Women's T20 World Cup: भारताला सेमीफायनलला पोहोचण्यासाठी पार करावा लागणार ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या कसं आहे समीकरण

Women's T20 World Cup Semifinal Qualification Scenarios for India: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारताचा अखेरचा साखळी सामना रविवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतासाठी उपांत्य फेरीतील प्रवेशाच्यादृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
India Women Team
India Women TeamSakal
Updated on

India Women vs Australia Women: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारताचा अखेरचा साखळी सामना रविवारी (१३ ऑक्टोबर) गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतासाठी उपांत्य फेरीतील प्रवेशाच्यादृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. खरंतर आता साखळी फेरी अंतिम टप्प्यात आली असतानाही अद्याप उपांत्य फेरीत प्रवेश करणारे ४ संघ निश्चित झालेले नाहीत.

ए ग्रुपमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे शर्यतीत आहेत, तर श्रीलंकेचे आव्हान संपले आहे. ग्रुप बी मध्ये वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड शर्यतीत आहेत, तर बांगलादेश आणि स्कॉटलंड स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.

ए ग्रुपमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया तीन पैकी तीन सामने जिंकून ६ गुण आणि २.७८६ नेट रन रेटसह अव्वल क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर भारत असून त्यांनी तीन पैकी दोन सामने जिंकलेत, तर एक सामना पराभूत झाला आहे. त्यामुळे भारताचे ४ गुण असून ०.५७६ नेट रन रेट आहे.

India Women Team
IND vs BAN 3rd T20I: २९७ धावा, २२ षटकार अन् २५ चौकारची बरसात! टीम इंडियाने T20I मध्ये रचले विक्रमांचे मनोरे

तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडचेही दोन विजय आणि एका पराभवामुळे ४ गुण आहेत, तर ०.२८२ नेट रन रेट आहे. चौथ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. त्यांनी ३ पैकी दोन पराभव स्विकारले आहेत, तर एक विजय मिळवला आहे. त्यांचे -०.४८८ नेट रन रेट आहे. पाकिस्तानचं आव्हान सध्या जरी जिवंत असलं तरी त्यांना उपांत्य फेरीत जाण्याची संधी अगदीच कमी आहे.

उपांत्य फेरीसाठी समीकरणे

रविवारी भारताने जर ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकाने हरवलं, तर भारताचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के होईल. कारण भारताचे ६ गुण होतील. तसेच ऑस्ट्रेलियाचेही ६ गुण असतील.

त्याचबरोबर साधरण ६० हून अधिक फरकाने किंवा जर १२० धावांचा पाठलाग करत असतील, तर किमान १० षटकांच्या आत जर भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं, तर भारताचा नेट रन रेटही ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक वाढू शकतो.

India Women Team
Women's T20 World Cup: भारताच्या सेमीफायनलच्या मार्गात ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामना ठरणार निर्णायक, जाणून घ्या समीकरण

तसेच जर भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं, तर न्यूझीलंडला पाकिस्तानविरुद्ध मोठ्या विजयाची गरज असेल, जेणेकरून ते भारत किंवा ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त नेट रन रेटने उपांत्य फेरी गाठू शकतील.

मात्र, जर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं तर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीतील स्थान पक्के करेल. परंतु, भारतासमोरील अडचणी वाढतील. जर असे झाले, तर भारताला आशा करावी लागेल की पाकिस्तान न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत करतील.

कारण, जर भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला आणि न्यूझीलंडने पाकिस्तानला पराभूत केलं, तर भारताने आव्हान संपेल आणि ए ग्रुपमधून ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोहोचतील.

तसेच जर भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आपापले शेवटचे साखळी सामने पराभूत झाले, तर भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील एक संघ नेट रन रेटनुसार उपांत्य फेरीत पोहचेल.

एकूणच भारतासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा विजयच पुढील मार्ग सोपा करू शकतो.

Related Stories

No stories found.