Ajinkya Rahane News: रणजी ट्रॉफी २०२३-२४ स्पर्धेचे विजेते मुंबई संघ आणि शेष भारत संघ यांच्यात यंदा इराणी कप स्पर्धेचा सामना होणार आहे. हा सामना १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी अजिंक्य रहाणे मुंबई संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे.
दरम्यान, अद्याप मुंबईने त्यांचा इराणी कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केलेला नाही. परंतु, क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार रहाणे या स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रहाणेच्या नेतृत्वाखालीच मुंबईने रणजी ट्रॉफी २०२३-२४ स्पर्धा जिंकली होती.
रहाणे नुकताच इंग्लंडमधून वनडे कप आणि काऊंटी क्रिकेट या देशांतर्गत स्पर्धा खेळून भारतात परतला आहे.
याशिवाय इराणी कप स्पर्धेत खेळण्यासाठी मुंबईसाठी शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर हे देखील उपलब्ध असणार आहेत.
शार्दुलच्या घोट्यावर जून महिन्यात शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे तो गेल्या काही महिने क्रिकेटपासून दूर होता. पण त्याने नुकतेच केएससीए स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामुळे तो आता तंदुरुस्त असल्याचे समजत आहे.
तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने क्रिकबझला दिलेल्या माहितीनुसार शार्दुलनेच प्रथम श्रेणी सामन्यासाठी तो उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, श्रेयस अय्यरही सध्या भारताच्या कसोटी संघातून बाहेर आहे. त्यामुळे तो देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी उपलब्ध असेल. त्याला आता भारतीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत श्रेयसचा फॉर्म फारसा दिसून आला नव्हता. त्यामुळे आता त्याच्यावरही चांगल्या कामगिरीसाठी दबाव असणार आहे.
इराणी कप स्पर्धेसाठी मुंबई संघाची मंगळवारी निवड जाहीर होणार आहे.