Suryakumar Yadav vs Ishan Kishan Mumbai Indians : भारतीय क्रिकेटपटू देशांतर्गत स्पर्धेत दमदार कामगिरी करून राष्ट्रीय संघात स्थान पटकावण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्याचवेळी इंडियन प्रीमिअर लीगचं तगडं काँट्रॅक्टही त्यांच्या डोळ्यासमोर असते. त्यात IPL 2025 साठी मेगा ऑक्शन होणार असल्याने खेळाडूंमधील चुरस वाढली आहे. आयपीएल २०२५ मध्ये प्रत्येक फ्रँचायझींमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत. BCCI फ्रँचायझींना सहा खेळाडूंनाच कायम राखण्याची संधी देण्याची शक्यता असल्याने संघ मालकांची रणनीती ठरता ठरत नाही.. त्यात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता पाहायला मिळते. यापैकी एक मुंबई इंडियन्समध्ये बरेच फेरबदल पाहायला मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय...
हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यामुळे नाराज झालेले रोहित शर्मा समर्थक हिटमॅनच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत... सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा ट्वेंटी-२० कर्णधार झाल्याने, तो हार्दिकच्या नेतृत्वाखाली IPL 2025 मध्ये खेळेल का, याबाबतची चाहत्यांची रुची वाढली आहे. अशातच सूर्यकुमारच्या कालच्या ट्विटने Ishan Kishan सोबत त्याचा वाद सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळेच Mumbai Indians मध्ये एकतर सूर्या राहिल किंवा इशान असा तर्क नेटिझन्स लावत आहेत...
बुची बाबू निमंत्रित स्पर्धेत सूर्याला दुखापत झाली आणि त्याने दुलीप ट्रॉफीत खेळण्याची संधी गमावली. पण, तो दुलीप ट्रॉफीच्या लढतीचं अपडेट्स पाहतोय आणि त्या संदर्भातच त्याने काल एक ट्विट केलं. त्यात त्याने मुंबईच्या दोन सहकाऱ्यांचे भारत अ संघाकडून अर्धशतकीय खेळी केल्याबद्दल अभिनंदन केले. भारत ड संघाविरुद्ध ही मॅच सुरू आहे. सूर्याच्या या ट्विटनंतर इशान किशनसोबतच्या त्याच्या वादाची चर्चा रंगली.
भारत अ संघाकडून शाम्स मुलानीने काल दिवसअखेर १७४ चेंडूंत नाबाद ८८ धावांची खेळी केली. तेच तनुष कोटियनने ८० चेंडूंत ५३ धावा केल्या होत्या आणि या दोघांनी ९१ धावांची भागीदारी केली. त्यामुळे ६ बाद १४४ धावांवरून संघ ७ बाद २३५ धावांपर्यंत पोहोचला.
सूर्याने लिहिले की,''शाम्स मुलानी आणि तनुष कोटियन, तुमच्या दोघांचा अभिमान वाटतो. मुंबई असो किंवा दुलीप ट्रॉफीतील भारत संघ अडचणीत असताना धीर देणारे दोन शिलेदार... हा प्रवास एन्जॉय करा भावांनो...''
शाम्स मुलनी व तनुष कोटियन यांचे कौतुक करताना सूर्याने शतकवीर इशान किशनकडे दुर्लक्ष केल्याचा नेटिझन्सचा आरोप आहे. भारत क संघाकडून खेळताना इशानने खणखणीत शतक झळकावले. जुलै २०२३ नंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही त्याची पहिलीच मॅच होती आणि त्यात त्याने दम दाखवला. याबाबत सूर्याने कौतुक न केल्याने इशानसोबतच्या त्याच्या वादाच्या चर्चा रंगल्या आहेत.
वार्षिक करारातून वगळल्यानंतर इशान किशन टीम इंडियात पुनरागमनासाठी मेहनत घेतोय. बुची बाबू स्पर्धेनंतर त्याने दुलीप ट्रॉफीतही शतकी खेळी केली. त्यामुळे त्याचे चाहते BCCI वर सोशल मीडियावर दबाव वाढवताना दिसत आहेत. त्याने १२६ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने भारत क संघासाठी १११ धावांची खेळी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.