T20 World Cup फायनलमध्ये 'त्या'क्षणी नेमकी कशी होती परिस्थिती? कर्णधार रोहितचा खुलासा

Rohit Sharma on T20 WC Final: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामन्यात भारताने अखेरच्या षटकात विजय मिळवला होता, त्या सामन्याबाबत कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaSakal
Updated on

Rohit Sharma on T20 World Cup 2024 Final: भारतीय क्रिकेट संघाने २९ जून रोजी बार्बाडोसमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं. रोमांचक अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ७ धावांनी पराभूत केलं होतं. त्या सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत रोमांच पाहायला मिळाला होता.

दरम्यान या सामन्यातील कोणता क्षण घोर लावणारा होता, याबाबत भारताचा कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे. त्यानं सांगितलं की शेवटच्या ५ षटकांवेळी त्याचे विचार पूर्ण थांबले होते.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३० चेंडूत ३० धावा हव्या होत्या. हेन्रिक क्लासेन चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होता. त्याने २३ चेंडूत अर्धशतकही पूर्ण केले होते. पण अखेरच्या पाच षटकात जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी अचूक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला विजयापासून रोखले होते.

Rohit Sharma
T20 World Cup: फायनलपूर्वी कॅप्टन रोहितने भारतीय संघाला काय सांगितलं होतं? सूर्याने केला खुलासा

यादरम्यान, हार्दिकने क्लासेन आणि मिलरची विकेटही घेतली. अखेरच्या षटकात मिलरचा बाऊंड्रीजवळ सूर्यकुमार यादवने अफलातून झेल घेतला होता. अखेर अखेरच्या ५ षटकात सामना पूर्ण फिरला आणि भारताने विजय मिळवला.

याबाबत रोहित डेलासमधील एका कार्यक्रमात म्हणाला, 'मला त्यावेळी काहीच सुचत नव्हते. मी फार पुढचा विचार करत नाही, वर्तमानात रहाणे आणि हातात जे काम आहे, त्यावर लक्ष केंद्रीत करणे, माझ्यासाठी महत्त्वाचे होते. शांत रहाणे आणि आमच्या योजना अमंलात आणणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते.'

याशिवाय रोहितने असंही सांगितलं की दबावाच्या सामन्यात स्थिर रहाणेही महत्त्वाचे आहे.

Rohit Sharma
ICCमध्ये खळबळ! T20 World Cup आयोजनावरून वाद, दोन अधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

तो म्हणाला, 'दक्षिण आफ्रिकेला ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना आम्ही खूप दबावात होतो, पण शेवटची ५ षटकांनी दाखवले की आम्ही त्यावेळीही किती शांत होतो. आम्ही फक्त आमचं जे काम आहे, त्यावर लक्ष केंद्रीत केले होते, बाकी कशाचाही आम्ही विचार केला नव्हता. आम्ही घाबरलो नाही, ही चांगली गोष्ट आमच्या संघाने केली.'

या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला १७७ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ८ बाद १६९ धावाच करता आल्या होत्या.

भारताचे हे दुसरे टी२० वर्ल्ड कप विजेतेपद ठरले. यापूर्वी २००७ साली भारताने पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला होता. तसेच ११ वर्षांनंतर भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकली.

Pratima olkha:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com