Gautam Gambhir on Coaching: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. गंभीरचे भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान राहिले आहे, आता तो वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
त्याने प्रशिक्षकाच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की जर खेळाडू चांगली कामगिरी करत असेल, तर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळावे. यातून त्याने अप्रत्यक्षरित्या खेळाडूंना चांगली कामगिरी करत असाल, तर तिन्ही फॉरमॅट खेळायला मिळतील, असा इशाराही दिल्याचे दिसून येत आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीर म्हणाला, 'माझा एका गोष्टी प्रचंड विश्वास आहे की जर तुमची चांगली कामगिरी असेल, तर तुम्ही तिन्ही फॉरमॅट खेळले पाहिजे. माझा इंज्युरी मॅनेजमेंटवर माझा फार विश्वास नाही, जर तुम्ही दुखापतग्रस्त झाला, जा आणि त्यातून तंदुरुस्त होऊन या, इतकं हे साधं आहे.'
गंभीर पुढे म्हणाला, 'जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असता आणि तुम्ही चांगली कामगिरी करत, तेव्हा तुम्ही कोणत्याही अव्वल खेळाडूला विचारा, त्यांना तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचे असते. त्यांना बाजूला राहून फक्त एका फॉरमॅटमधील गोलंदाज बनायचे नसते.
'दुखापती या खेळाडूच्या आयुष्याचा भाग असतो. जर तुम्ही तिन्ही फॉरमॅट खेळणार असाल, तर तुम्हाला दुखापत होणार, अशावेळी तुम्ही परत जाऊन तंदुरुस्त होऊन यावं. पण तुम्ही तिन्ही फॉरमॅट खेळायला हवेत.'
'एखाद्या खेळाडूला एकाच फॉरमॅटसाठी वैगरे ठेवण्यावर माझा विश्वास नाही. आपण त्या खेळाडूच्या दुखापतीवर काही उपाययोजना करू, वर्कलोड आणि अशा गोष्टी पाहू. प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून तुमचा कार्यकाळ हा खूप लहान असतो. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त खेळण्याची इच्छा असते. जर चांगल्या फॉर्ममध्ये असाल, तर तुम्ही तिन्ही फॉरमॅट खेळावेत.'
त्याचबरोबर खेळाबद्दल काय दृष्टीकोन हवा, याबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, 'मी फक्त एक संदेश देईल, प्रामाणिकपणे खेळा, नक्कीच निकाल मिळतील. मी जेव्हा बॅट हातात घेतलेली, तेव्हा मी निकालाचा, मी किती धावा करेल, याचा विचार केला नव्हता. मी माझ्या खेळाशी प्रामाणिक राहिलो. आपल्या तत्वांनुसार आणि मुल्यांनुसार खेळा. योग्य गोष्टी करा.'
'जर तुमचं मन खात्री देत असेल की तुम्ही संघासाठी योग्य गोष्टी करत असाल, तर संपूर्ण जग तुमच्या विरोधात असेल, तरी काही गोष्टी करायला घाबरू नका.'
'मी मैदानात आक्रमकता दाखवली, वाद झाले, पण ते संघाच्या हिताचे होते. कारण शेवटी संघ महत्त्वाचा असतो, एक व्यक्ती नाही. त्यामुळे मैदानात जाऊन संघाला विजय कसा मिळेल, याचा विचार करा. हा सांघिक खेळ आहे, वैयक्तिक नाही, जिथे तुम्ही फक्त तुमचा विचार करू शकाल. त्यामुळे इथे संघाला प्राधान्य हवे.'
गंभीर २६ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापासून भारतीय संघाशी मुख्य प्रशिक्षक म्हणून जोडला जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.