Ranji Trophy 2024, Jammu and Kashmir vs Maharashtra: रणजी ट्रॉफी २०२४ स्पर्धा सुरू झाली असून पहिल्या फेरीत ए ग्रुपमधील ऋतुराज गायकवाड कर्णधार असलेल्या महाराष्ट्र संघासमोर जम्मू आणि काश्मीर संघाचे आव्हान होते. श्रीनगरला झालेला हा सामना चौथ्या दिवशी अनिर्णित राहिला.
मात्र, असे असले तरी या सामन्यात जम्मू-काश्मीरचे वर्चस्व दिसून आले. त्यांनी पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे ३ गुण मिळाले आहेत. परंतु, पहिल्या डावात पिछाडीमुळे महाराष्ट्राला केवळ एक गुण मिळाला आहे.
या सामन्यात चौथ्या दिवशी महाराष्ट्राने ८७ व्या षटकापासून ६ बाद ३१२ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली होती. यावेळी अर्शिन कुलकर्णी आणि रामकृष्ण घोष हे फलंदाजी करत होते.
महाराष्ट्र तेव्हा २०७ धावांनी पिछाडीवर होता. पण अर्शिन आणि रामकृष्ण यांनी चौथ्या दिवशी सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला. या दोघांनीही चांगली भागादारी करताना महाराष्ट्राची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला.
अर्शिनने अर्धशतकही झळकावले. पण त्यांची जोडी अकिब नबीने तोडली. त्याने अर्शिनला बाद केले. अर्शिनने १२४ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह ८७ धावांची खेळी केली. त्याची आणि रामकृष्ण यांच्यात ७ व्या विकेटसाठी तब्बल १२५ धावांची भागीदारी झाली.
मात्र अर्शिन बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात रामकृष्ण याला अब्दुल सामद याने ४७ धावांवर पायचीत केले. त्यानंतर महाराष्ट्राने रजनीश गुरबाजी आणि मुकेश चौधरी यांच्या झटपट विकेट्स गमावल्या. त्यामुळे महाराष्ट्राचा डाव १३०.३ षटकात ४२८ धावांवर संपला. त्यामुळे जम्मू आणि काश्मीर संघाला ९१ धावांची आघाडी मिळाली.
दरम्यान, या सामन्यात महाराष्ट्राकडून सिद्धेश वीरने २५१ चेंडूत १२७ धावांची खेळी केली, तर ऋतुराजने १३० चेंडूत ८६ धावांची खेळी केली होती.
जम्मू-काश्मीरकडून गोलंदाजी करताना अकिब नबीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच रसिक सलामने २ विकेट्स घेतल्या, तर युधवीर सिंग, अब्दुल सामद आणि अबिद मुश्ताक यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर जम्मू-काश्मीरकडून दुसऱ्या डावात अभिनव पुरी आणि शुभम पुंदीर सलामीला फलंदाजीला आले. त्यांनी १० षटकात बिनबाद ३८ धावा संघासाठी उभारल्या.
पण यानंतर या सामन्यात सोमवारी अखेरचा दिवस असल्याने निकाल लागणार नाही, हे लक्षात घेत दोन्ही संघांनी सामना अनिर्णित राखण्याची संमती देत खेळ थांबवला. अभिनव पुरी १८ धावांवर, तर शुभम २० धावांवर नाबाद राहिले.
त्याआधी जम्मू आणि काश्मीरने पहिला डाव १५० षटकात ७ बाद ५१९ धावांवर घोषित केला होता. त्यांच्याकडून शुभम खजुरियाने ३५३ चेंडूत २५५ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने २९ चौकार आणि ८ षटकार मारले. तसेच यष्टीरक्षक फलंदाज शिवांश शर्मानेही शतकी खेळी करताना २८८ चेंडूत १०६ धावांची नाबाद खेळी केली.
महाराष्ट्राकडून गोलंदाजी करताना हितेश वाळुंजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच रजनीश गुरबानी, मुकेश चौधरी आणि अर्शिन कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.