
यापूर्वी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्या घोषणेच्या पोस्टला सर्वाधिक लाईक्स मिळाल्याचा विक्रम होता. पण आता त्यांच्या पोस्टला विराटने मागे टाकले आहे.
दरम्यान, या अंतिम सामन्यात विराटला सामनावीर पुरस्कारही मिळाला. त्याने या सामन्यात 59 चेंडूत 76 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याने अक्षर पटेल (47) आणि शिवम दुबे (27*) यांच्याबरोबर अर्धशतकी भागीदाऱ्या केल्या होत्या.
त्यामुळे भारताने 176 धावा केल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 8 बाद 169 धावा करता आल्या.
दरम्यान, या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने हा त्याचा शेवटचा सामना असल्याचे जाहीर केले. विराटने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 125 सामन्यांत 48.69 च्या स्ट्राईक रेटने 4188 धावा केल्या. यामध्ये 1 शतक आणि 38 अर्धशतके केली.