भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्ध दिल्लीला झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात ८६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडीही घेतली आहे. भारताने पहिला सामनाही जिंकला होता. दिल्लीला झालेल्या सामन्यात भारताच्या फलंदाजांबरोबर गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केल.
भारताने बांगलादेशसमोर २२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकात ९ बाद १३५ धावाच करता आल्या. बांगलादेशकडून शेवटची टी२० मालिका खेळत मेहमुद्दुलाने चांगली झुंज दिली होती. पण त्याचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देण्यास अपुरे ठरले.
बांगलादेशकडून परवेझ हुसैन इमॉन आणि लिटन दास यांनी सुरुवात चांगली केली होती. मात्र, तिसऱ्या षटकात परवेझला अर्शदीप सिंगने १६ धावांवर क्लिनबोल्ड केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो पाचव्या षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर ११ धावा करून बाद झाला. त्याचा झेल हार्दिक पांड्याने घेतला. पाठोपाठ पुढच्याच षटकात लिटन दासलाही वरुण चक्रवर्तीने क्लिनबोल्ड केले. तोहिद हृदोयलाही २ धावांवरच युवा अभिषेक शर्माने क्लिनबोल्ड केलं. त्यामुळे बांगलादेशची अवस्था ४६ धावांवर ४ विकेट अशी झाली होती. नंतर महमुद्दुला आणि मेहदी हसन मिराज यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची भागीदारी रियान परागने तोडली. त्याने ११ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिराजला १६ धावांवर माघारी धाडले. त्याचा झेल रवी बिश्नोईने पकडला. त्याच्या पुढच्याच षटकात जाकेर अलीही मयंक यादवविरुद्ध खएळताना वॉशिंग्टन सुंदरच्या हातात झेल देत बाद झाला. रिशाद हुसैनलाही ९ धावांवर वरुण चक्रवर्तीने हार्दिक पांड्याच्या हातून झेलबाद केले. हार्दिकने या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५० झेलही पूर्ण केले. दरम्यान अखेरीस महमुद्दुलाला तांझिम हसन साकिबने साथ दिली होती. पण तांझिमची विकेट ८ धावांवर नितीश रेड्डीने घेतली. तरी महमुद्दुलाह झुंज देत होता. अखेर त्याला शेवटच्या षटकात नितीश रेड्डीनेच बाद केले. महमुद्दुलाहने ३९ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. बांगलादेश संघ २० षटकात १३५ धावाच करू शकला.
भारताकडून गोलंदाजी करताना सात गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, मयंक यादव आणि रियान पराग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. भारताने ४१ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. यामध्ये संजू सॅमसन (१०), अभिषेक शर्मा (१५) आणि सूर्यकुमार यादव (८) यांच्या विकेट्सचा समावेश होता. मात्र, नंतर नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी १०८ धावांची भागीदारी केली आणि भारताचा डाव सावरला. या दोघांनीही अर्धशतकेही केली. नितीशने ३४ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली, तर रिंकूने २९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतरही हार्दिक पांड्यानेही १९ चेंडूत ३२ धावांची चांगली खेळी केली. पण अखेरीस भारतीय खेळाडूंनी मोठे फटके मारण्याच्या नादात विकेट्स गमावल्या. अखेर भारताने २० षटकात ९ बाद २२१ धावा केल्या.
बांगलादेशकडून रिशाद हुसैनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर तस्किन अहमद, तांझिम हसन साकिब आणि मुस्तफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.