India vs New Zealand Test: भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरूला झालेल्या कसोटी सामन्यात ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारताला तीन सामन्यांच्या मालिकेतही ०-१ अशी पिछाडी स्वीकारावी लागली आहे.
या सामन्यात पहिल्या डावातील खराब कामगिरीनंतर भारताने या सामन्याच्या दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली होती.
त्यातही सर्फराज खानने दीडशे धावांची खेळी करत हा सामना गाजवला. त्याने भारतासाठी दुसऱ्या डावात विराट कोहलीबरोबर १३६ आणि ऋषभ पंतबरोबर १७७ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. ज्यामुळे भारताला किमान न्यूझीलंडसमोर १०६ धावांचे लक्ष्य ठेवता आले.
दरम्यान, सर्फराजने ही खेळी करत पुढील सामन्यासाठीही प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी दावेदारी ठोकली आहे. त्याला या सामन्यात दुखापतग्रस्त शुभमन गिलच्या जागेवर संधी देण्यात आली होती. पण पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत गिल पुनरागमन करण्याची शक्यता आहे.